Login

सावल्यांच्या कुशीत. भाग - १७

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - १७

नीरवला तिथे कोणीच दिसले नाही म्हणून तो परत त्या खोलीत अजून काही मिळतोय का ते पाहू लागला. पण त्याला त्या खोलीत अजून काहीच सापडले नाही. त्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे सरस्वतीची कुठलीही गोष्ट त्याला मिळाली नाही. अन्वीच्या फोटोमुळे त्याचा गोंधळ अजूनच वाढला. ज्या प्रश्नांची उत्तरे तो शोधायला आला होता ते मिळालेच नाही पण उलट अजून दुसरेच प्रश्न उपस्थित झाले. नीरव निराश मनाने तिथून उठला आणि त्या खोलीचे दार बंद करून घेतले आणि परत वाड्यात येऊन त्याच्या खोलीत आला.

नीरव खोलीत आला तेव्हा वेदिका शांत झोपलेली होती. मग नीरवने सुद्धा आवाज न करता तिच्या बाजूला येऊन झोपला. पण आता त्याला झोप लागणं शक्यच नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर त्याचा भुतकाळ उभा राहिला होता, जो की त्याने तो कधीच मागे सोडून दिला होता, पण आज अचानक तो फोटो दिसल्यावर ते सगळं आठवू लागले आणि आता त्याच्या कानात अन्वीचे ते शेवटचे शब्द घुमू लागले.

"नीरव, आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत. आपण दोघं कधीच एक होऊ शकत नाही, मी नाही तुझ्याशी लग्न करू शकत, इथून पुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नको, मला कायमचं विसरून जा. तेच आपल्या दोघांच्याही भल्याचं आहे." असे बोलून अन्वी कायमची त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. त्यानंतर बरेच दिवस त्याने तिला फोन केला होता पण तिने कधीच त्याचा फोन घेतला नाही की त्या दिवसापासून ती कधी त्याला भेटायला सुद्धा आली नाही. ती कुठे निघून गेली हे सुद्धा त्याला माहित नव्हते, त्याने तिचा खुप शोध घेतला पण ती भेटलीच नाही. त्यामुळे नीरवने सुद्धा तिला कायमचे मनातून काढून टाकले आणि त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. पण आता नीरवचा भुतकाळ त्याच्या भोवती घिरट्या घालत होता.

तो फोटो आणि अंगठी त्या खोलीत कशी गेली याच विचारांच्या तंद्रीत असताना त्याला कधी झोप लागली तेच समजलं नाही. पण जेव्हा झोप लागली तेव्हा त्याला स्वप्नात परत अन्वी दिसू लागली.

स्वप्नात तो एका वाळवंटासारख्या ओसाड जागेत उभा होता. समोर दूरवर अन्वी उभी होती... अगदी जशी ती शेवटच्या भेटीत दिसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी उदासी होती. ती काहीतरी बोलत होती, ओरडून ओरडून सांगत होती. पण नीरवपर्यंत तिचा आवाज पोहोचत नव्हता. तो तिच्याकडे धावत गेला, पण तो जसा जवळ जायला लागला तशी ती दूर जात होती… अगदी धूसर होत होत... पुढे गेली, मग अचानक तिने हातातली एक वस्तू हवेत फेकली, ती वस्तू म्हणजे तीच अंगठी होती.

ते स्वप्न पाहून नीरव घाबरूनच जागा झाला. तो पुर्ण घामाने भिजला होता. त्याची छाती सुद्धा धडधडत होती. तो धडधडत्या छातीतून श्वास घेत घेत उठून बसला. बाजूला वेदिका अजूनही झोपलेली होती. पण त्याला आता एक गोष्ट स्पष्ट वाटू लागली.... ती म्हणजे अन्वी काहीतरी सांगायचा प्रयत्न होती. तिचं निघून जाणं जेवढं अचानक होतं, तेवढंच तिचं परत स्वप्नात येणं अनाकलनीय होतं.

"अन्वी खरंच तिच्या मनाने माझ्यापासून दूर गेली असेल की तिला कोणीतरी माझ्यापासून दूर जायला भाग पाडले असेल." असे प्रश्न त्याच्या मनात चालू होते.

"ती अंगठी... ते स्वप्न... अन्वीचं तसं निघून जाणं... काहीतरी चुकतंय." नीरव पुटपुटला. त्याच्या त्या हलक्याशा आवाजाने वेदिका सुद्धा झोपेतून जागी झाली आणि नीरवला बसलेलं बघून ती पण उठून बसली आणि खोलीतली लाईट चालू केली. नीरव इतका विचारात गढून गेला होता की वेदिका उठली आणि तिने लाईट चालू केली तरीही त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हते. वेदिकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तो एकदमच दचकला. तो दचकला म्हणून वेदिका सुद्धा दचकून त्याच्याकडे बघू लागली.

"नीरव... काय झालं? तुम्ही जागे का आहात? आणि इतकं घाबरलाय का? काही स्वप्न पडलं का तुम्हाला?" वेदिकाने काळजीने विचारलं. तेव्हा नीरव थोडा वेळ शांत बसून तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यांत अजूनही भीती होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला.

"हो स्वप्नच होतं... पण ते इतकं खऱ्यासारखं वाटलं वेदिका... अगदी जसं काही सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडतंय. अन्वी... मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण तिचे शब्द माझ्यापर्यंत पोहचतच नव्हते." नीरवच्या तोंडून अनावधानाने अन्वीचं नाव निघून गेले. वेदिका सुद्धा ते नाव ऐकताच गोंधळली.

"नीरव, आता ही अन्वी कोण?" वेदिकाने काळजीने विचारलं. नीरव क्षणभर गोंधळला. आपण काय बोलून गेलो याची जाणीव त्याला झाली.

"नाही... कोणीच नाही, माझ्या तोंडून सहजच ते नाव निघून गेले." नीरवने घाबरतच खोटं सांगितलं आणि परत झोपायला म्हणून अंग टाकू लागला तेव्हा वेदिकाने थांबवलं.

"नीरव, थांबा... असंच झोपू नका, तुम्हाला खुप घाम आला आहे. थोडं पाणी प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल." वेदिका म्हणाली आणि नीरवला पाणी द्यायला उठली, तर नेमकं खोलीत पाणीच नव्हते म्हणून ती पाणी आणायला खाली गेली. त्याचवेळी नीरव उठून उभा राहिला आणि चेहऱ्यावरचा घाम पुसत तो आरशाजवळ जाऊन उभा राहिला. त्याचवेळी त्याला आरशात पाठमोरी स्त्री दिसली, तिचे केस मोकळे सोडले होते आणि सगळ्या पाठीवरून रक्ताच्या धारा वाहत होत्या. ते बघून नीरव इतका घाबरला की त्याला वेदिकाला आवाज सुद्धा देता येत नव्हता. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर फुटत नव्हते. त्यांचं पुर्ण शरीर गोठल्यासारखं झालं होतं. हातपाय तर नुसते लटपटत होते. तो प्रचंड घाबरला आणि तसाच जमिनीवर कोसळला.