Login

सावल्यांच्या कुशीत. भाग - २५

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - २५

"वेदिका, झालं का तुझं? आपल्याला उशीर होतोय." नीरवने आत येतच वेदिकाला विचारलं. तसं तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि हसू लागली. ती काही बोलायच्या आतच नीरवने त्या आजीने दिलेली अंगाऱ्याची पुडी काढली आणि तिच्या कपाळावर अंगारा लावला. तसं ती थोडं करंट बसल्यासारखी हलली, आणि स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघू लागली.

"हे काय नीरव, आज अंगारा वगैरे.... हा काय प्रकार आहे?" वेदिकाने विचारलं.

"वेदिका, हे बघ मी एक शिक्षक आहे त्यामुळे मला असल्या गोष्टी पटत नाही आणि मी या गोष्टींचं समर्थन सुद्धा करत नाही, पण आता परिस्थितीच अशी आहे की आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात.

वेदिकाने काही क्षण नीरवकडे बघितलं. तिच्या कपाळावर जिथे अंगारा लावला होता तिथे अजूनही ती एक विचित्र उष्णता जाणवत होती. नीरवच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव तिला थोडा अस्वस्थ करत होता.

"नीरव... मला खरंच थोडं विचित्र वाटतंय... म्हणजे... क्षणभरासाठी असं वाटलं की कुणीतरी माझ्यातून काहीतरी ओढून घेतलं… एक क्षणभर सगळं थांबलेलं वाटलं..." वेदिका हळूच म्हणाली.

"असं काही नाहीये, तू तो विचारच करू नकोस. तुझं झालं असेल तर आपण जायचं का?" नीरव म्हणाला तसं वेदिकाने मान हलवली आणि त्याच्यासोबत बाहेर चालली. आज बऱ्याच दिवसांनी बाहेर जात होती, त्यामुळे तिला प्रसन्न वाटत होते. दोघेही बाईक वर बसून रस्त्याने जाऊ लागले. थोडं पुढे गेल्यावर गाडी जेव्हा वेदिकाच्या माहेरच्या रस्त्याकडे वळली तेव्हा वेदिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

"नीरव, आपण माझ्या आई बाबांना भेटायला चाललोय!" वेदिकाने खुश होऊन विचारलं.

"हो, हेच सरप्राईज द्यायचं होतं तुला. किती दिवस झाले तू आई बाबांना भेटली नाही आणि तू ही स्वतःहून कधी विषय काढला नाही मग मीच ठरवलं की तुला घेऊन जाऊया. आता छान आठ दिवस आई बाबांसोबत एंजॉय कर." नीरव म्हणाला.

"म्हणजे तुम्ही मला इथे आठ दिवसांसाठी सोडणार आहात? नीरव.... खरं सांगा, आपल्या घरी आपल्यासोबत काही विचित्र गोष्टी घडताय म्हणून तुम्ही मला इकडे पाठवताय ना?" वेदिका.

"तसं नाहीये वेदिका, तसं असतं तर मी आधीच तुला पाठवलं असतं, आणि काळजी करू नकोस... आई बाबांना सुद्धा सांगितले आहे मी, तू इथे राहिली तर त्यांना चालणार आहे." नीरव म्हणाला पण वेदिकाला काही ते पटत नव्हते पण तरीही आई बाबांना भेटायला मिळणार म्हणून ती दुसरा विचार करणं सोडून देते.

नीरव वेदिकाला तिच्या माहेरी सोडून आला आणि दुपारनंतर शेतात गेला. संध्याकाळी त्याच्या आई बाबांसोबतच तो घरी आला, रात्री जेवण होईपर्यंत तो बाहेरच बसून होता.

जेवण झाल्यावर त्याच्या खोलीत गेला. वेदिका नसल्याने त्याला खोलीत थोडं एकटं वाटत होतं. तो बेडवर बसून वेदिकाचाच विचार करत असतो. त्याचवेळी त्याच्या कानावर त्याला हाक मारल्याचा आवाज आला. आवाज कुठून येतोय याचा तो कानोसा घेऊ लागला, त्याचवेळी आवाज बंद झाला. मग त्याने सगळे विचार झटकून टाकले आणि झोपून घेतले.

"नीरव, मी तुला स्वतःहून सोडून गेली नाही... मला सोडून जायला भाग पाडलं. तू का खरं शोधायचा प्रयत्न नाही केला. सत्य जाणून न घेता मला विसरून गेला आणि माझ्याविषयी मनात राग धरून बसला. का.... का??? असं केलं नीरव तू, तुला सत्य समजत नाही तोपर्यंत आता माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तो असाच तुझ्या अवतीभोवती फिरत राहिल. नीरव.... नीरव....." नीरव त्या आवाजाने आणि बोलण्याने गाढ झोपेतून खडबडून जागा झाला आणि त्याने जे काही ऐकलं होतं ते तो परत आठवू लागला.

"हा आवाज अन्वीचाच होता, पण ती असं का बोलत होती? तिने तर स्वतःहून मला नकार दिला होता आणि लगेच इथून निघून गेली होती, मग आता ती अशी का बोलतेय? काहीच कळत नाहीये, आणि ती काय म्हणत होती की माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.... याचा अर्थ काय?" नीरव स्वतःशीच बोलला आणि त्या बोलण्याचा विचार करू लागला. आता त्याची झोप पुर्ण उडाली होती. अन्वीचा एक ना एक शब्द त्याच्या कानात घुमत होता. तो रात्रभर विचार करत तसाच बसून राहिला होता.

नीरवला रात्रभर झोप लागलीच नाही म्हणून तो सकाळी लवकरच अंघोळ करून बाहेर आला आणि किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा बनवला, तो चहा घेतच होता. तेवढ्यात मंगल पण उठून आली आणि त्याला किचनमध्ये पाहून ती पण गोंधळून गेली.

"नीरव, लवकर उठलास तू! मला आवाज द्यायचा ना मग मी दिला असता तुला चहा बनवून." मंगल.

"असूदे, तू रोजच करत असते, आज मी केला तर काय हरकत आहे आणि मी तुझ्यासाठी पण बनवला आहे. मस्त गरमागरम चहा घे नंतर कामं कर." नीरव म्हणाला आणि त्याने मंगललाही चहा दिला. चहा घेऊन झाल्यावर तो बाहेर बसला. तेवढ्यात सुधाकर तिथे आले आणि त्याच्याकडे पाहिलं तर त्यांना तो कसल्याशा विचारात हरवलेला दिसला मग ते तिथेच त्याच्या बाजूला बसले आणि त्याच्याशी बोलू लागले.

"नीरव, आज तू जास्तच टेन्शनमध्ये दिसतोय. तुझी झोपही झालेली दिसत नाहीये, काय झालंय काय नेमकं?" सुधाकरने विचारलं तसं नीरव त्यांच्याकडे गंभीर होऊन पाहू लागला.

"बाबा, काल रात्री माझ्या स्वप्नात अन्वी आली होती, आणि ती असं काही बोलत होती की जसं काय ती जिवंतच नाहीये. मला तर काहीच समजत नाही." नीरव गंभीर होऊन म्हणाला. तसं सुधाकरचा चेहरा एकदमच पांढरा फटक पडला. आता काय आणि कसं बोलावं तेच त्यांना सुचेना. तरीही ते बोलतात.

"हे बघ नीरव, त्या मुलीने ऐनवेळी तुला लग्नासाठी नकार दिला होता आणि तुला सोडून गेली होती, अशा धोका देणाऱ्या मुलीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको, आता तुझं लग्न झालं आहे आणि वेदिका खरंच खूप चांगली मुलगी आहे, तिच्यासोबत सुखाने संसार कर, उगाच नको त्या गोष्टी डोक्यात घेऊन त्याचा तुझ्या संसारावर परीणाम होईल." सुधाकर.

"नाही बाबा, असं काही नाही होणार. मी वेदिकावर मनापासून प्रेम करतो आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, आमचं सगळं काही व्यवस्थित चालू आहे पण आता मला अन्वीचं नेमकं काय झालं हे जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी मी आज शाळेतून आल्यावर अन्वीच्या आईकडे जाणार आहे. तिथे गेल्यावरच खरं काय आहे ते मला समजेल." नीरव म्हणाला आणि तिथून उठून आत गेला. पण तो गेल्यावर सुधाकरचं हृदय मात्र जोरजोरात धडधडू लागलं. पुढे काय होईल याची त्यांना भिती वाटू लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all