सावल्यांच्या कुशीत. भाग - २६
शाळा सुटल्यानंतर सगळं आटोपून नीरवने अन्वीच्या घरी जायचं ठरवलं, नीरवचे घर गावाच्या एका टोकाला होते तर अन्वीचे घर गावाच्या दुसऱ्या टोकाला होते. तो बाईकवरच तिच्या घरी गेला. घरासमोर गाडी थांबवली तसं तो तिथल्या परिसरात एक नजर फिरवून बघू लागला. त्याला तिथे अन्वीसोबत घालवलेले क्षण, त्यांच्यात झालेला संवाद आठवू लागला. तो थोडा वेळ तसाच शांत उभा राहिला, थोड्या वेळाने तिच्या दाराकडे पाहिलं तर दाराला बाहेरून कडी घातलेली होती. मग तो तिथे शेजारी असलेल्या एका घरासमोर ओट्यावर एक आजी बसल्या होत्या त्यांच्याकडे गेला आणि तिथे चौकशी केली.
"आजी, अन्वीची आई घरी नाहिये का?" नीरवने त्या आजींना विचारलं.
"दुपारपर्यंत तर घरीच होती पण नंतर कुठे गेली काय माहीत, तसं तर ती जात नाही बाहेर... पण आज कशी गेली काय माहीत... पण तू कोण आहेस बाळा, मी काय तुला ओळखलं नाही आणि तुझं सुगंधा कडे काय काम आहे?" त्या आजीने विचारलं पण नीरवने त्याची ओळख सांगणं टाळलं.
"मी इथे शाळेत शिक्षक आहे, जरा काम होतं माझं त्यांच्याकडे, तुम्ही मला अन्वी बद्दल काही सांगू शकता का? म्हणजे ती सध्या कुठे आहे वगैरे!" नीरवने अन्वी बद्दल माहिती करून घ्यायचा प्रयत्न केला.
"सुगंधा (अन्वीची आई) तिच्याबद्दल काही सांगतच नाही, त्यामुळे ती कुठंय ते अख्खा गावात कोणालाच माहीत नाही." त्या आजी म्हणाल्या तसं नीरवची निराशा झाली. तो अंधार पडेपर्यंत तिथेच उभा राहून अन्वीच्या आईची वाट पाहत होता पण ती काही आलीच नाही, शेवटी तो घरी निघून गेला.
नीरव घरी आल्यावर मंगल आणि सुधाकर हाॅलमध्येच बसलेले होते, ते बघून तो ही तिथेच बसला.
"नीरव, ही काय वेळ झाली का घरी यायची! आज वेदिका घरी नाही तर तू लगेच उशिरा आला!" मंगलने जरा रागातच विचारलं.
"आई, तसं काही नाहीये. मी सकाळी बाबांना सांगितलं होतं की मी संध्याकाळी अन्वीच्या घरी जाणार आहे, इतका वेळ मी तिकडेच होतो." नीरवने शांतपणे सांगितले.
"मग काय झालं तिकडे गेल्यावर?" मंगल.
"काही नाही तिची आई घरीच नव्हती. मी बराच उशीर पर्यंत वाट पाहत होतो पण त्या काही आल्याच नाही." नीरव.
"नीरव, माझं ऐक... या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक, ज्या मुलीने ऐनवेळी तुला लग्नासाठी नकार दिला होता तिचा एवढा विचार करायची काय गरज आहे तुला? ती आपल्या जातीची नव्हती तरी सुद्धा आम्ही जात, धर्म सगळं बाजूला ठेऊन तिला आपलं करायला तयार होतो पण तिने त्याची जाणीव ठेवली नाही, बरं नव्हतं करायचं तिला तुझ्याशी लग्न... तर ठिक होतं ना, पण असं तोंड लपवून गाव सोडून जायची काय गरज होती तिला?" मंगल.
"आई, मी हे सगळं का करतोय हे तुम्हाला दोघांनाही माहिती आहे तरी तू असं बोलतेय. मलाही हौस नाहीये काम धंदा सोडून या गोष्टींच्या मागे लागायची पण माझ्याकडे पर्याय नाहीये." नीरव.
"बरं सोड आता ते... जा तू हात पाय धूवून ये, जेवायची वेळ झाली आहे आता!" सुधाकर म्हणाले तसं नीरव त्याच्या खोलीत गेला आणि फ्रेश होऊन परत बाहेर आला. मग त्याने आरवला आवाज दिला. त्यानंतर ते चौघेही जेवायला बसले.
जेवण झाल्यावर नीरवने वेदिकाला फोन केला आणि जरावेळ तिच्याशी बोलून मग खोलीत गेला.
खोलीत आल्यावर नीरव सर्वात पहिले आरशात बघू लागला, आज काय विचित्र घडणार आहे किंवा दिसणार आहे याचा तो विचार करू लागला पण आज असं काहीच घडलं नाही, खोलीतलं वातावरण पण एकदम शांत वाटत होतं. मग तो प्रसन्न मनाने झोपी गेला.
मंगल आणि सुधाकर त्यांच्या खोलीत शांतपणे झोपले होते. सुधाकरला मध्यरात्री जाग आली तेव्हा त्यांनी उठून पिण्यासाठी पाण्याचा तांब्या घ्यायला हात पुढे केला पण त्यांना अंधारात तो घेताच आला नाही. त्यांचा धक्का लागून ते पाणी खालीच सांडलं, तांब्या पडल्याचा आवाज झाला तसं मंगलला सुद्धा जाग आली. पण ती न उठताच बडबड करू लागली.
"काय हो तुम्ही, झोपा गप्प आणि मलाही झोपू द्या. एवढ्या रात्रीचा कसला आवाज करताय!" मंगल.
"अगं ते माझ्याकडून चूकून तांब्या पडला खाली, तू झोप... मी आलोच, खाली जाऊन पाणी पिऊन येतो." सुधाकर म्हणाले आणि पाणी प्यायला म्हणून खाली जाऊ लागले. ते पायऱ्यांवरून खाली येत असताना अचानक घरातले लाईट बंद झाले आणि अचानक वाऱ्याच्या वेगाने ते पुढे होऊ लागले. सगळे दारं खिडक्या बंद असताना सुद्धा आपण वाऱ्याच्या वेगाने कसं पुढे कसं जातोय हेच त्यांना समजेना. ते स्वतःचा तोल सावरत होते पण शेवटी ते पडलेच आणि घरंगळत खाली जमिनीवर कोसळले.
सुधाकर जमिनीवर जोरात आदळले. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला, तरीसुद्धा त्यांनी डोळे मिटले नाही, त्या अंधारात त्यांना एक विचित्र आवाज ऐकू यायला लागला, कुणीतरी पायाला घुंगरू बांधून हळूहळू चालत असल्याचा तो आवाज होता आणि आता तो आवाज जवळ येत होता... आणि अचानक तो थांबला.
त्यांनी नजर फिरवली, पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. त्या अंधारात फक्त एक थंडसर हुडहुडणारा वारा त्यांच्या अंगावरून जात होता. ते उठण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांची मान एकदम जड झाली होती... आणि तिथेच समोर, जिन्याच्या पायथ्याशी... कुणीतरी उभं आहे असा भास त्यांना झाला, मग ते बारीक नजर करून बघू लागले तर त्या अंधारातही त्यांना पांढऱ्या रंगाचा झिरझिरीता पदर, ओले केस आणि वाकलेली मान असं रचलेलं रूप आता दिसू लागले.
"को... कोण आहे तिथे?" त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. पण उत्तरा ऐवजी त्यांना एक विचित्र हसणं ऐकू आलं. एकदम भयाण आणि गूढ. त्या आवाजात मानवीपणा नव्हताच. ते हसणं अचानक वेगाने त्यांच्या भोवती घुमू लागलं, अगदी जवळून, कानात. त्यांनी भीतीने डोळे मिटून घेतले.
आणि जेव्हा डोळे उघडले... तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या पायऱ्यांवर एक सावली रेंगाळत आहे. ती सावली त्यांच्याकडे सरकत होती... पण तिचे पाय नव्हते, ती हवेत तरंगत होती. ते बघून सुधाकर घाबरून मागे सरकू लागले, पण तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून कोणीतरी त्यांच्या खांद्यावर ठेवला गेला. त्यांनी वळून पाहिलं... आणि ते जोरात किंचाळले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा