नोकरीवाली सून

Marathi katha

सुजय आणि रमाच लग्न झाले. तसे त्यांचे लव्ह कम अरेंज मॅरेज. ते दोघे एकाच काॅलेजमध्ये होते आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली.

ते दोघे शिक्षण संपल्यावर जाॅब करू लागले आणि मगच घरी सांगितले "की आमचे एकमेकांवर प्रेम आहे." सगळं व्यवस्थित होतं त्यामुळे दोन्हीकडूनही लगेच लग्नाला परवानगी मिळाली. अशाप्रकारे लग्न व्यवस्थित पार पडले.

रमा हळूहळू घरात रमू लागली आणि थोड्या दिवसांनी ती परत ऑफिसला जाॅईन झाली. ती घरात होती तोपर्यंत सगळं सुरळीत चालू होते. पण जेव्हा ती जाॅबला जाऊ लागली तेव्हा सासूची कुरबूर सुरू झाली.

तसे रमा घरातील सगळं आवरून, स्वयंपाक करून, दोघांचा डबा घेऊनच ऑफिसला जात असे. पण तिच्या सासूबाईंच म्हणणं होतं की नोकरी करण्यापेक्षा घरात काय हवं नको ते पहावं.. बाईने घर धरून असावं.. मगच घराला घरपण येत.. रमा तिकडे लक्ष देत नसे. इतके म्हणून काही फायदा होत नाही म्हटल्यावर रमाच्या सासूबाई शेजारी पाजारी सांगू लागल्या "ही काही कामच करत नाही.. सगळं मलाच करावं लागतं..डबा घेते आणि नोकरीला जाते.. घराकडे मुळी लक्षच नाही वगैरे वगैरे.."

काही दिवसांनी रमाला दिवस गेले. मग तिच्या सासूबाईंना वाटलं "एखाद मूल झालं की मग तर ही घरात बसेल." म्हणून त्या गप्प बसल्या.

रमाला एक गोड मुलगा झाला. तो थोडा मोठा झाल्यावर रमाने परत ऑफिस जाॅईन केले..परत सासूबाईंची किरकिर सुरू झाली "मुलाला माझ्याकडे सोडून निवांत जाते. घराकडे जराही लक्ष नाही." असे सतत चालू असे.

एक दिवस रमा ऑफिसमधून घरी येते आणि म्हणते "मी उद्यापासून ऑफिसला जाणार नाही." हे ऐकून तिच्या सासूबाईंना खूप आनंद होतो. त्या मनात म्हणतात "माझ्या बोलण्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचं"

दुसर्या दिवशी रमा थोडी उशीराच उठली कारण आज ती ऑफिसला जाणार नव्हती. आंघोळ वगैरे आवरून ती काम चालू करते इतक्यात सासूबाईंना म्हणते "आई अहो काल मी गडबडीत भाजी आणली नाही. तर तुम्ही नाक्यावरून भाजी आणता का? आणि हो जरा लवकरच आणाल काय यांना डबा द्यायचा आहे."

"हो आणते" असे म्हणून सासूबाई जातात.

असे रोजच त्यांना भाजी आणायला रमा सांगू लागली. चार दिवसांनी परत रमा "आई मी किराणाची यादी बनवते. ती तेवढी वाण्याला देऊन येता काय? मी गेले असते पण मला थोडं काम आहे." असे म्हणून रमा जात असते इतक्यात रमाच्या सासूबाई "अगं पैसे तू देतेस ना? दरवेळी तूच देत असतेस."

"अहो आई मी कुठून देणार? तेव्हा मी जाॅब करत होते त्यामुळे माझ्याकडे पैसे होते. आता कुठुन देणार?" रमा म्हणते.

"बरं" म्हणून सासूबाई जातात.

संध्याकाळी सुजय घरी आल्यावर रमाच्या सासूबाई "अरे सुजय घरखर्चासाठी पैसे हवे आहेत." असे म्हणाल्या.

"अगं आई इतक्या लवकर कसे संपले पैसे? दरवेळी तर महिन्याला देत होतो. आता तर दहाच दिवस झाले आहेत." सुजय म्हणतो.

"अरे आता भाजीपाला, वाण्याचं सामान आणि बारीकसारीक काहीबाही लागतय ते आणाव लागतं." रमाची सासूबाई.

"मग इतके दिवस लागत नव्हते का?" सुजय.

"......" रमाची सासूबाई.

"हे बघ आई, अजून कर्ज आहे, लाईटबील, फोनबील, घरफाळा असे एक ना अनेक खर्च आहेत. मी कुठे म्हणून बघणार? थोडी बचत पण करायला हवी ना. अजून मुलाच शिक्षण नाही. तो अजून खर्च आहे. मी एकटा कुठे म्हणून बघू." सुजय.

हे ऐकून रमाच्या सासूच्या डोक्यात प्रकाश पडला. ती मनात "मी उगाच हिला जाॅब करू नको म्हणाले. हा खर्च ती करत होती आणि सुजयने मला दिलेल्या पैशातून मी भिशी भरत होते. आता कसं करायचं. सांगूया तिला परत जाॅब करायला." असे ठरवून त्या रमाजवळ जातात.

"रमा माझं चुकलं ग. आपल्या घराचं बघायचं सोडून मी तुला जाॅब सोडण्यासाठी मागे लागले. तू परत जाॅब कर. मला कसलीच अडचण नाही." रमाची सासूबाई.

हे ऐकून रमाला समाधान वाटतं आणि ती सासूबाईंना मिठी मारते. मग हळूच सुजयकडे बघून डोळा मारते. मग सुजयच्या सगळं लक्षात आलं आणि तो हसू लागतो.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.



*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.