शापित मृत्यू १
सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने थैमान घातलेले. तुफान पडणाऱ्या पावसात ती एकटीच त्या सूमसाम वाटेवरून चालत होती. पावसाची भीती होती ना वाऱ्याची... यावेळी ती एकदम निर्धास्त होती.
समोर जाणारा रस्ता सोडून ती आडवाटेला वळली. ना ती वाट धड होती आणि नाही त्या वाटेला कोणाची वस्ती दिसत होती. रातकिड्यांची किरकिर, कोल्ह्याची कोल्हेकुई अन् तुफान पावसाच्या आवाजाने भीतीयुक्त वातावरण तयार झाले असतानाही ती आपल्याच विश्वात मग्न होती.
दिसायला गोरी, सडपातळ बांधा, लांबसडक केस अन् घारे डोळे. ती दिसायला खूप सुंदर होती.
"राघव... उठतोस ना!"
"अग, तनु झोपू दे ना यार!" त्याचा आळसावलेला आवाज येताच तनुजाने नाक मुरडले.
“अजिबात नाही हं राघव, आज तुझ्या ऑफिसला सुट्टी आहे आणि म्हणून आपण आज ठरवलं आहे की बाहेर जायचे. विसरला तर नाही ना तू?"
“तनुजा यार आताच तर सात वाजलेत ना! जाऊया दहा वाजता मग तर झालं ना!"
“बर ठीक आहे. मी तोवर नाष्टा बनवते.”
“हम्म...” राघवने हुंकार भरला अन् तो पुन्हा झोपेत मधगुल झाला. तनुजा देखील फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली.
हे आहेत तनुजा आणि राघव. यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झालेय. तनुजा ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. राघव एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर जॉब करतोय. याचं लग्न हे घरच्या लोकांच्या पसंतीने झाले आहे, तरीही दोघे त्यांच्या संसारात खुश आहेत.
दोघेही पुण्यात भाड्याने रहात होते. राघवला आपले स्वतः चे घर घ्यायचे होते, पण गावी असणारा त्यांचा बिझनेस मध्यंतरी बंद पडल्यामुळे त्याने जमवलेला सगळा पैसा तो बिझनेस पूर्ववत करण्यासाठी खर्च केला होता. आपल्या गावात त्याने स्वतःच्या कौशल्याने शेतकरी ब्रँड नामक छोटा बिझनेस उभारला होता. तो अख्ख्या गावाचा आधार बनला होता. छोट्या छोट्या शेतकऱ्यांना यातून रोजगार मिळायचा; त्यामुळे अख्खं गाव या बिझनेसमध्ये आपले कौशल्य खर्ची करत होते.
आई, वडील आणि एक मोठा भाऊ हे राघवचे कुटुंब. वडिलांनी चार वेळा गावाचा सरपंच म्हणून निवडून येण्याचा मान मिळवलेला; त्यामुळे त्याच्या शब्दाचा सर्व गावकरी सन्मान करीत आणि मोठा भाऊ राघवने उभारलेल्या या व्यवसायाकडे जातीने लक्ष देत असे. एकंदरीत सर्व काही ठीक होतं. कोणाला कसलाच त्रास नव्हता की टेन्शन नव्हतं.
घड्याळात नऊचा ठोका पडताच राघव खडबडून जागा झाला. रोज सकाळी सहा ते रात्री आठ त्याची कामाची वेळ ठरलेली असे. कधी कधी तो उशिराही घरी येई. आज रविवार म्हणून ऑफिसला सुट्टी असल्याने तो निर्धास्त होऊन झोपला होता. पूर्ण सहा दिवस घरात बसून बसून बेजार झालेल्या तनुजाला आज बाहेर फिरायला न्यायचं अस त्याने कालच ठरवलं होतं अन् रात्री हे तनुजाला त्याने सांगितलंही होतच; त्यामुळेच ती आज पाच वाजताच उठून बसली होती. बाहेर जायचं या विचाराने बिचारी रात्री झोपलीच नव्हती. अन् सहापासून तिचा राघवच्या मागे उठ उठ म्हणून भुंगा सुरू होता.
राघवने बाथ घेतला अन् तो नाष्टा करण्यासाठी बसलाच होता की, त्याचा फोन वाजू लागला. त्याने फोनकडे पाहिलं अन् लगेच उचलला. तो फोन त्याचा मित्र केदारचा होता.
"हॅल्लो केदार…"
राघव फोन उचलून बोलू लागला. आता मित्रांचे बोलणे सुरू असल्याने बिचाऱ्या तनुजाने नाष्टा खाण्यावर फोकस केलं.
तब्बल अर्धा तास या दोन्ही मित्रांचे बोलणे सुरू होते आणि ते बोलणे कधी संपते याची तनुजा हनुवटीला हात ठेऊन वाट बघत होती.
राघव फोन उचलून बोलू लागला. आता मित्रांचे बोलणे सुरू असल्याने बिचाऱ्या तनुजाने नाष्टा खाण्यावर फोकस केलं.
तब्बल अर्धा तास या दोन्ही मित्रांचे बोलणे सुरू होते आणि ते बोलणे कधी संपते याची तनुजा हनुवटीला हात ठेऊन वाट बघत होती.
थोड्याच वेळात राघवने फोन ठेवला आणि तनुजाकडे पाहिलं. बिचारी वैतागलेल्या चेहऱ्याने टीव्ही पाहत होती. ते पाहून त्याला तिचं हसूच आलं. पहाटे पाचपासून बाहेर जायचं म्हणून किती आनंदात होती वेडी. राघव गालात हसत पुटपुटला.
“तनु...”
"झालं का बोलून? की अजून काही बाकी आहे?” तिने थोड्या नाराजीने विचारले.
“सॉरी ना तनु, खूप महत्वाचं बोलायचं होतं. आठवडा सगळा कामात जातो; म्हणून आज थोडा वेळ निवांत बोलत होतो केदारशी. यात माझं काही चुकलं का?”
त्याच ही बरोबरच होतं म्हणा. त्याचा आठवडा त्याच्या ऑफिस मधेच जायचा; त्यामुळे कोणाशी तितके बोलणे होत नव्हते. त्यामुळे रविवारी एखाद्या मित्राशी राघव निवांत बोलयचा आणि तनुजा आपल्या कामात बिझी होऊन जायची. त्याच्यासाठी ती त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून त्याला खाऊ घालत असे.
दोघ नवरा बायकोचा सुखाचा संसार सुरू होता, पण नियती असं काही चक्र फिरवणार होती, की दोघांच्या सुखी संसाराच्या लवकरच चिंध्या होणार होत्या आणि याची त्या दोघांना तसूभरही कल्पना नव्हती.
कथेच्या सुरवातीस दिसलेली ती कोण? याचे रहस्य लवकरच उलगडेल तोवर वाचत रहा.
क्रमशः…
©®सविता पाटील रेडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा