Login

सुखाचा कळस भाग १

सुखाचा कळस भाग १
सुखाचा कळस भाग १

" बाबा, अहो बघा ना, बाहेर फुगेवाला आलाय ! फक्त पाच रुपये... आम्ही दोघं मिळून एकच घेऊ आणि मिळून खेळू, प्लीज!"

धाकट्या सुमितचे डोळे आशेने चमकत होते. मोठा मुलगा समीरही आडोशाला उभा राहून बाबांच्या चेहऱ्यावरील बदल टिपत होता. समोर खुर्चीत बसून विवेक शांतपणे वर्तमानपत्राचं पान उलटत होता. सुचित्रा स्वयंपाकघरातून हे दृश्य पाहत होती, तिला माहीत होतं पुढे काय होणार आहे, तरीही एक छोटीशी आशा तिच्या मनातही डोकावून गेली.
विवेकने वर्तमानपत्र खाली केलं, चष्म्याच्या वरून सुमितकडे पाहिलं आणि अतिशय शांत स्वरात म्हणाला,

"सुमित, फुग्यात काय असतं ? फक्त हवा. पाच रुपये देऊन ती हवा विकत घ्यायची आणि पाच मिनिटांत तो फुगा फुटला की त्या पैशांची माती. त्यापेक्षा पाच रुपयांची सुजी आणली तर आई त्याचा शिरा करेल, जो पोटात तरी जाईल. जा, अभ्यासाला बसा."

सुमितचा चेहरा पडला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरारलं. तो मुकाट्याने आतल्या खोलीत निघून गेला. सुचित्राला राहवलं नाही, ती बाहेर आली आणि म्हणाली,
" अहो, लहान मुल आहे ते. पाच रुपयांनी काय तुमचं बजेट कोलमडणार होतं का.? सण-वार आहे आज, निदान मुलांचं मन तरी जपायचं ! "

" सुचित्रा, थेंबे थेंबे तळे साचे. आज पाच रुपये फुग्याला दिले, तर उद्या तो पाचशेच्या खेळण्याला हात घालेल. शिस्त ही सुरुवातीपासूनच लावावी लागते." विवेकने निर्विकारपणे उत्तर दिलं आणि तो पुन्हा हिशोबाच्या डायरीत डोकं खुपसून बसला.

विवेक आणि सुचित्रा एका मध्यमवर्गीय भाड्याच्या घरात राहत होते. घरात दोन मुलं, आणि विवेकचे वृद्ध आई-वडील, विनायकराव आणि सावित्रीबाई. घराचं वातावरण तसं प्रेमळ होतं, पण विवेकाच्या मोजून मापून वागण्यामुळे घरात एक प्रकारचा तणाव असायचा.

विवेक एका खाजगी कंपनीत नोकरीला होता, तर सुचित्रा एका शिवणकामाच्या दुकानात कामाला जायची. दोघांचा पगार हातात आला की, विवेक पहिल्यांदा सगळा हिशोब मांडायचा. सुचित्राला तिच्या स्वतःच्या पगारातील एक रुपयाही खर्च करायची मुभा नसायची.

" सुचित्रा, आज भाजी आणताना कोथिंबीर कशाला घेतली ? बाजारात भाव वाढलेत ना ? जेवणात थोडी कमी टाकली असती तर बिघडलं नसतं."

हे त्याचं वाक्य नित्याचंच होतं. आई सावित्रीबाईंना कधी एखादी साधी सुती साडी हवी असली, तरी विवेकचं उत्तर ठरलेलं असायचं.

"आई, कपाटात आहेत ना दोन साड्या ? मग तिसरीची गरज काय ? गरजा पूर्ण कराव्यात, हौस नाही."

एके दिवशी विनायकरावांची तब्येत थोडी खालावली होती. त्यांना बाहेरून काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली. त्यांनी सुमितला हळूच सांगितलं,

" जा रे बाळा, आजोबांसाठी दोन वडापाव घेऊन ये."
सुमित पैसे घ्यायला आईकडे गेला, पण विवेकने ते ऐकलं.

" बाबा, वडापाव तेलकट असतो. शरीराला अपायकारक आणि खिशालाही. घरी सुचित्राने उपमा केला आहे, तोच खा. उगाच बाहेरच्या अन्नावर पैसे उधळू नका."

विनायकराव काही बोलले नाहीत, त्यांनी फक्त एक दीर्घ श्वास सोडला आणि भिंतीकडे तोंड करून झोपले. घरातील प्रत्येकाचं मन कुठेतरी ओरबाडलं जात होतं.

विवेकाची ही वागणूक केवळ कंजूसपणाची होती की त्यामागे काही गणित होतं, हे कोणालाच उमजत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र मान्य करावी लागायची.त्याने घराच्या मूलभूत गरजांत कधीही काटकसर केली नाही.

मुलांना वेळेवर दूध मिळत होतं, सर्वांचे कपडे नीटनेटके होते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या शाळेची फी तो नेहमी वेळेच्या आधी भरत असे.

" बाबा, मला सहलीला जायचं आहे. वर्गातले सगळे मित्र जातायत." समीरने एकदा विचारलं.
विवेकने फीचं पत्र पाहिलं आणि म्हणाला,

" सहल म्हणजे काय ? फक्त फिरणं. त्याऐवजी मी तुला विज्ञानाचं नवीन पुस्तक आणून देईन, जे तुला परीक्षेला उपयोगी पडेल. सहलीवर खर्च करण्यापेक्षा ज्ञानात भर टाकणे कधीही श्रेष्ठ."
समीर चिडला.

" तुम्ही फक्त पैशांचा विचार करता बाबा.! तुम्हाला आमच्या आनंदाशी काहीच देणंघेणं नाही. तुम्ही फक्त आकड्यांच्या जगात जगता !." तो तावातावाने बाहेर निघून गेला.

सुचित्राने विवेकाला समजावण्याचा प्रयत्न केला,

" अहो, मुलं मोठी होतायत. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण होतोय. काय करणार आहात इतके पैसे साठवून ? सोबत थोडीच नेणार आहोत ? "

विवेकने सुचित्राकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती, जी कदाचित कोणालाच वाचता येत नव्हती. तो संथपणे म्हणाला,

" सुचित्रा, आज जे भाड्याचं घर आपण देतोय ना, त्याचं भाडं भरताना माझ्या काळजात धस्स होतं. आपण दुसऱ्याच्या भिंतींना रंग लावतोय. मला माझ्या मुलांना अशा जगात सोडायचं नाहीये जिथे दर महिन्याच्या एक तारखेला त्यांना घर मालक उभा असलेला दिसेल. तुम्हाला वाटतंय मी कंजूस आहे ?
ठीक आहे, मला ते मान्य आहे. पण संयम आणि काटकसर हे मध्यमवर्गीयांचे सर्वात मोठे शस्त्र आहेत, हे विसरू नकोस."

अशीच अनेक वर्षे उलटली. विवेकाच्या या वागण्याला आता घरातले सगळे सरावले होते. बाबांना विचारून काही फायदा नाही हे मुलांनीही पक्कं केलं होतं. विवेक मात्र आपल्या नियमांपासून तसूभरही ढळला नाही. त्याने स्वतःसाठी कधी नवीन छत्री घेतली नाही की सुचित्राला कधी सोन्याचा दागिना.

घरात शांतता राहावी म्हणून मुलांनी आणि आई-वडिलांनी आपल्या इच्छा मारून जगायला सुरुवात केली.

पण विवेकाच्या या शिस्तीचा एक सकारात्मक परिणाम असा झाला की, मुलं अभ्यासात खूप हुशार निघाली. त्यांना चैनीची सवय नसल्यामुळे त्यांनी कष्ट करायला सुरुवात केली.

समीरला एका नामांकित कंपनीत चांगली नोकरी मिळाली, मुलगीही लग्नाच्या वयाची झाली.
आज विवेक निवृत्त झाला होता.

त्याचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते, चेहरा थकलेला होता, पण त्याच्या हातातील ती हिशोबाची डायरी आजही तशीच होती.
निवृत्तीच्या दिवशीही त्याने ऑफिसमध्ये कोणतीही पार्टी दिली नाही की घरी आल्यावर गोडधोड केलं नाही.

" आता तरी बदला बाबा ! आता तर तुमची नोकरीही संपली, समीरला चांगला पगार आहे, आता तरी मोकळेपणाने जगा ! " लेक वैतागून म्हणाला.

विवेक फक्त हसला आणि म्हणाला,
"उद्या सकाळी लवकर तयार राहा. आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. समीर, तू गाडीची व्यवस्था कर."

सगळ्यांना वाटलं, कदाचित निवृत्तीनंतर बाबांना देवदर्शनाला जायचं असेल. पण त्यांना काय माहीत होतं की, गेल्या तीस वर्षांपासून जो माणूस फुग्यासाठी पाच रुपये द्यायला नकार देत होता, तो त्यांच्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी भेट तयार करून बसला होता.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all