Login

सुपर मम्मी

मुलांना स्वावलंबी करा.
सुपर मॉम ही संकल्पना आधुनिक काळात जास्तच प्रचलित झाली आहे. सुपर मॉम नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून घरातले स्वयंपाक पाणी, आले गेल्यांचा पाहुणचार, सणवार व घरातल्या सर्व व्यक्तींच सगळ अगदी मनापासून व आनंदाने करते. आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या इतर कलागुणांकडे, तिचे लक्ष असते. मुलानं बरोबर खेळणे, बाहेर फिरायला जाणे  व त्यांच्याशी सगळ्या विषयांवर गप्पा मारणे.  म्हणून तिचे खूपच कौतुक केले जाते. चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे आपली आई व आजी नोकरी व्यवसाय न करता फक्त घरातील कामे करत होत्या म्हणून त्या सुपर मॉमच्या संकल्पनेत बसत नाही अस नाही.


                आपली आई व आजी पण त्या काळच्या सुपर मॉमच होत्या. आपल्या आजीचा काळ म्हणजे अर्धा डझन मुलांचा. त्यात घरात एकत्र फॅमिली, स्वयंपाकघरातील सगळी काम हातानेच करावी लागत. सगळे सणवार सोवळ, ओवळ पाळून करावे लागत असे. घराबाहेर पडण्याच स्वातंत्र्य नाही. स्वतः चा विचार मांडण्याचे पण स्वातंत्र्य नव्हते. एवढ्या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा आजीचं आपल्या मुलांकडे लक्ष असायचे. आजी शिकलेली नसली तरी तिला व्यावहारिक ज्ञान खूप होते. कोणाला काय आवडते?कोण खोडकर आहे? कोण शांत आहे? कोण चुका करत आहे?  ह्या सगळ्यांकडे तिच लक्ष असे. ज्या मुलांनी चूक केली असेल त्याला शिक्षा करणे. आपली आई दिवसभर भेटत नसली तरी  एवढ्या सगळ्या व्यापातून आपल्या वाढदिवसाला आपल्या आवडीचा स्वयंपाक करते ह्याचा मुलांना खूप आनंद असे.


              आपल्या आईचा काळ म्हणजे आपली आई शिकलेली आई होती. थोडं फार  बाहेरच जग बघितलेले होते. मुलांचा गोतावळा अर्धा डझनवरुन तीन मुलांपर्यंत आला होता. एकत्र फॅमिली जाऊन विभक्त फॅमिली अस्तित्वात येत होती. काही आया घरातलं व नोकरी सांभाळून आपल्या मुलांच सगळ करत होत्या. आपल्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांच्या शाळेत त्यांच्या शिक्षकांशी बोलत होत्या. मुलांचा गोतावळा कमी  म्हणून मुलांशी संवाद वाढून त्यांच्याशी मैत्रीच नात निर्माण व्हायला लागलं होत. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कुठलं शिक्षण चांगले ह्याचा विचार ती करु शकत होती.

                

                जगातली प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी सुपर मॉमच असते. आई शिकलेली असो किंवा न शिकलेली त्याने काही फरक पडत नाही. हल्ली आई एवढेच बाबा पण घरात लक्ष देतात. मुलांच सगळं करतात. पण ते आईची जागा घेऊ शकत नाही.


              काही मुलांना प्रत्येक कामासाठी आपली आई हवी असते. आई पण मुलगा लग्नाच्या वयाचा होईपर्यंत किंवा लग्न झाल्यानंतरही  त्याची सगळी कामे करायला तयार असतात. त्यामुळे ते मम्मी बॉय होतात. काही मुले लग्नानंतर आईसारखे आपली सर्व कामे बायकोने करावी अशी अपेक्षा करतात. पण सध्याच्या काळातील बायका नवऱ्याची कामे करायला तयार नसतात. त्यामुळे त्यांच्यात वाद होतात.

                
                  खरं म्हणजे आईने सुपर मॉम होण्याच्या नादात आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून जाऊ नये. आपल्या मुलांना स्वतःची काम स्वतः करु द्यावे. मुलांची काम स्वतः करून त्यांना अपंग करु नये. बाहेरच्या जगात गेल्यावर त्यांना त्यांची कामे स्वतःच करावी लागणार आहे.