अपघाताला कंपनी जबाबदार नसल्याने , अविनाशला कंपनी कडून काहीच पैसे मिळाले नव्हते. केवळ सौजन्य म्हणून सह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून पैसे दिले होते. ते हजार दीड हजार रुपये भरले असतील. त्यातून तिचा दैनंदिन खर्च निदान काही दिवस तरी भागला होता.तशी ती फार मोठ्या गावात राहात नव्हती. पायांना चटके बसत होते. नैनाचं बोट धरून ती दिशाहीन पणे चालली होती. आता ती दमली होती. घरापासून एका लांबच्या वळणावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसली. तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळू लागली . पदर तोंडाला लावून मुठीत नाक पकडून ती मुसमुसू लागली. एका हातामे नैनाला तिने अधीरपणे कवटाळले. आणि तिचा बांध फुटला. आता मात्र तिच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. काही मिनिटे अशीच बसून ती सुन्न होऊन राहिली. पहिला प्रश्न तिला कुठे जायचं हा होता. अविनाशचे किंवा तिचे या गावात कोणीच नातेवाईक नव्हते. नाही म्हणायला तिची आत्या होती. पण आत्या दोन वर्षांपूर्वीच गेली होती. आत्याचं नाव मनात येताच तिला मागचं सर्वच आठवू लागलं. मनाचा वेग एवढा असतो की काही वर्षसुद्धा काही मिनिटात डोळ्यासमोरून जातात. तिचं तसच झालं.
ती पुन्हा हाक मारणार तेवढ्यात प्रभामामा बाहेर आला.त्याच्या अंगावर फक्त धोतर आणि गळ्यात जानवं होतं. तुपकट चेहेऱ्याचा मामा त्याच्या हिरवट डोळ्यांमुळे लबाड वाटायचा. तो जेवढा गोरा होता तेवढाच बेरकी होता. कदाचित त्याच्या धंद्यात हा बेरकीपणा लागत असावा. त्याला सबंध टक्कल होतं आणि डोक्याच्या मागच्या बाजूला अर्धचंद्राकृती पांढरे केस होते. थोडक्यात त्याचा अर्धा चांद उतरला होता आणि अर्धा बाकी होता. थोडेसे दात पुढे असलेला मामा छातीवरचे केस कुरवाळित , तिला आपादमस्तक न्याहाळित म्हणाला, " अरे, रेखा तू ? ये. ये. .... अशी न कळवता आणि सामानाशिवाय कशी आलीस ?, काय भानगड आहे ? काय गं ? त्या शितोळ्यानी तुला बाहेर काढली कि काय ? हरामखोर लेकाचा. " रेखाच्या डोळ्यात पाणी तरारलं. ती मानेनेच हो म्हणाली. ...... ती जास्त बोलत नाही असं पाहून मामा म्हणाला., " मला वाटलचं. तरी मी तुला अविनाश गेल्यावर सांगत होतो , तू इथे येऊन राहा. एवढ्या मोठ्या वाड्यात माणसं नाहीत. पण तू ऐकलं नाहीस. तुझ्या आत्याचं तू ऐकलस . आता इलाज नाही तेव्हा मामाची आठवण झाली काय ?.... बरोबर आहे ना ? " रेखाला आठवलं. त्याला आत्या आणि आत्याला तो आवडत नसे. आत्या तिला म्हणायची, "रेखे, हा मामा बायकांकडे कसा बुभुक्षितासारखा बघतो बघ. " पण रेखाला ते पटलं नव्हतं. एवढया प्रेमाने ज्या मामाने मला सोन्याची साखळी दिली तो असा कसा असेल ? पण तिने आपलं मत स्वतः जवळच ठेवलं. आणि आज खरोखरीच मामाचाच आधार घ्यायची वेळ आली . "मी , मी आत येऊ का ? " रेखाने अधीरपणे विचारले. त्यावर मामा म्हणाला, " अगं हे काय तुझं बोलणं झालं ? तुझा मामा इतका काही निर्दय नाही(म्हणजे थोडातरी निर्दय होता). तू असं कर आजच्या दिवस विश्रांती घे. स्वैपाक कर. संध्याकाळी पाच वाजता तुला आणि हिला , काय नाव हिचं ? (रेखाने तिचं नाव सांगितलं. ) नैना ? शांतिलालच्या दुकानातून कपडे घेऊन ये. माझं खातच आहे तिथे. .. चल आत चल., मी अंघोळ करून घेतो. " असं म्हणून तो विहिरी जवळ बांधलेल्या न्हाणीघराकडे गेला.
तिने सर्व वस्तू शोधून स्वैपाक केला. तासाभरातच सगळ्यांची जेवणं झाली. मग सगळेच थोडे लवंडले. पाच वाजून गेल्यावर तिने चहा केला. संध्याकाळी ती शांतिलालच्या दुकानात गेली. मामांना गावात मामाच म्हणत असत. शांतिलालच्या दुकानात तिला अपेक्षेपेक्षा चांगली वागणूक मिळाली. मुळात ती दिसायलाही चांगली होती. मामांकडून आलेली आहे म्हंटल्यावर तिची जास्तच सरबराई करण्यात आली. शांतिलाल शेठचा मुलगा महेश जातीने तिच्याकडे लक्ष देत होता. तिला जरा आश्चर्य वाटलं. आज सकाळच्या प्रकारापेक्षा काही वेगळच अनुभवाला मिळेल असं तिला कोणी सांगितलं असतं तर तिने त्याला गाढवात काढलं असतं. खर्चाची खात्यावर नोंद करून ती घरी आली. तो दिवस तर चांगलाच गेला. मग दैनंदिन जीवन चालू झालं. वाड्याच्या वरच्या मजल्यावर सात आठ खोल्या होत्या. पण त्यांना सर्वांना कुलपं होती. अर्थातच रेखाला वर जाण्याची वेळ आली नाही. तिला उत्सुकता होती. पण तिने मामाला काहीही न विचारण्याचं ठरवलं. त्याला आवडेल न आवडेल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा