Login

स्वरागिनी भाग 1

Marathi Story
स्वरागिनी भाग 1

विषय - तुझेच मी गीत गात आहे.
******

मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं
जाईच्या पाकळ्यास दव अजून सलते गं
मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते गं

टाळ्यांच्या आवाजासह...
"वा!वा! खूपच छान रागिनी तू अगदी थोड्याच दिवसात सुरांवर कमालीचे पकड बसवली आहे. तुझ्या आवाजात तर गोडवा आहेस पण तुझी शिकण्याची इच्छा ही खूप दुर्दम्य आहे."

"थँक्यू गुरुजी! पण गुरुजी पुढचे पंधरा दिवस मी येऊ शकणार नाही. परीक्षा सुरू होणार आहेत."
रागिनी म्हणाली.

"बरं ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही पण घरी मात्र रोज एक तास रियाज चालू ठेव. तुझ्या बाबांचे स्वप्न आहे ना तुला स्टेजवर गाताना बघायचं, ते पूर्ण करायचं असेल तर रियाजाचा कंटाळा करायचा नाही."

"हो सर"..... असे म्हणत रागिनीने मान हलवली.
"बाकीच्यांनीही लक्षात ठेवा हे मी सगळ्यांसाठी सांगतो आहे."
गुरुजी बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणाले. ते पुढे म्हणाले

"आज आपण इथेच थांबू उद्या नेहमीच्या वेळेला या आणि रागिनी तू पंधरा दिवस घरी न चुकता रियाज कर."
*******
"आई ,आई ... म्हणत रागिनीने घरभर आईला शोधले."

"अगं हो ...हो...हळू इकडे मागे आहे मी."

आईला बघून रागिनी म्हणाली
"आई ,बाबा आले नाहीत का अजून?"

"बरं म्हणजे बाबा आले नाहीत का? हे विचारण्यासाठी एवढी आई आई करत आलीस."

"आई ,सांग ना लवकर कधी येतील बाबा. मला की नाही त्यांना खूप छान बातमी द्यायची आहे."

"कोणती बातमी ?जरा आईलाही सांग ना."

"नाही मी बाबा आल्यावरच सांगणार."

"काय सांगणार आहे बाबांना."...

रागिणी च्या मागून आवाज आला.
तसे रागिनीने मागे बघितले आणि बाबा म्हणून तिने त्यांच्या कमरेभोवती आपल्या नाजूक हातांनी मिठी मारली.
मग बाबांनी ही आपल्या लाडक्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारले
"काय सांगायचं होतं?"

"बाबा आज ना मी खूप छान गाणं गायलं. गुरुजींनी माझं खूप कौतुक ही केलं. ते म्हणाले थोड्याच दिवसात तू छान पकड बसवली आहे सुरांवर."

"अरे मग आहेच माझी मुलगी हुशार. "तिचे दोन्ही गाल ओढत बाबा म्हणाले.

रागिणीच्या आईकडे बघत, आपल्या लाडक्या लेकीला कुशीत घेत ते पुढे म्हणाले
"थोडा उशीर झाला ग तुला गाणं शिकवायला नाहीतर आत्ता तू टीव्हीवर गातअसतीस. चल ठीक आहे काही हरकत नाही, अजूनही फार उशीर झाला नाही तू नक्की मोठी गायिका होणार."

"बर बर ठीक आहे.आधी दोघे फ्रेश व्हा.अजून एक माझी लाडाची मैना, आता थोड अभ्यासाकडे पण लक्ष द्या दोन दिवसात परीक्षा सुरू होणार आहेत."

यावर रागिनि आई भोवती गोल गोल फिरत म्हणाली
"हो ग आई तशीही मी आता गुरुजींना सांगून आले आहे की परीक्षा संपेपर्यंत येणार नाही.आणि माझा अभ्यासही चालू आहे."

"ठीके ठीके .... रागु , सोड ग पदर."

रागिनीचे बाबा कौतुकाने हे सगळं बघून हसत होते.

अजून एक गिरकी घेऊन रागिणी फ्रेश होण्यासाठी गेली.

रागिणीची आई तिच्या बाबांना म्हणाली,
" काय तुम्ही?किती तिच्या डोक्यात गाण्याचं खूळ बसवलं आहे."

आपल्या हातातलं घड्याळ काढत रागिणीचे बाबा म्हणाले,
"अग खुळ काय म्हणतेस? तिला देवाची देणगी आहे. किती गोड आवाज आहे तिचा. आपण आधीच तिला क्लासला पाठवायला हवं होतं. तिच्या एवढ्या मुली बघ स्टेजवर गातात. ती ही आत्तापर्यंत ट्रेन झाली असती."

"अहो पण आता पुढचं दहावीचं वर्ष..."

"असू दे ग.... ती अभ्यासही करेल आणि मुळात मी ठरवलं आहे तिला गाण्यातच करिअर करायला लावायचे.
एक ना एक दिवस तू तिला स्टेजवर गाताना बघशीलच. तो दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल."

"तुम्हा बाप लेकीचं स्वप्न लवकर पूर्ण होवो. तुम्ही फ्रेश व्हा मी जेवायला वाढते."
असे म्हणून रागिनीची आई किचन मध्ये गेली.

रागिनी सुरेशराव आणि अनघाची एकुलती एक लाडकी कन्या.
सुरेश राव एका खाजगी कंपनीत नोकरीला होते तर अनघा गृहिणी होती. घरची परिस्थिती साधारण होती. भावाच्या कटकारस्तानामुळे सुरेश रावांना वडिलोपार्जित संपत्ती सोडावी लागली होती. त्यामुळे महिन्याला येणाऱ्या पगारावरच सगळी भिस्त होती.

रागिणी एक चुणचुणीत मुलगी होती. एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही आपल्या स्वभावाने आणि गोड आवाजाने ती आपलेसे करून घेई.ती बारा- तेरा वर्षांची असताना सुरेशरावांना तिच्या आवाजातील जादू आणि तिची गाण्याकडे असणारी ओढ लक्षात आली.तेव्हापासून त्यांनी आपल्या मुलीला गायिका बनवायचे ठरवले होते.
मुळातच गाण्याची आवड असल्याने रागिनिनेही आपल्या बाबांच्या स्वप्नाला आपले स्वप्न बनवले होते.त्यासाठी पूर्ण कष्ट घेण्याचे तिची तयारी होती.

दिवस पालटत होते तसतशी रागिनी चे गाणे आता चांगलेच रंगू लागले होते. ऐकणाऱ्याला जागेवरच थांबून ठेवण्याची ताकद तिच्या आवाजात होती.

थोड्याच दिवसात तिला एका संगीत महोत्सव कार्यक्रमात गायनाच्या स्पर्धेनिमित्त स्टेजवर गाण्याची संधी मिळाली. रागिनी चा हा पहिलाच कार्यक्रम होता. यामुळे रागिनीच नाही तर सुरेश राव आणि अनघा खूप खुश होते. त्या कार्यक्रमात बरेच प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार होते. मोठे संगीताचे जानकारही येणार होते. या संधीचे सोने करायचे हा विचार करूनच रागिनी या स्पर्धेची तयारी करत होती. तिच्या गुरुजींनी ही तिच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली होती.

स्पर्धेचा दिवस उजाडला. कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होता. अनघा आणि रागिनी एकत्रित तिथे पोहोचल्या होत्या. सुरेशराव ऑफिस मधून सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार होते.

रागिनीचे लक्ष बाबांच्या वाटेकडे लागले होते. स्पर्धा सुरू होण्याआधी पोहोचतो असे बाबांनी तिला सांगितले होते पण आता स्पर्धा सुरू होऊन पंधरा-वीस मिनिट उलटले तरी बाबा आले नाहीत हे बघून रागिनीची घालमेल होत होती. तिचे अर्धे लक्ष स्पर्धेकडे तर अर्धे लक्ष बाबांच्या वाटेकडे होते. तिचा केविलवाना चेहरा पाहून अनघा तिच्याजवळ गेली आणि तिला समजावत म्हणाली

" रागु बाळा काळजी करू नकोस बाबा इतक्यात येतीलच."

नाराज झालेली रागिनी थोड्याशा तक्रारीच्या स्वरात म्हणाली
"आई ,मी बाबा आल्याशिवाय जाणार नाही स्टेजवर गायला."

"अगं वेडाबाई असं करतात का?. या दिवसाची तू आणि बाबा कधीपासून वाट बघत होतात. तू तुझ्या वेळेला गायला गेली नाहीस तर बाबांना किती वाईट वाटेल. तू आता फक्त तुझ्या गाण्याकडे लक्ष दे."

आईने समजावले तरी रागिनीची लक्ष सगळे मेन गेट कडे लागले होते पटकन गेटमधून बाबा आत येतील असे तिला वाटत होते.

रागिनी चा नंबर जवळ येत होता. आता अनघाचीही धाक- धुक वाढली होती. आतापर्यंत रागिणीच्या बाबांनी पोहोचायला पाहिजे होते, या विचारात असतानाच तिला सुरेश रावांचे मित्र येताना दिसले.
अनघा पुढे होऊन म्हणाली
" राकेश भाऊजी अहो हे कुठे आहेत? गाडी लावताय का? बरे झाले तुम्ही दोघं आले रागिनी नुसती कावडी पावरी झाली होती."

राकेश घाईत दिसत होता. घाबरलेल्या स्वरात तो म्हणाला
" वहिनी, तुम्हाला माझ्याबरोबर लगेच यावे लागेल सुरेश चा एक्सीडेंट झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे."

हे ऐकून अनघाच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती मोठ्याने ओरडली
" काय एक्सीडेंट.... अहो पण कसं काय?"

" आधी तुम्ही चला. मी सांगतो सगळं. रागिनीला घ्या."

अनघाच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला होता, तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि रागिणीला घेऊन तिथून निघाली.
रस्त्याने रागिणीला घडलेला प्रकार समजला ते ऐकून ती मोठ्याने रडायला लागली. अनघा कशी बशी तिला समजावन्याचा प्रयत्न करत होती. पूर्ण रस्ताभर
सुरेशचा एक्सीडेंट ऑफिस समोर झाला याव्यतिरिक्त राकेश एक शब्दही बोलला नव्हता. अनघा देवाचा धावा करत होती.
दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. डॉक्टरनी त्यांना लगेचच पेशंटच्या रूममध्ये पाठवले. सुरेशच्या डोक्याला मार लागला होता . त्याचे वाचणे शक्य नव्हते. तो शुद्धीत नव्हता त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

" बाबा उठा ना बाबा उठा ना. आई बाबा डोळे का उघडत नाहीत?"
असे म्हणून रागिनी रडत होती.

अनघाच्या तोंडून तर शब्द फुटत नव्हता. ती सुरेश ची परिस्थिती विचारायला डॉक्टरांकडे गेली

" डॉक्टर काय झाले आहे. सुरेश अजून शुद्धीवर नाही."

इकडे व्हेंटिलेटर चा आवाज येऊ लागला
डॉक्टर आणि अनघा सुरेश च्या दिशेने धावले. अखेर एक दोन मिनिटातच स्क्रीनवर येणाऱ्या लाईन्स बंद झाल्या. सुरेश चा श्वास थांबला.

क्रमशः

*******
काय होईल पुढे? ओढवलेल्या परिस्थितीतून अनघा आणि रागिनी स्वतःला सावरू शकतील का? वाचू पुढच्या भागात.