Login

स्वप्नांच्या शहरातून गावाकडे भाग -1

स्वप्नांच्या मागे शहरात गेलेला मनीष, संघर्षातून शिकतो की खरं सुख पैशात नाही, तर आपल्या माणसांत असतं.शेवटी तो गावात परत येऊन स्वतःचं छोटं पण समाधानाचं आयुष्य उभारतो.
स्वप्नांच्या शहरातून गावाकडे
भाग – 1

मनिष गरीब मुलगा. शहरातल्या चांगल्या गोष्टी ऐकून त्यालाही शहरात जायचे होते. त्याला मोठ्या बिल्डिंग्स खूप आवडायच्या. त्याची खूप मोठी स्वप्ने होती, ती त्याला शहरात गेल्यावर पूर्ण करायची होती.

"मनिष, साखर घेऊन ये," त्यांची आई म्हणाली.

"आई, मला असे काम नको गं. सांगत जाऊ, मी शहरात जाऊन मोठ्या कंपनीत काम करणार आहे," मनिष म्हणाला.

"हो, तू शहरात जा, खूप मोठ्या कंपनीत काम कर. पण आधी साखर घेऊन ये," त्यांची आई म्हणाली.

मनिष साखर घेण्यासाठी गेला.

त्यांची आई हसत कामाला लागली. "कसले खूळ डोक्यात घेतले आहे, शहरात जाऊन काम करायचे!" ती स्वतःशीच बोलत घरातील काम करत राहिली.

मनिष साखर घेऊन आला.

"आई, मी आता दुकानात जातो," मनिष म्हणाला.

त्यांच्या बाबांचे कपड्यांचे दुकान होते. तो दुकानात पोहोचला. खूप ग्राहक होते. त्यातला एक शहरातला माणूस होता. तो शहरातल्या गोष्टी सांगत होता.

मनिषही मन लावून त्याचे बोलणे ऐकत होता आणि साड्या दाखवत होता. खूप साड्या त्याने विकल्या होत्या. काम खूप करायचा,  मेहनती होता. तो दुकानात आल्यावर खूप काम हलके व्हायचे. त्यांच्या बाबांना त्याच्यावर खूप अभिमान वाटायचा.

त्यांना वाटायचे, "माझ्या नंतर मनिषनेच हे दुकान चालवावे." पण मनिषला शहरात जायचे होते.

ते नकळत हसून म्हणायचे, "जा रे, तू खूप मोठा हो."

मनिष दुकानात काम करत असतानाच त्या शहरातल्या माणसाकडे गेला.

"काका, तुम्ही शहरात राहता का?" मनिष म्हणाला.

"हो, मी शहरात राहतो," तो माणूस म्हणाला.

"मला पण जायचे आहे," मनिष म्हणाला.

"नक्की जा. तुझी राहायची सोय होईल," तो माणूस म्हणाला. त्याच्याकडे रूम्स होत्या, अशा नवीन येणाऱ्या मुलांना तो देत असे, आणि त्याचाही फायदा होत असे.

"थँक्यू, काका! मी नक्की येईन," मनिष म्हणाला.

त्या काकांनी फक्त हसून प्रतिसाद दिला आणि त्याला त्यांचे कार्ड पण  दिले,   आणी  नंतर आपल्या घरीकडे निघाले.

मनिष पुन्हा दुकानात आला. तिथे काम केले.

नंतर त्यांचे बाबा दुकान बंद करून तो आणी बाबा घरी गेले.

घरी गेल्यावर मनीषचे बाबा फ्रेश झाले. आईने जेवण बनवून ठेवले होते. ते तिघे जेवायला बसले. गप्पा मारत मारत त्यांचे जेवण झाले. आईने सगळं आवरून घेतलं.

मनिषने बॅग भरायला घेतली. आई आवरून आली. बाबा मनिषकडे बघत होते, पण काही बोलले नव्हते.

आई मनिषजवळ गेली.
"मनिष, बॅग भरत आहेस? कुठे जात आहेस? तू काही सांगितले पण नाहीस!" त्या म्हणाल्या.

"आई, आज दुकानात एक माणूस आला होता. तो शहरात राहतो. त्याने कार्डही दिले आहे. तिथे राहायची सोय होईल. मी शहरात जाऊन नोकरी करेन," मनिष म्हणाला.

"तू खरंच शहरात जात आहेस का?" आई म्हणाली.

"मी तुम्हांला सगळं सांगणारच होतो, तोवर तूच माझ्या जवळ आलीस," मनिष म्हणाला.

आईचे डोळे भरून आले. मनिष आनंदी होता म्हणून त्यांनी पटकन डोळे पुसले आणि बाबांच्या जवळ जाऊन बसल्या.

"तुम्ही बोलून बघा ना, शहरात एकटा कसा राहील, काय खाईल, त्याला काही बनवता येत नाही!" आई म्हणाल्या.

"त्याला जायचं आहे, जाऊ दे. असं अडवू नकोस. बघ, तो किती आनंदी आहे! आपल्याला भेटायला येत जाईल. आपण छोटा फोन घेऊ, त्याला फोन करत राहू," बाबा म्हणाले.

मनिषने बॅग भरून साईडला ठेवली. आई, बाबांसोबत गप्पा मारल्या आणि त्यांच्या जवळच झोपला.

सकाळी आई लवकर उठली. त्याच्यासाठी डब्बा बनवला, मस्त पॅक केला आणि बॅगेत ठेवला.

मनिषने आई, बाबांच्या पाया पडून नमस्कार केला. तो शहरात जायला निघाला. त्यांचे आई, बाबा त्याच्याकडे बघत राहिले.
बाबा पण तयार झाले आणि दुकानात गेले.