Login

टाळी एका हाताने वाजत नाही - भाग -2

Taali
एका हाताने टाळी वाजत नाही.


भाग -2


एके रात्री मंगलाच्या अचानक छातीत दुखू लागलं.
सौरभने पटकन गाडी काढली आणि तिघे हॉस्पिटलमध्ये धावत गेले.


पूजा पण क्षणभरही मागे राहिली नाही. तिनेच धावपळ केली,डॉक्टरांशी बोलली, मेडिकलमध्ये औषधं घेतली, रात्रीभर जागी राहिली.


सकाळी मंगला शुद्धीवर आली, आणि तिला जाणवलं — तिच्या पलंगाशेजारी बसलेली पूजा होती.
तिच्या डोळ्यात थकवा आणि काळजी दोन्ही दिसत होते.

“पूजा...तू... रात्रभर जागलीस का?”
“हो आई, मी इथेच आहे तुम्ही आराम करा.”


त्या एका वाक्यात सगळं बदललं.
मंगलाच्या डोळ्यांत पाणी आलं. तिला जाणवलं — हीच ती सून जिच्यावर ती रोज टीका करत होती, पण संकटात मात्र पहिल्यांदा धावली तीच.


त्या रात्री सौरभ बाहेर गेला होता. मंगलाने पूजाला हळू आवाजात विचारलं,
“पूजा, तू मला माफ करशील का गं?”
पूजा थोडी थबकली. “आई, असं का म्हणताय? मी काही राग धरून बसले नाही.”


मंगला म्हणाली, “आपण दोघीही चुकलोय गं. मी नेहमी तुझ्यात माझं प्रतिबिंब शोधलं. पण तू माझी सून नाही, तू माझ्या मुलाची जोडीदार आहेस. तुझं वेगळं मन आहे, वेगळे विचार आहेत. आणि मी ते कधी समजून घेतलेच नाही.”


पुजाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली,
“आई, एका हाताने टाळी वाजत नाही म्हणतात ना? आपण दोघीही प्रयत्न करायचे थांबवले म्हणून घरातली शांतता हरवली. पण अजून वेळ गेली नाही.”


त्या क्षणी दोघी एकत्र आल्या — एकीने आपला अहंकार सोडला, आणि दुसरीने आपला राग.


मंगला घरी परतल्यावर घरात पुन्हा हास्य उमटलं.


सौरभ आश्चर्यचकित होता.
मंगला म्हणाली, “सौरभ, आजपासून चहाची जबाबदारी माझी नाही, तुझ्या बायकोची आहे. आणि मी तिचं कौतुक करणार आहे.”


थोड्याच दिवसांत पूजाने मंगलाला फोन वापरायला शिकवलं, ऑनलाईन भजनं युट्युबवर दाखवली, एकत्र जेवणं सुरू झाली.
शेजारणी म्हणायच्या, “मंगला ताई, तुम्ही आणि सून इतक्या गप्पा मारता, छान दिसतं.”


एका संध्याकाळी देवघरात मंगला म्हणाली,
“देवा, आम्ही दोघी जरी वेगळ्या होतो, तरी तू आम्हाला एक केलंस.”

पूजा हसत म्हणाली,
“आई, खरंच, एका हाताने टाळी वाजत नाही… पण जेव्हा दोन मनं एकत्र येतात, तेव्हा त्या टाळीचा आवाज प्रेमाचा असतो.”


सगळं छान सुरु होतं, आणि लग्नानंतर तीन वर्षांनी पूजा गरोदर राहिली, घरात आनंदीआंनद सुरु झाला.


नऊ महिन्यांनी पूजाला मुलगा झाला. मुलाचं नावं आदित्य ठेवण्यात आलं, काळ भरभर पुढे सरकत होता, आदित्य मोठा होतं होता.


मंगला आता वृद्ध झाली होती, पण तिचा उत्साह अजूनही कायम होता.
महिला मंडळ, भजनं, हे सगळं चालू होतं.



पूजा तिच्यासोबत खंबीरपणे होती. दोघींचं नातं आता इतकं घट्ट झालं होतं की लोक म्हणायचे,
“मंगला ताई आणि पूजा – जणू आई-मुलगीच!”


    काळाबरोबर जग बदललं जातं होतं, पण जीवन कधीच एकाच रंगात राहत नाही…


सौरभ आणि पूजाचा मुलगा आदित्य आता इंजिनिअर झाला होता.
घरात सगळं सुखात होतं...


आदित्यचा विवाह साक्षी नावाच्या मुलीशी झाला.


साक्षी हुशार, आधुनिक, पण थोडी स्वतंत्र स्वभावाची.
तिचं बालपण शहरात गेलं होतं, त्यामुळे पारंपरिक बंधनं तिला थोडी परकी वाटायची.


लग्नाच्या सुरुवातीला सगळं सुरेख चाललं.
मंगला साक्षीला प्रेमाने मार्गदर्शन करायची, पूजा सगळं समजून घेऊन तिच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होती.


पण काही आठवड्यांतच… छोट्या छोटया गोष्टींचं ओझं वाढायला लागलं.


एकां सकाळी — पूजा देवघरात आरती करत होती.

साक्षी तेवढ्यात ऑफिसला निघाली.

मंगलाने प्रेमाने सांगितलं,
“बाळा, देवाला नमस्कार करून जा ना, ”

साक्षी थांबली, पण तिला घाई होती.
“आज मिटिंग आहे.” मी घाईत आहे आजी..उदया नमस्कार करते. असं बोलून ती निघून गेली.


ती गेली, पण मंगलाच्या चेहऱ्यावर उदासी आली.
“आजकालची मुलं सगळं करतात, पण देवाच्या पायाशी नमस्कार करायला वेळ नाही.”

पूजा तिच्या जवळ आली, आणि म्हणाली.
“आई, साक्षी चांगली आहे अहो. पण तिचं जगणं थोडं वेगळं आहे. आपणही तसं समजून घ्यायला हवं.”

मंगला हसली.
“मला माहीत आहे बाई, पण कधी कधी वाटतं, काळ बदलला की आपली परंपराही हरवते का?


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नात्याची पुनरावृत्ती होते की हे नातं अजून दुरावलं जातं)
0

🎭 Series Post

View all