Login

फालतू चर्चेचा काळा प्रवाह...

नकोत्या गोष्टींना उचलून धरण्याचा आजचा ट्रेंड समाजाची घसरण की मानसिकतेची शोकांतिका?
शीर्षक : फालतू चर्चेचा काळा प्रवाह...

नकोत्या गोष्टींना उचलून धरण्याचा आजचा ट्रेंड समाजाची घसरण की मानसिकतेची शोकांतिका?

आजची सर्वात मोठी समस्या कोणती, असा प्रश्न विचारला तर बरेच जण बेरोजगारी, महागाई, राजकारण, मूल्यांची हानी अन्‌काही गंभीर गोष्टींचा उल्लेख करतील. पण यापेक्षा मोठी, धोकादायक आणि शांतपणे आपला पाया खणणारी एक सवय समाजाला पोखरत चालली आहे

नकोत्या, निरर्थक आणि हानिकारक गोष्टीला उचलून धरण्याचा वेडसर ट्रेंड.

हा ट्रेंड इतका वाढला आहे की लोक योग्य गोष्टीकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टींचा गराडा घालत आहेत आणि त्यालाच 'बौद्धिकता' किंवा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' समजून बसलेत. एखाद्या क्षुल्लक मुद्द्याला देशव्यापी चर्चा मिळते, तर खऱ्या समस्यांवर बोट ठेवणारे लोक मौनात हरवतात.

चर्चा करणं वाईट नाही;
वाईट तेव्हा होते जेव्हा चर्चेचे विषयच गलिच्छ, गल्लत करणारे किंवा समाजहिताला मारक असतात.

आज लोक

वादासाठी वाद करतात,

लोकांना चिडवण्यासाठी विषय शोधतात,

सेंसिटिव्ह मुद्दे जाणीवपूर्वक चघळतात,

आणि मग त्यावर स्वतःला ‘महान’ समजतात.


हे जरा कठोर वाटेल, पण आज सत्य बोलणं धोकादायक आणि फालतू बोलणं लोकप्रिय झालंय.

सोशल मीडिया आज काळाचा आरसा नसून अनेकदा भ्रमाचा आरसा बनला आहे.
ज्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही अशा गोष्टींना

हजारो शेअर्स,

लाखो व्यूज,

तासनतास चर्चा,

आणि शेकडो कमेंटस् मिळतात.

आणि जे समाजकारण खरं आहे, जे विषय संवेदनशील आहेत, जे प्रश्न सोडवले तर लोकांचे आयुष्य बदलेल ते मात्र या गोंधळात हरवून जातात.

लोक आता कंटेंटला महत्त्व देत नाहीत; गोंधळाला देतात.
हे अत्यंत गंभीर आहे.

नकारात्मक किंवा फालतू गोष्टींचा सतत मागोवा घेतल्याने मनाची गुणवत्ता कमी होते.
आपल्या मनावर हे परिणाम होतात

चिंतनशक्ती मंदावते

सकारात्मकता नष्ट होते

चिडचिड, असंतोष वाढतो

तुलना करण्याची सवय जडते

स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष होते

दुसऱ्यांवर बोट ठेवण्यात इतका वेळ जातो की स्वतःकडे पाहण्याची संधीच मिळत नाही.

आपली संस्कृती आपल्याला शिकवते
“प्रथम स्वतःला सुधारा, मग जग सुधारेल.”

पण आज जग बदलण्याची माणसे खूप;
स्वतःला बदलण्याची फारच कमी.

लोकांची नजर नेहमी “तो काय करतोय?” यावर असते,
पण “मी काय करतोय?” यावर नाही.

खरं तर आपली यशस्वीता, आपली प्रगती, आपली मानसिक शांतता

हे सर्व एकाच प्रश्नावर अवलंबून आहे:

मी माझ्या आयुष्यासाठी काय चांगलं करत आहे?

एखादी चुकीची गोष्ट व्हायरल झाली की समाज तिकडे आकर्षित होतो,
एखादा निकृष्ट विषय चर्चेत आला की प्रज्ञावंत लोक बाजूला पडतात,
आणि मग समाजाचा बौद्धिक दर्जा घसरत जातो.

हा प्रवास धोकादायक आहे.
उपाय अत्यंत सोपा आहे.

फालतू विषयांवर प्रतिक्रिया देऊ नका

नकारात्मक कंटेंट शेअर करू नका

अश्लील किंवा दिशाहीन चर्चेत सहभागी होऊ नका

चांगल्या कामांना महत्व द्या

ज्या गोष्टीला आपण प्रसिद्धी देतो तीच ‘ट्रेंड’ बनते.

आपण एखाद्या राष्ट्राचे नागरिक आहोत, फक्त सोशल मीडियाचे नाही.
आपल्या एका शेअरने समाजाचे विचार बदलतात,
आपल्या एका पोस्टने कुणाच्या मनावर प्रभाव पडतो,
आणि आपल्या एका चर्चेमुळे पुढची पिढी कोणत्या दिशेने जाईल ते ठरते.

म्हणूनच वेळ आली आहे गोंधळापासून दूर होण्याची,
आणि सत्य, सौंदर्य, सकारात्मकता आणि विकास यांना महत्त्व देण्याची.

कोणी काय करतोय हे पाहून आपण बदलत नाही,
पण आपण स्वतः काय करतोय यावरूनच आपलं भविष्य ठरतं.

समाजात बदल हवा असेल तर
फालतू चर्चा थांबवा,
नकारात्मकता दूर ठेवा,
स्वतःच्या प्रगतीकडे वळा,
सकारात्मक विचारांना वाव द्या.

आपण प्रत्येकजण आपल्या आतला उजेड वाढवू लागलो
की समाजाचा अंधार आपोआप घटू लागतो.

आज नकोत्या गोष्टींना उचलून धरण्याचा जो ट्रेंड वाढतोय,
तो समाजाच्या बुद्धीची, मानसिकतेची आणि दिशेची हानी करतोय.
त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग

स्वतः बदलणे, स्वतः सुधारणा करणे आणि सकारात्मकतेला मार्गदर्शक बनवणे.

जग बदलणं कठीण आहे,
पण स्वतःपासून सुरुवात करणं अत्यंत सोपं आहे
आणि तेच खरं परिवर्तन आहे.

बघा विचार करून पटतंय का...?

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी,९७६७३२३३१५
0