Login

श्लोक असण्याची किंमत

Disability is not weakness, it is divinity.
शीर्षक : श्लोक असण्याची किंमत

छत्रपती संभाजी नगर शहरात श्लोक नावाचा एक साधा, सरळ, सोज्वळ, मनमिळावू, शांत मुलगा.
तो जन्मतःच ८०% दिव्यांग होता. चालणं, धावणं, खेळणं हे सगळं त्याच्यासाठी स्वप्न होतं.
पण तरीही तो नेहमी दुसऱ्यांसाठी धावून जायचा आपल्या परीने, आपल्या क्षमतेप्रमाणे.

पण आतून मात्र तो कोसळत होता.
रात्री झोपताना तो स्वतःशीच बोलायचा

"मी ८०% दिव्यांग… माझ्या असण्यानं, नसल्याने खरंच कुणाला काही फरक पडतो का?

एका रात्री आईला त्याने विचारलं
"आई, जर मी उद्या नसतो तर तुला जाणवलं असतं का?"
आई (डोळे पुसत): "अरे बाळा, असं काही बोलू नकोस. तू आहेस, हेच माझं जग आहे. पण हो तुझ्या या परिस्थितीत तू किती खचला आहेस मला कळतंय तुझं मन किती थकून गेलंय."

मित्रांमध्येही त्याने हाच प्रश्न विचारला.
सगळे थोडं हसले, काहींनी टाळलं. कुणी गंभीरतेनं घेतलंच नाही.
आणि श्लोकच्या मनात पुन्हा तोच विचार
"माझं असणं खरंच सार्थक आहे का?"

एक दिवस त्याने आपल्या ताईला ही विचारले
"ताई, माझ्या जगण्याचा अर्थ काय ग?"
ताई थोडी हसली अन् तिचे डोळे ही थोडे पाणावले आणि ती म्हणाली "अरे माझ्या लाडक्या भावा, जर कोणाला आत्महत्या करायची असेल तर मी त्याला तुझ्याकडे पाठवेल. कारण तू या सगळ्या परिस्थितीतही जगतो आहेस. तू म्हणजे एक जिवंत प्रेरणा आहेस. तुझ्याकडे पाहून मरणाऱ्या व्यक्तीलाही जगावसं वाटेल. तू स्वतःला कमी लेखू नकोस. तुझं जगणं म्हणजे इतरांसाठी आशेचा किरण आहे."

हे हळवे शब्दं त्याच्या मनाला भिडली, पण तरीही तो अजूनही शोधात होता "माझ्या असण्याची खरी किंमत काय?"

एक दिवस तो व्हीलचेअरवरून घरी परतत असताना रस्त्यावर अपघात झाला.
लोक फक्त उभे होते. कुणी पुढे जात नव्हतं.

श्लोकनेच जोरात आवाज दिला, मदतीला लोकांना हाक मारली, रिक्षा थांबवली.
तो स्वतः रुग्णालयात गेला आणि रक्तदानासाठी पण पुढे आला.
ती मुलगी वाचली.

दोन दिवसांनी तिचे आई-वडील श्लोकच्या दाराशी आले.
मुलीचे वडील (डोळ्यात पाणी): "बाळा, तू नसतास तर आमचं जग संपलं असतं.
तुझ्या असण्यामुळे आमच्या घराला नवा श्वास मिळाला."

त्या क्षणी श्लोकच्या डोळ्यातही पाणी आलं.
त्याला पहिल्यांदा कळलं
८०% दिव्यांग असूनही त्याच्या २०% सामर्थ्यानं एखाद्याचं आयुष्य वाचवलं होतं.

त्या दिवसापासून श्लोकने स्वतःला कधीही कमी लेखलं नाही.
तो म्हणायचा "माझ्या असण्यानं जग बदलणार नाही,
पण एखाद्याचं जग बदलू शकतं.
माझं असणं म्हणजेच माझं खरं सामर्थ्य आहे."

तो सामाजिक काम करू लागला.
कोणाला शिक्षणासाठी मदत, कोणाला रक्तदान मोहिमेसाठी प्रेरणा,
तर कधी फक्त एक हसरा चेहरा
आणि लोक म्हणू लागले
"श्लोक आहे म्हणून आजही आशा जिवंत आहे."

त्याला विचारांना प्रेरणा देण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून, गावातून प्रेरणादायी भाषण करण्यासाठी आमंत्रण येऊ लागलं, काही संस्था त्याचा येण्या जाण्याचा खर्चही उचलू लागले व त्याला कार्यक्रमात सन्मानपूर्वक सन्मान देऊन मानधनही देत होती.

अशाच एका कार्यक्रमात श्लोक बोलतो...

"मित्रांनो,
मी ८०% दिव्यांग आहे.
हो, माझं शरीर माझ्या इच्छेनं नाही चालत…
पण माझ्या मनानं चाललेलं प्रत्येक पाऊल कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं.

कधी वाटलं की आपल्यामुळे कुणाला काही फरक पडत नाही,
तर लक्षात ठेवा
जगाला फरक पडो वा न पडो,
तुमच्या असण्याचा फरक तुम्हाला पडायला हवा.

कारण माणूस ८०% दिव्यांग असो वा १००% सक्षम,
त्याच्या एक टक्के सकारात्मक कृतीनंही एखाद्याचं जग उजळू शकतं."

आपल्या असण्याची किंमत आपण स्वतः ओळखली पाहिजे.
दिव्यांगत्व, अपयश किंवा कमजोरी कधीच अडथळा नसते
उलट तीच आपली खरी ताकद ठरू शकते...

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0