Login

तिची तपश्चर्या भाग ५३

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी
तिची तपश्चर्या - भाग ५३

विचारांच्या गोंधळात अडकलेली नंदिनी काय निर्णय घेईल आणि उमाच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होईल पाहूया पुढे..

खरंतर काश्मीरला नरेंद्रच्या घरी असताना नंदिनीला अधून मधून जयंतची खूप आठवण यायची.  तो तिच्याशी किती मृदूपणे वागायचा. तिला त्याच्या मनातील प्रेमाची जाणीव व्हायची.  काही वेळा तिला त्याचा विरह सुद्धा जाणवत होता.  कसं असतं ना दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या बरोबर असतात तेव्हा दुसरी व्यक्ती आपल्या बरोबर आहे हे आपण गृहीत धरतो पण तेच जर काही कारणामुळे थोडे दिवस का होईना ती व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी गेली असेल तर आपल्याला तिची आपल्या जीवनातील जागा काय आहे ते कळतं.

उमाचे आयुष्य उध्वस्त करून नंदिनी कधीच सुखी झाली नसती म्हणूनच सारासार विचार करून तिने आता जयंतला होकार द्यायचा ठरवलं होतं.  पण आता स्वतःहून जयंतला याबद्दल काही सांगणं म्हणजे तिला जरा वेगळंच वाटत होतं.  तिने विचार केला की जयंत पुन्हा कधीतरी विषय काढेल. आता जवळजवळ त्याने आपल्याला विचारून सहा महिने झाले आहेत.  तशी कधी संधी आली किंवा त्याने आपल्याला अजाणतेपणे सुचवायचा प्रयत्न केला तर आपण त्याला आपल्या मनातील भावना सांगू.

नंदिनीला जास्त काळ वाट बघावी लागली नाही.  पुन्हा एकदा असेच ते दोघेच घरात होते तेव्हा जयंत तीला म्हणाला,

"काय नंदिनी आज पण लॉनवर बसून कॉफी प्यायची का? काय मूड आहे तुझा"

"नेकी और पूछ पूछ. हो हो मला नक्कीच वाटते आज आपण कॉफी पिऊ या"

दोघेजण कॉफी पिता पिता जयंत तीला म्हणाला,

"नंदिनी आयुष्यातील अशा सुंदर क्षणांना साक्षी ठेवून मला कायम तुझ्याबरोबर कॉफी प्यायला आवडेल.  आता तरी तुझ्या मनात काय आहे ते सांगशील का?"

"जयंत मी खूप विचार केला आणि मला सुद्धा असंच वाटतंय की मी सुद्धा तुझ्याबरोबर अशीच लॉनवर बसून कायम कॉफी प्यायला तयार आहे."

"काय म्हणतेस?" अत्यानंदाने जयंत उठून उभा राहिला आणि त्याने नंदिनीचे हात हातात घेतले.  त्याने नंदिनीला सुद्धा उभे राहायला मदत केली आणि अलगद मिठीत घेतलं.  त्या क्षणी नंदिनीला वाटलं आपण अगदी योग्य निर्णय घेतला आहे.  जयंतला कधी एकदा चित्राताई आणि आईला हा निर्णय सांगतोय असं झालं.  तो त्यांची आतुरतेने वाट पाहू लागला.  इतक्यात त्याने पाहिलं दोघी गाडीतून उतरत आहेत.  जयंत नंदिनीचा हात हातात घेऊनच त्या दोघींना सामोरा गेला.  आई आणि चित्राताई अगदी लगबगिने त्यांच्याजवळ चालत आल्या आणि दोघांनाही मिठीत घेतलं.  जयंतची आई खूप हळवी झाली आणि म्हणाली,

"जयंत आणि नंदिनी मी या दिवसाची कधीपासून आतुरतेने वाट पाहत होते.  देवळात गेल्यावर मी देवाला कायम हेच सांगायची की माझ्या जयंत आणि नंदिनीला एकत्र येऊ दे, त्यांचा सुखी संसार मला माझ्या डोळ्यांनी पाहू दे."

चित्राताई पण म्हणाली,

"खरंतर नंदिनी बरी झाली आहे तेव्हापासूनच मी या क्षणाची वाट पाहत होते.  माझ्या आयुष्याचे तर मातेरे झाले आहे पण माझा भाऊ आनंदी समाधानी असेल तर मला नक्कीच आवडेल.  नंदिनी सारखी बायको त्याला कुठेही शोधून पण सापडणार नाही.  चला मी मावशीना सांगते आज काहीतरी गोडाधोडाचे जेवण करायला.  नंदिनी आणि जयंत तुम्हाला दोघांनाही पुरणपोळी खूप आवडते ती मात्र मी माझ्या स्वतःच्या हातानेच बनवणार."

तो दिवस सर्वांसाठी खूपच आनंदात गेला.  सारेच अगदी आनंदलहरीवर तरंगत होते असे म्हणा ना.  दुसऱ्या दिवशी लगेचच चित्राताई आणि नंदिनी गप्पा मारत असताना मानस आणि उमाने त्यांच्या घरात प्रवेश केला.  त्या दोघांना एकत्र बघून नंदिनीला काही काळ असूया वाटली. आज उमा सगळीकडे मानस बरोबर जोडीने फिरते आहे. सर्व सुरळीत झालं असतं तर तिच्या जागी मानसच्या शेजारी मी असते.  अर्थात हा सगळा नियतीचा क्रूर खेळ आहे.  यात उमाचा बीचारीचा काहीच दोष नाही.  चित्राताई सांगत होती की उमा खूपच निरागस आहे.  तिनेच चित्राताईला अनेकदा फोन करून मानस आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. आपल्या नवऱ्याच्या आधीच्या प्रेमासाठी इतका त्याग करणारी कुणी असेल का?

मानसची पण तीच अवस्था होती.  दोघेही अश्रू भरल्या नजरेने एकमेकांकडे पाहत होते.  उमाला जरी कितीही वाटत होतं की दोघांनी एकत्र यावं पण ती वेळ आल्यावर मात्र उमा आतून उन्मळून गेली.  आज तिच्या आयुष्याचा फैसला होणार होता.  इकडे चित्रा ताईच्या मनात सुद्धा येत होतं आता मानस आला आहे. नंदिनीचे विचार बदलणार तर नाहीत ना.  कितीही झालं तरी नंदिनी आणि मानसने एकमेकांवर जिवापाड प्रेम केलं होतं.  जयंत तर तिच्या आयुष्यात नंतर आला.  नंदिनीचा विचार बदलला तर ती आणि मानस कदाचित सुखी होतील पण जयंत आणि उमा दोघांचेही आयुष्य उध्वस्त होईल. 

इतक्यात जयंतची आई देवळातून आली.  तिने मानस आणि उमाला बघितलं परंतु मानस विषयी तिला काहीच माहिती नव्हतं.  नंतर तिला कळलं की हे नंदिनीचे मित्र आहेत तेव्हा तिला आनंद झाला की नंदिनीचे कोणीतरी मित्र मैत्रीण तिला येऊन भेटले.  आता असंच कानोकानी नंदिनी जिवंत असल्याचं कळल्यावर तिच्याशी तिच्या मैत्रिणी संपर्क साधतील तर नंदिनीला नक्कीच मनातून खूप आनंद होईल.  ती पण त्यांच्याबरोबर गप्पा मारायला बसली.  मानसलाही कळत नव्हतं की नंदिनीचा निर्णय काय आहे.

पण नंदिनीने काही निर्णय घेतला तरी आपण आता
उमाला सोडू शकत नाही ही जाणीव त्याला प्रकर्षाने झाली होती. नाही म्हटलं तरी उमाने त्याच्या मनात आता घर केलं होतं.  तिच्या वागण्याने तिने मानसचे मन जिंकलं होतं. घरातल्याही सर्वांची मन जिंकून घेतली होती.  इतक्यात जयंत सुद्धा घरात आला.  त्याने ह्या दोघांना पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा बहुदा मानस असावा.  मानसला बघितल्यावर त्याच्या काळजात चर्र झालं.  नंदिनीने आपल्याला होकार दिला आहे ती तिचा निर्णय बदलणार तर नाही.  जुनं प्रेम अगदी हाताच्या अंतरावर असताना ती आपला स्वीकार करेल का? उमाने जेव्हा जयंतला पाहिले आणि तिला कळलं की हेच डॉक्टर जयंत तेव्हा तिच्या मनात आलं हे तर किती देखणे आहेत.  नंदिनीने यांच्याशी लग्न करावं ना.  आता आपलं लग्न झालंय हे नंदिनीने स्वीकारून ह्या जयंतशी लग्नाला तयार व्हावं.  अरे पण हे आपण म्हणतोय पण त्या
जयंतचे लग्न झालं आहे किंवा त्याचं इतर कोणावर प्रेम आहे हे आपल्याला काहीच माहित नाही.  पण उमाला राहून राहून वाटत होतं की आता आपण मानसशिवाय जगू शकणार नाही.  मानस, जेव्हा तो तिला बघायला आला होता तेव्हाच तिला तो खूप आवडला होता आणि त्यानंतर ती त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली होती.

आता सर्वस्वी निर्णय नंदिनीच्या हातात होता.  तिच्या एका निर्णयावर चार जणांच्या आयुष्याचे भवितव्य ठरणार होतं.  जयंतची आई सोडली तर इथे बसलेल्या सर्वांच्याच मनावर एक अनामिक ताण होता.  नक्की काय होईल?

(नंदिनी काय निर्णय घेईल यावरच उमा आणि मानसची जोडी अबाधित राहील का हे ठरणार होतं.  नंदिनीचा निर्णय काय असेल पाहूया पुढील भागात)