Login

संसार नावाच्या जंगलातील वाघीण 3

या भेटायला आपल्या संसार नावाच्या जंगलातल्या वाघिणीला

माधव बोलतच होता, "घरून काही मिळायची आस नाही कारण दारूच्या व्यसनाने माझ्या बाबाला चांगलं घेरलं, त्यातंच त्यांनी पाच एकर शेती दारूवाल्याला लिहून दिली. दारूवाल्याने पैसे द्या नाहीतर यावर्षी पेरणी करायची नाही ही धमकी दिली आहे. हे कालंच भावाने फोन करून सांगितलं मला. अशात लग्न व लग्नानंतर तुला हा सगळा ताप देणं मला काही पटत नाही आहे? त्यापेक्षा आता काय ती मनं तोडलेली बरं म्हणून म्हणतोय हे लग्न मोडून टाकू. तु कोणाला काहीच बोलू नकोस. मीच काय सांगायचं ते फोन करून सांगतो. मी हमी देतो तुला कोणीच काही बोलणार नाही."

"इतकंच." आतल्या आत रिवा खुश झाली की माधव तसाच आहे जसा तिने त्याला समजलं.

"अगं मी काहीही आर्थिक सुख तुला देउ नाही शकनार आणि तु म्हणतेस इतकंच. हनिमूनला साधं महाबळेश्वरला तरी जाणं होईल का माहीत नाही. पोरी तर किती अपेक्षा ठेउन असतात भावी नवऱ्याकडून. तु इतक्या विकट परिस्थीतीतही."

"कारण मी मी आहे."

"खूप अवघड आहे!"

"दोन वाजत आहेत झोप तु. गुड नाईट आणि लव यु!" रिवाने हसतच फोन ठेवला. तिकडे माधवला स्वप्नात आहे की काय असं झालं.

रिवाने पहिल्यांदा त्याला लव यु म्हटलं. तेही असं अचानक. ते बोल त्याच्या कानात घुमू लागले. मंद मंद स्मित करतच तो झोपी गेला. सकाळी शिवाजीनगर स्टाॅपवर रिवा उतरली. माधव बाईक घेउन उभा होता.

त्याच्या मनात तिला पाहताच गाणं सुरू झालं,
"कुछ खुशबुये यादों के जंगल में बह चली,
कुछ खिडकीयाॅं लमहो की दस्तक पे खुल गइ।
जिने के इशारे मिल गये
बिछडे थे किनारे मिल गये!"

"चलायचं!" रिवा माधवच्या खांद्यावर हात ठेउन म्हणाली. तसा माधव भानावर आला. आज त्या दोघांना सगळं नविन भासत होतं. एक नवीनच आकर्षण त्यांना एकमेकांकडे खेचत होते. दोघांच्या मनात लड्डू फुटू लागले. एक अटल विश्वासाचे नाते त्यांच्यात निर्माण झाले.
रूमवर आल्यावर माधव फ्रेश होउन ऑफिसला गेला. तर रिवा जी झोपली ती माधव दुपारी एक वाजता आला तेव्हा उठली. दोघांनी विचार विनिमय करून ठरवले की लग्न आहे त्या तारखेलाच होईल. फक्त अगदी साध्या पद्धतीने. जास्त शोशा न करता. लग्नासाठी रिवा ५०००० कर्ज म्हणून माधवला देणार, नवीन नोकरी मिळताच माधव ते पैसे रिवाला परत करेल. तसेच ती एकूलती एक असल्यामुळे भाऊ बहिन नक्की काय असतात हे तिला जाणून घ्यायचे होते. ते नाते तिला जगायचे होते म्हणून लग्नानंतर तिने सासरी राहायचे व तिथलं बिघडलेलं वातावरण ठिक करायचे ठरवले. मात्र माधव पुणे नाशिक येणंजाणं करून नविन नोकरी शोधनार.

रिवा आणि माधवचं लग्न झालं! पण,

"लग्न साध्याच पद्धतीने का केलं?"

"आधी तर १० पक्वान्न ठरवलेले ऐकले, मग पाचच का दिसले?"

"नवरदेवच्या बापाने शेत दारूवाल्याकडे गहान ठेवलं तरी तुम्ही पोरीला दिलं तिथं?"

"पोराला नोकरीवरून कमी केल्याचं ऐकलं, खरं आहे का?"

इती ...इती.... नातेवाईकांकडून प्रश्नांची सरबत्ती रिवा व तिच्या आईबाबांवर झाली. अन् जेव्हा रिवाने तिला सर्व माहीत असल्याचं सांगितलं तेव्हा तर काहींनी अबोलाच धरला तर काहींनी तिला सासरी परत जाऊच नको, माधवला नोकरी मिळाल्यावर सरळ पुण्यालाच जायचा सल्ला दिला. पण रिवा तिच्या निर्णयावर ठाम होती.

माधवने त्याच्या घरच्यांना रिवाची काय योजना समजावून सांगितली. तो घरी राहून होईल तसे सॉफ्टवेयरचे प्रोजेक्ट घेऊ लागला. मात्र कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येई तर कधी अचानक वीज चालली जाई. रिवाने त्याला काही दिवस पुण्यात राहूनच सॉफ्टवेअर प्रोजेक्ट पूर्ण करायचा व नोकरी शोधायचा सल्ला दिला. सासरे सकाळी शपथ घेत दारू पिणार नाही पण रात्री टून होऊन येत. अखेर रिवाने सासूला विश्वासात घेउन सर्वांत आधी सासर्यांना दारूमुक्ती केंद्रात दाखल केलं.