तिला घरी बोलवा भाग 4
©️®️शिल्पा सुतार
" चांगलं करता आहेत पोरीला घेऊन आले तर. राहू द्या तिला चार दिवस. समजूतीने परत पाठवून द्या. वाटल तर मी फोन वर बोलते. माफी मागून घ्या त्या लोकांची. " काकू परत बोलल्या.
" तुमच काय चाललेलं आहे वहिनी ? सारखं काय असं बोलता आहात. तिला काय त्रास आहे ते तर विचारू दे. तिला किती मारल आहे दिसत नाही का तुम्हाला. चेहरा सुजलेला आहे. " रमेश राव विचारत होते.
" हिची पण काही तरी चूक असेल ना. नाहीतर कोणी उगीच का मारेल. लग्न झालेली पोरगी सासरीच बरी वाटते. विशाल तुला बर वाटत का हे? " काकू बोलल्या.
"असं काही नाही काकू . ताईला जर तिकडे सासरी त्रास असेल तर हे पण घर तिचं आहे. आज काल किती विचित्र केसेस होत आहेत. ती नसण्या पेक्षा डिवोर्स झालेला बरा. "
" लोक तोंडात शेण घालतील. तुझं लग्न बाकी आहे तुला पोरगी मिळेल का? "काकू मुद्दे मांडत होत्या.
"लग्न झालं तसं ताईला त्रास आहे हे आपल्याला माहिती आहे ना. किती हुशार होती ती. तिकडे सगळे तिला पाण्यात बघतात. जो त्रासात असेल तर त्याचा त्रास कमी करायला पाहिजे का अजून घरच्यांनीही तिला त्रास द्यायला पाहिजे सांगा ना काकू? माझी बहीण मला जड नाही. होईल माझं लग्न जेंव्हा व्हायचं तेव्हा. त्यासाठी आत्तापासून कशाला ताईला घराबाहेर काढायच. "तो म्हणाला.
" असे खूप बोलणारे बघितले आहेत. तुझं लग्न झालं की बायकोच ऐकशील या पोरीचे हाल होतील. " काकू अजूनही त्यांचा मुद्दा धरून होत्या.
" ते काही का असेना नंतर बघू. आधी जरा शांत रहा काकू. घरात गोंधळ कमी करा. " विशाल ही चिडला होता.
आशाताईंनी सीमाला चहा नाश्ता दिला. ती जरा वेळ झोपली. रमेशराव बराच वेळ तिच्याजवळ बसलेले होते. ती झोपलेली बघून आशाताई जवळ येऊन बसल्या.
" आता हो काय म्हटले हिच्या घरचे. राहुल राव चिडलेले आहेत का? "
" हो पोरीला मारल त्यांनी. गालावर बघ पाच बोट उमटलेले आहेत. ते पोरीवर नुसते आरोप लावता आहेत. तिला काही येत नाही. ती ऐकत नाही अस बोलतात . मला तर खूप काळजी वाटते आहे." दोघांच्या डोळ्यात पाणी होत.
" सीमा उठल्यावर हा विषय काढु नकोस."
" हो. समजुतीने घेत नाही ते लोक. दुसर्याच्या मुलीची किम्मत नाही. वहिनी ही तोफांड करत आहे. कस होईल हो. सीमा घाबरली आहे. " आशा ताई काळजी करत होत्या.
" करू दे वहिनीला काय करायचं ते. जास्त काही असेल तर आपण मळ्यातल्या घरात रहायला जाऊ. नाही तरी एक ना एक दिवस सेपरेट रहायचं आहे. "
"चालेल ना आपली पोरगी शांत राहिली पाहिजे."
त्यांनी विशालला हा विचार सांगितला.
" चालेल. आपल्या ताईला हे लोक असे बोलणार असतील तर वेगळं राहिलेलं बरं."
रात्री घरातले सगळे जेवायला बसलेले होते. आशाताई पोळ्या करत होत्या. सीमा किचनमध्ये आली. काकू बाजूला बसलेली होती.
" चल सीमा ताई जेवायला बस. " विशाल बोलवत होता. ती काकू कडे बघत होती. त्या रागावता की काय तिला भीती वाटत होती. तिचा एकंदरीत काॅन्फीडन्स कमी झाला होता. ती विशाल जवळ जेवायला बसली.
" काय झालं हे बेटा? आरामात बस." मोठ्या काकांनी विचारल.
सीमा जेवत होती. जेवण झाल ती बाहेर विशाल जवळ बसली होती. काका काकू येवून बसले. रमेश राव, आशा ताई ही होत्या.
"सीमा इकडे ये. काय झालं तिकडे. समजुतीने घ्यायच बेटा. राग राग करायचा नाही. " काका बोलले.
" काका त्या लोकांना मी काहीही केलेलं पसंत नाही. सगळ्या गोष्टीत खोट काढतात. अजिबात कोणाचा आधार नाही. हे नात कधीच नीट होऊ शकत नाही. मी स्वतः खूप प्रयत्न केले. सासूबाई काही जमू देत नाही. हे आणि सासरे पण त्यांच्या बाजूने आहेत. ते ऑफिसून आले की सासूबाई त्यांच्या कानात दिवसभर काय झालं ते सांगतात आणि मग राहुल माझ्यावर चिडलेले असतात. आता वर्ष होईल आमच्या लग्नाला एक दिवसही सुखाचा मिळाला नाही. आणि आता तर अति झालं होतं. मला भीती होती की माझं तिथे काहीतरी बरं वाईट होईल. " सीमा सांगत होती. सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता. आशा ताई रडत होत्या.
" असं कसं बरं काही होईल? तुला खमकी राहता येत नाही का? " काकू म्हणाल्या.
" तीन विरुद्ध एक किती विरोध करणार. त्यात राहुल माझ्या बाजूने नाहीत. त्या लोकांना मी नकोच आहे. तर मी काय करू. काहीही करा उलटा अर्थ घेतात. साध बोलत नाही डायरेक्ट हात उचलतात." सीमा रडत सांगत होती.
विशालने तिला जवळ घेतल." ताई शांत हो. नको ना हा विषय. तिला त्रास होतो आहे. "
काकू चिडचिड करत होती.
" तू जरा शांत रहा. " काका काकूला ओरडले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा