बालपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जाणं हे शास्त्र असायचं. मग तिथे जाऊन आजी आजोबाच्या सानिध्यात दंगामस्ती करणं हे ठरलेलं असायचं. याच गोष्टींना लक्षात घेऊन आम्ही लहानपणी पंधरा दिवस ते एक महिना आमच्या आजोळी शेगावला राहायचो. ते दिवस वेगळेच होते. इलेक्ट्रिसिटीचे जाळे तेव्हा इतके फोफावले नव्हते. घर दारात केरोसीन किंवा सारकीचे तेल ( म्हणजे कापसाच्या बिजापासून मिळवलेले तेल ) असलेले कंदील, दिवे प्रकाशासाठी वापरले जायचे. संध्याकाळ व्हायला लागली की अंधार आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात करायचा. अमावस्येची रात्र म्हणजे दारी काळाकुट्ट अंधार. मात्र या रात्रीच आम्हाला खरी मजा वाटायची कारण आमच्या दारातच आम्हाला टीम टीमनारे किडे भेटायचे ज्यांना आपण काजवे म्हणतो.
आता स्पष्ट आठवत नाही पण चार-पाच वर्षाची असेल तेव्हा मला काजवा समजला. आमच्या आजोबांनी त्यांच्या मुठीत बंद करून तो माझ्या हातांवर ठेवला होता. तेव्हा आम्ही सर्व मुलं कितीतरी वेळ आपले डोळे विसफारून त्याच्याकडे बघत बसलो होतो. आधी मला भीतीच वाटली होती कारण चुलीतल्या विस्तवाच्या ठिणग्या उडतात तसा तो छोटासा किडा दिसत होता. मग आजोबांनी आम्हाला दाखवले त्या किड्याच्या मागील भागाला लागून एक छोटासा जवारीच्या दाण्याएवढा भाग होता जो अंधारात चमकतो. एक वेगळीच मजा होती त्या काजव्यांना पाहायची. त्यांच्या मागे धावायची. कितीतरी वेळ त्यांच्या प्रकाशात आपलं अस्तित्व शोधण्याची. आता जेव्हाही ते क्षण आठवतात ना मला फार कुतूहल वाटतं स्वतःचच कारण त्या काळी आम्हाला कधीच बोर नाही झालं नव्हतं. बोर होणं हा शब्दच माहीत नव्हता. कदाचित निसर्ग स्वतः आमच्या सोबतीला होता म्हणून.
जेव्हा इलेक्ट्रिसिटीची उत्पत्ती झाली नव्हती तेव्हा अशा काजव्यांना पकडून काचेच्या डबीत किंवा पातळ सुती कपड्यात सैलसर बांधून घरात उजेड हवा तिथे ठेवल्या जाई. हे आजीने आम्हाला सांगितले होते. मग एका रात्री आम्ही मुलांनीही असे दहा बारा काजवे पकडून आजीला दिले. तेव्हा आमच्या आजी आजोबांनी आम्हाला समजावून सांगितले की जुन्या काळात इलेक्ट्रिसिटीचा दूर दूर लवलेश नव्हता व तेल मिळवणे फार कठीण होते म्हणून या लहानग्या किड्यांना आपण बंदिस्त करायचो. मात्र आता आपल्या घरात लाईट्स आहेत, अंगणात आपण कंदील लावतो तेव्हा या मुक्या जीवांना त्रास का द्यायचा. आम्हीही समजदार मुलांसारखं सर्व किड्यांना परत अंगणात सोडून दिले.
तर असे हे काजवे दरवर्षी बरोबर पाऊस पडण्याआधी एक दीड महिना आपल्या भेटीला येत असतात. मात्र जसजसे इलेक्ट्रिसिटीचे जाळे सगळीकडे टप्प्याटप्प्याने वाढत गेले, तसतसे हे काजवे दिसणेही कमी होत गेले. दुसरं म्हणजे ध्वनी प्रदूषण, हवेतील प्रदूषण यांचाही या किड्यांवर फार गंभीर परिणाम झाला आहे. आता तुम्हाला या काजव्यांना पाहायचं असेल ना तर अगदी घनदाट जंगलात जावं लागतं. जिथे जास्त आवाज नसेल, मोठा प्रकाश झोत देणारे लाईट्स लावले नसतील अशा जंगली भागात आताही हे काजवे दिसून येतात.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र राज्याच्या सह्याद्री पर्वत रांगेतील घनदाट जंगलात हा काजवा महोत्सव सुरू होतो आणि जून महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येतो. अशा काजवा महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या व तिथे या काजव्यांना पाहायला जात असणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे की तिथे मौज मस्ती व मोठमोठ्याने गाणी लावने अशी कामं करू नका अन आपली उरली सुरली धरोहरही संपुष्टात आणू नका नाहीतर काही वर्षांनी नक्कीच आपल्यावर या काजव्यांचा नैसर्गिक प्रकाश अनुभवण्यासाठी लांब दुसऱ्या देशात जायची वेळ येईल. आणि आपल्या येथील काही हुशार माणसं बक्कळ पैसा खर्च करून तिथे जातीलही. जातीलच काय तिथे जाऊन सर्व नियमांचे पालनही करतील. मग आता इथेच आपल्याच देशात त्या सर्व नियमांचे पालन करून पर्यटन करायला काय हरकत आहे. त्याने आपल्याच देशात आपली संपत्ती राहणार ना. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा