तु असा जवळी रहा ( भाग ४९ वा)

त्याचा प्रत्येक शब्द तिच्या काळजावर वार करून गेला. भूतकाळाचं ते सत्य ज्याने तिचं भविष्य पूर्णपणे बदललं होतं, तिला एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे भासत होतं. डोळ्यांतून वाहणारं पाणी तिच्या दुःखाची निशाणी होतं की तिने श्रेयशवर केलेल्या अन्यायाची हे तिला मात्र कळत नव्हतं.
तु असा जवळी रहा ( भाग ४९ वा)

©® आर्या पाटील

रुपेशला काय बोलायचे असेल या विवंचनेत आभाला झोपही लागत नव्हती.अमितची आठवण डोळ्यांच्या कडा पाणावत होती. मंदार शांत झोपला होता. ती तशीच उठली आणि बाल्कनीत आली.नजर श्रेयशच्या बंगल्याकडे स्थिरावली.रात्रीचे बारा वाजले होते. लाईट अजून बंद झालेली नव्हती यावरून तो जागा असल्याचा अंदाज आभाने बांधला.
' आपल्या आयुष्याने किती सहज रंग बदलला.सारं काही सुरळित सुरू असतांना सारंच संपलं.त्या संपलेल्या आठवणींचा भार वाहण्यात त्याचं आयुष्यही असच संपत आहे. त्याने जगावं एवढीच आस आहे म्हणून मी उदया त्याला भेटणार आहे.माझ्या माफीने तो सावरणार असेल तर मी त्याला माफ करणार आहे. हो मी माफ करणार आहे त्याला.' तिने पुन्हा एकदा आपला निर्धार पक्का. वाऱ्याची गार झुळूक तिला स्पर्शून गेली.

" अमित..." अनाहूतपणे शब्द ओठांवर आला.
अमित नेहमीच या झुळूकेत तिला भेटायचा आणि आज तर तो तिच्या निर्णयाला सहमती देत असल्याचा भासच तिला झाला. मनावरचा सारा भार त्या एका निर्णयाने हलका झाला होता ती तशीच रूममध्ये आली. मंदारच्या बाजूला पडत तिने डोळे मिटले. हलका झालेला मनाचा भार तिला अंर्तबाह्य शांत करून गेला. अगदी काही वेळातच तिला झोप लागली.

रुपेशला मात्र झोप येत नव्हती.भूतकाळाची विवंचना त्याला मात्र सारखी छळत होती. डोळ्यांसमोर अमितचा चेहरा तरळत होता. डोळ्यातले पाणी आटले होते पण मनाच्या गाभाऱ्यातून अजूनही वेदना दुथडी भरून वाहत होती. कधीतरी पहाटे त्याचा डोळा लागला पण काही वेळापुरताच. सकाळी लवकर उठून तो तयार झाला आणि आभाला भेटायला निघाला.

इकडे आभाही लवकरच उठली होती. मंदारची डॉक्टरांसोबत सकाळची अपॉईंटमेंट असल्याने त्याला लवकर निघावं लागणार होतं.
" मी येते सोबत. रुपेश आल्यावर थांबेल थोडावेळ." आपला विचार बदलत आभा म्हणाली.

" नको, तुझं त्याला भेटणं जास्त महत्त्वाचं आहे.मी जाईन. काळजी नको करूस." म्हणत मंदारने पुन्हा एकदा तिला समज दिली.
होकारार्थी मान हलवत आभा तयार झाली पण मन मात्र मानत नव्हते.
नाश्ता आवरून मंदार हॉस्पिटलमध्ये निघून गेला. तो गेला आणि काही वेळातच रुपेश येऊन पोहचला. गाडीपासून ते तिच्या घरापर्यंतचा रस्ता पार करतांना त्याने क्रित्येकदा श्रेयशच्या बंगल्याकडे वळून पाहिले. मनावरचा कसलासा भार डोळ्यांतून ओघळत होता. भरल्या हृदयाने तो आभाजवळ पोहचला.
त्याला सुखरूप घरी आलेलं पाहून आभाचा जीव भांड्यात पडला.

" रुपेश, अरे काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची." त्याला सोफ्यावर बसवत ती म्हणाली.

तिच्या शब्दांनी तो मात्र आणखी हळवा झाला आणि ओक्साबोक्सी रडू लागला.

" शांत हो बाळा. पाणी पी." म्हणत तिने ग्लास त्याच्या हातात दिला.
अश्रू पुसत त्यानेही ते पाणी प्यायले.

" मला माहित आहे त्या दिवशी श्रेयशला पाहिल्यानंतर तु पुन्हा एकदा त्याच डिप्रेशनमध्ये गेलास. अजून किती वेळ त्या घटनेचा त्रास करून घेणार आहेस.अमित आपल्यात नाही हे सत्य असले तरी आपल्याला सावरावं लागेल. तुला असं अगतिक झालेलं पाहून अमितच्या आत्म्याला..." बोलता बोलता आभाचे शब्दही जड झाले. डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
तसा रुपेश उठला आणि तिच्या पायाजवळ बसला.

" ताई, श्रेयश दादाची काहीच चुकी नव्हती. अमितचा अपघात माझ्यामुळे झाला होता." म्हणत त्याने तिचे पाय पकडले आणि रडू लागला.

कानात उकळते तेल टाकावे तसे त्याचे शब्द तिच्या कानांना वेदना देऊन गेले. क्षणभर तिला जे घडतय ते सत्य आहे की भास हेच कळेनासं झालं. ताडकन उठून उभी राहत ती धास्तावली.श्रेयशचा त्या दिवशीचा तो रडका चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळला. ती तशीच खाली त्याच्याजवळ बसली.

" रुपेश, काय बोलत आहेस तु ? असे अचानक अपघात तुझ्यामुळे घडल्याचे कसे आठवले ?बोल ना.." तिची बोबडी वळली होती.

" हेच सत्य आहे ताई. श्रेयश दादा त्याने कधीही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे.." बोलतांना तो अजूनही रडतच होता. तिच्याकडे पाहून बोलण्याचीही त्याला हिमंत होत नव्हती.

" रुपेश, माझ्या आयुष्याशी खेळायचा तुला कोणताही अधिकार नाही. का खोटं बोलत आहेस?" ती त्याची कॉलर पकडत म्हणाली.

" नाही ताई. हेच खरं आहे. त्यावेळेसच जर मी हे सत्य सांगितले असते तर .." म्हणत तो पुन्हा रडू लागला.

" तु शांत हो आधी. मी श्रेयशला माफ करणारच आहे पण त्यासाठी तुला हे सगळं करायची गरज नाही." ती त्याचा चेहरा हाताच्या ओंजळीत पकडत म्हणाली.

डोळ्यांतील अश्रूंनी तिची नजर धुरकट झाली होती पण श्रेयशचा त्यादिवशीचा तो अपराधीपणा ल्यालेला चेहरा तिला स्पष्ट दिसत होता.

" नाही गं ताई त्याला माफ करायची नाही तर त्याची माफी मागायची गरज आहे.त्याने मुद्दामहून काहीच केले नव्हते." तो हात जोडत म्हणाला. पाणावलेली त्याची नजर तिच्या नजरेचा सामना करायला तयार नव्हती.

" अरे त्याने मुद्दामहून केला नसला तरी अपघात त्याच्याच हातून घडला ना ?" आभा आक्रमक होत म्हणाली.

" हो घडला अपघात त्याच्या गाडीमुळे पण त्याला कारणीभूत मी होतो." अजूनही तो रडत होता.शब्द जड झाले होते.

" रुपेश, त्या दिवशी काय घडलं होतं ?" आता मात्र ती खंबीर झाली.

" ताई, मी ही मुद्दामहून काही केले नाही तो फक्त एक अपघात होता ज्यामध्ये मी माझ्या जीवलग मित्राला माझ्याच चुकीमुळे गमावले." तो तिच्या समोर हात जोडत म्हणाला.
आता मात्र ती आक्रमक झाली.
" रुपेश, माझ्या सहनशक्तीचा अंत होत आहे." ती त्याला ढकलत म्हणाली.
पुढच्याच क्षणी तिचा तोल जाणार तोच त्याने तिला सावरले.

" रुपेश, त्या एका घटनेने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले रे आणि तु म्हणतोस की त्यात श्रेयशची काहीच चुकी नव्हती." म्हणत ती त्याच्याच कुशीत शिरत रडू लागली.

" तुझं आयुष्य बदललं पण त्याचं आयुष्य उद्धवस्त झालं. मी स्वतःला त्यासाठी कधीच माफ करू शकणार नाही." म्हणत त्याने आभाला स्वतःपासून बाजूला केले. स्वतःवरचा अनावर झालेला राग त्याने भिंतीवर हात मारत काढला. तिने त्याला अडवले आणि समोरच्या सोफ्यावर बसवले.

" काय घडलं होतं त्या दिवशी ?" डोळ्यांतील अश्रू टिपत ती पुन्हा एकदा खंबीर होत म्हणाली.

" खूप खुश होता अमित त्या दिवशी. श्रेयश दादासोबत भांडण होऊनही तो तुझ्या त्याच्याशी लग्न करण्याच्या निर्णयाने खुश होता. श्रेयश दादा तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय, तुला जपतोय हेच त्याच्या आनंदाचं एकमेव कारण होतं. तुझ्या हक्काच्या सुखानं भरलेली,तुझी ओंजळ त्याचं समाधान करीत होती. दादाच्या मित्रांमुळे तो खूप चिडला होता पण त्याला खात्री होती जेव्हा त्याला सत्य समजेल तेव्हा तो त्याच्याच मित्रांना माफ नाही करणार.दादावर त्याचा जेवढा राग होता तेवढाच तुमच्या प्रेमावर विश्वासही होता." भूतकाळाचं ते पान उलगडतांना त्याचे शब्द जड झाले होते.
अमित, श्रेयश, त्या गुलाबी आठवणी साऱ्याच एक एक करत तिच्या नजरेसमोर साकार झाल्या. सारं काही संपलेलं असतांनाही अमितने मान्य केलेलं त्याचं नातं तिला क्षणभरासाठी सुखावून गेलं पण पुढच्याच क्षणी ती हळवी झाली.

" माझ्या अमितचा अपघात कसा झाला ?" ती रडत म्हणाली.

" त्या दिवशी नेहमी प्रमाणे आम्ही चौघेजण संध्याकाळी फेरफटका मारायला निघालो. आमच्या दिनक्रमातला तो आवडता भाग होता. कितीही कामात असलो तरी संध्याकाळची ही वेळ आम्ही आमच्या मैत्रीसाठी राखून ठेवली होती. तुमच्या साखरपुड्याची जमेल ती तयारी करून आम्ही थोडा ब्रेक घेतला आणि निघालो. गावाबाहेरचा तोच रस्ता आणि तीच वेळ त्या दिवशी मात्र काळवेळ ठरली." आता बोलता बोलता तोच रडू लागला.

" शांत हो.." म्हणत आभाने पाण्याचा ग्लास त्याच्या समोर धरला. तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव त्याला अपराधीपणाची जाणीव करते झाले.
तिच्या हातातला ग्लास घेत त्याने पाणी प्यायले.

" ताई, खूप आनंदात होतो गं आम्ही सगळे. रोजच्या सारखीच मजा मस्ती सुरु होती. एकमेकांना चिडवणं सुरू होतं. माझ्याच बाजूने रस्त्याकडून अमित चालत होता. त्या मजा मस्तीत एकमेकांना धक्के देत चालणे आमच्यासाठी रोजचेच होते. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ कमी त्यामुळे रस्त्यावर चालतांनाही आम्ही आमच्याच धुंदीत चालत होतो. गप्पांच्या ओघात अगदिच अनाहूतपणे मी अमितला ढकळले तोच अचानक एका भरधाव गाडीची त्याला धडक बसली.गाडीच्या वेगाने मी ही रस्त्याच्या कडेला पडलो.मला किरकोळ लागले पण समोर अमित रस्त्याच्या थारोळ्यात पडला.अमितला असं पाहून माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. गाडीतून उतरून कोणीतरी अमितच्या नव्याने टाहो फोडत त्याला मांडीवर घेतले एवढेच अस्पष्ट दिसले अन् मी बेशुद्ध झालो. दुसऱ्या दिवशी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. बाकीचे दोघेही भीतीने गलितगात्र झालेले माझ्या सोबतच होते. सगळ्याच प्रकाराने आम्हां तिघांना मानसिक धक्का बसला होता तेव्हाच अमित गेल्याचे समजले आणि मी जिवंतपणीच मेलो.माझी बोबडी वळाली.अमितचा रक्ताने माखलेला चेहरा डोळ्यांसमोर तरळला आणि पुन्हा शुद्ध हरपली. दरम्यानच्या काळात सगळच संपलं. गावकऱ्यांनी श्रेयश दादाला दोषी ठरवून गावाबाहेर काढलं ,तुमचं लग्न तुटलं. या अपघाताचं सत्य मनात दाबून ठेवत मी डिप्रेशनमध्ये गेलो . आधीच एक मित्र गमावला होता, तसाच दुसराही कायमचा दुरावू नये म्हणून बाकी दोघेही गप्प राहिले.
अमितच्या अपघाताचं सत्य आमच्या मनात,भीतीच्या चावीने कुलूपबंद झाले. तुझं लग्न झालं आणि मनावरचं दडपण काही प्रमाणात कमी झालं. डॉक्टरांच्या उपचाराने आणि आईवडिलांच्या पुण्याईने मी तब्बल दोन वर्षांनी यातून बाहेर पडलो. त्यानंतर अनेकदा हिमंत करूनही या अपघाताचं सत्य नाही सांगता आलं मला. त्यादिवशी माझ्या अपराधीपणाचं ओझं अजूनही श्रेयश दादाला वाहतांना पाहिलं आणि मी तुटलो. अजूनही तु त्यालाच दोषी मानतेस हे समजल्यावर तर मला स्वतःचा प्रचंड राग आला.आत्महत्या करण्याची इच्छा अनावर झाली पण दुसऱ्याच क्षणी मी स्वतःला रोखले. माझ्या आत्महत्येने दादाला न्याय मिळणार नव्हता किंबहुना त्याचं दोषही त्याच्याच माथी मारलं जाणार होतं. त्याच्या सहनशीलतेचा अंत होऊनही तो जिवंत होता आणि मी मात्र मरणाचा अंगरखा ओढून स्वतःला वाचवायचे ठरवत होते." बोलता बोलता त्याने डोळे टिपले आणि खंबीर बनला.

" पण आता नाही ताई. मला माझ्या अपराधाची शिक्षा मिळायलाच हवी. माझ्यामुळे मी माझा जीवलग मित्र गमावला, माझ्यामुळे श्रेयश दादाचं संपूर्ण आयुष्यच उद्धवस्त झालं, माझ्यामुळे तुमच्या प्रेमाचा अंत झाला. फक्त आणि फक्त मीच कारणीभूत आहे या सगळ्याला." म्हणत तो पुन्हा ओक्साबोक्सी रडू लागला.

" ताई, पण मी हे मुद्दाम केलं नाही हा फक्त एक अपघात होता जो फक्त आणि फक्त एका चुकीमुळे घडला." म्हणत त्याने तिच्या समोर हात जोडले.

त्याचा प्रत्येक शब्द तिच्या काळजावर वार करून गेला. भूतकाळाचं ते सत्य ज्याने तिचं भविष्य पूर्णपणे बदललं होतं, तिला एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे भासत होतं. डोळ्यांतून वाहणारं पाणी तिच्या दुःखाची निशाणी होतं की तिने श्रेयशवर केलेल्या अन्यायाची हे तिला मात्र कळत नव्हतं.उभ्या जागेवर ती खाली कोसळली. डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या अंधारात भूतकाळ मात्र स्पष्टपणे सरकतांना दिसला. एका दिशेला होता तिने मनापासून ज्याच्यावर प्रेम केले होते तो श्रेयश..त्याचं तिच्यावरचं प्रेम, त्या प्रेमाच्या आणाभाका, त्यांच्या लग्नाचा मंडप, खुश असलेली घरची मंडळी,तर दुसऱ्या दिशेला होता अमितच्या अपघातानंतरचा श्रेयश.. प्रत्येक क्षणी त्याचा केलेला तिरस्कार, त्याला लगावलेली चपराक, त्याच्या प्रेमाची तिने केलेली अवहेलना, तोडलेलं जन्मभराचं नातं..
आयुष्य तिनशे साठ अंशांनी फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोहचले होते जिथे तिने तिच्या प्रेमाला नाकारून तिरस्काराला स्विकारले होते. काहीच सुचत नव्हते, काहीच कळत नव्हते फक्त अन् फक्त श्रेयश आठवत होता. अमितच्या अंत्ययात्रेतून अपमानित करून हाकलून दिलेला. गावकऱ्यांनी दगड मारल्यानंतर डोक्याला झालेली जखम आणि त्यातून वाहणारं रक्त आजही तिला स्पष्ट दिसलं. आज त्या जखमेने तिच्या काळजात खोल वेदना झाली. श्रेयश दूर दूर जात होता.
" श्रेयश..." ती किंचाळली.
" ताई, सांभाळ स्वतःला." म्हणत रुपेशने तिला आधार दिला तशी ती भानावर आली. त्याचा हात जुगारून तिने बसल्या जागी हाताच्या ओंजळीत आपला चेहरा झाकला.

" रुपेश, हे तु काय केलेस? तेव्हाच का बोलला नाहीस ? न केलेल्या गुन्हाची खूप मोठी शिक्षा भोगली रे माझ्या श्रेयशने. सरपोतदार सर आणि मॅडम या दुःखातच गेले. आयुष्यात जिवंतपणीच नरकयातना भोगल्या त्याने. मला मंदारसोबत संसार करतांना पाहून किती यातना झाल्या असतील त्याला. जीवापाड प्रेम होतं त्याचं माझ्यावर आणि मीच त्याचं आयुष्य उद्धवस्त केलं." म्हणत ती ओक्साबोक्सी रडू लागली.

" मला माफ कर ताई पण त्यावेळी मी स्वतः जिवंतपणी मेलो होतो. तो मानसिक धक्का मला दुर्बल करून गेला पण आता नाही.. तु जी शिक्षा देशील ती भोगायला तयार आहे मी." म्हणत तो उठला आणि दरवाज्याच्या दिशेने निघाला.

" रुपेश.. थांब." म्हणत तिने डोळे टिपले.

तिच्या आवाजाने तो जाग्यावरच थांबला.

" यातलं काहीच आईबाबांना कळता कामा नये. ते मुलगा मानतात तुला. त्यांना हा धक्का कधीच सहन होणार नाही. मी माफ केलं तुला. एकदा श्रेयशचा तिरस्कार करायचा गुन्हा केला आहे मी ,ज्याची खूप मोठी शिक्षा त्याने भोगली.आता त्याच तिरस्काराने तुझं आयुष्य नाही उद्धवस्त करायचं मला. माझ्या अमितचं आयुष्यचं तेवढं होतं. त्या दिवशी जे घडलं तो फक्त एक अपघात होता एवढच खरं आहे. या डिप्रेशनमुळे आयुष्य उद्धवस्त करू नकोस. अमितला गमावलय आता तुला नाही गमावायचं. बाहेर पड या सगळ्यातून. तुला अश्या अवस्थेत पाहून अमित जिथे कुठे असेल तिथे दुःखी होत असेल. त्याला हे मरणोत्तर दुःख नाही होऊ द्यायचं. मला वचन दे तु या साऱ्यातून लवकरात लवकर बाहेर पडशील." तिने असे वचन मागताच तो माघारी तिच्यापाशी येऊन बसला.
तिच्या हातांच्या ओंजळीत त्याने आपल्या भावना रित्या केल्या. खूप रडला तो. शेवटी वचनबद्ध होत मान खाली घालून बाहेर पडला. गाडीजवळ जाताच नजर श्रेयशच्या बंगल्यावर खिळली. क्षणभर जाऊन श्रेयशची माफी मागावी अशी इच्छा झाली पण पुढच्याच क्षणी त्याने मनाचा निर्णय नाकारला. श्रेयशचं आयुष्य उद्धवस्त झाल्यानंतर तो त्याची काय माफी मागणार होता ?

क्रमश:

©® आर्या पाटील



🎭 Series Post

View all