तु असा जवळी रहा ( भाग ५१ वा)

लेकीच्या आयुष्यात आलेलं संकट दूर कर. गणराया, तिच्या वर्तमानाला तरी उद्धवस्त नको होऊ देऊ.' हात जोडत त्यांनी विनवणी केली.
तु असा जवळी रहा ( भाग ५१ वा)
©® आर्या पाटील

जरी आभाने माफ केले होते तरी श्रेयशच्या बाबतीत रुपेशच्या हातून घडलेला अपराध त्याला अंर्तबाह्य पोखरत होता.गाडीत बसून तो तेथून बाहेर पडला खरा पण गाडी चालवण्याची हिंमत होत नव्हती. मनावरचा भार कमी होत नव्हता. एसीत बसूनही त्याला गुदमरल्यासारखे होत होते. आभाच्या घरापासून काही अंतरावर जात त्याने गाडी थांबवली आणि खाली उतरत तो तिथेच झाडाखाली बसला. चेहऱ्यावरील आर्त भाव त्याच्या दुःखाची व्याप्ती आणखी गहिरी करत होते. बॉटलमधील पाणी तोंडावर मारत त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.
तोच हॉस्पिटलमधून घराकडे परतणाऱ्या मंदारची नजर त्याच्यावर पडली. त्याने रुपेशला बरोबर ओळखले. पुढे जाऊन गाडी थांबवत त्याने पहिल्यांदा आभाला कॉल केला पण तिचा मोबाईल घरातच राहिल्याने कॉल उचलला नाही.
' रुपेश आभाला भेटून आला असेल की घरी चालला असेल ? तो कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना?' स्वगत होत लागलीच त्याने यु टर्न घेतला. रुपेशच्या गाडीजवळ थांबत तो खाली उतरला. हाताच्या ओंजळीत चेहरा झाकलेला रुपेश त्याला खूपच हतबल वाटला.

" रुपेश, अरे काय झाले ? तु इथे काय करतोस ?" त्याच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला.
मंदारच्या आवाजाने रुपेश आणखी बिथरला.

" भावोजी, मी मुद्दामहून काहीच केले नाही तो फक्त अपघात होता." तो घाबरत म्हणाला.

" अरे कश्याबद्दल बोलत आहेत ? कोणता अपघात ? आणि तु आभाला भेटायला घरी येणार होतास ना ?" तो आश्चर्याने म्हणाला.

मंदार तिथे नसल्याने तो त्या सत्यापासून अनभिज्ञ असल्याचे लक्षात येताच रुपेशने स्वतःला सावरले.
" मी गेलो होतो घरी. ताईला भेटलो आणि मग निघालो." तो दबकतच म्हणाला.

" सगळं व्यवस्थित आहे ना ?" त्याने काळजीने विचारले.
होकारार्थी मान हलवत रुपेशने प्रतिसाद दिला.

" खूप बैचेन वाटत आहेस. घरी चल जेवून मग जा." त्याची परिस्थिती पाहून मंदारने सुचवले.

" नको भावोजी. मी जाईन घरी व्यवस्थित. गाडीत थोडं गुदमरल्यासारखं झालं म्हणून मोकळ्या हवेत गाडी थांबवली." तो टाळत म्हणाला.

" आणि ते अपघाताचं काय म्हणत होतास. रुपेश, अमितला जाऊन आज एवढी वर्षे झाली आता तरी तु यातून बाहेर पडावस. घडलेली घटना खूप विदारक होती म्हणून मागे राहिलेल्या स्वकियांचं जगणं थांबत नाही ना. आभा यातून बाहेर पडत आहे. तु ही सावर स्वतःला आणि यातून बाहेर ये. नियतीपुढे कोणाचे काहीच चालत नाही." त्याच्या खांद्यावर हात ठेवत मंदारने समजावले.
मंदारच्या बोलण्याने त्याला अश्रू अनावर झाले.

" भावोजी, तुम्ही खूप ग्रेट आहात. आभाताई खूप नशिबवान आहे की तुम्ही तिच्या सोबत आहात.सगळ्यात वाईट श्रेयश दादाबद्दल वाटतय एवढच. त्याच्या आयुष्यात जे काही घडलय त्याला फक्त मी जबाबदार आहे." तो ओघात बोलून गेला.

" म्हणजे ?" मंदार विस्मयाने म्हणाला. श्रेयशचं नाव रुपेशच्या तोंडून ऐकून त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

" मी प्रसंगावधानता दाखवली असती तर दादाचं आयुष्य उद्धवस्त झालं नसतं." म्हणता म्हणता त्याने मंदारचे हात हातात घेतले.

" आभाताई आणि दादाचा भूतकाळ स्विकारून तुम्ही त्याच्याशी मैत्री केली. त्याला मित्राचा भक्कम आधार दिला. खूप ग्रेट आहात तुम्ही.कायम असेच माझ्या ताईला सांभाळा. मी निघतो." तो म्हणाला आणि मागे वळला.
त्याच्या शब्दांनी मात्र मंदारचा तोल गेला. कसेबसे स्वतःला सावरत त्याने रुपेशला अडवले.

" पण.." तो पुढचं काही बोलणार तोच रुपेश पुन्हा मागे वळला.

" घाबरू नका. मी व्यवस्थित घरी जाईन. गैरसमजाचं मळभ दुर झाल्यावर मला मोकळं वाटतय. आभा ताईला माझ्याबद्दल सांगू नका ती काळजी करेल." म्हणत तो तसाच निघाला. गाडीत बसत त्याने पुन्हा एकदा मंदारचा निरोप घेतला आणि निघून गेला.
मंदार मात्र आपला जाणारा तोल सावरत तिथेच झाडाखाली बसला.

' आभा आणि श्रेयश यांचा भूतकाळ म्हणजे ? श्रेयशच्या डिप्रेशनला अमितचं जाणं कारणीभूत आहे का ? श्रेयशचा काय संबंध या सगळ्यांशी ? म्हणजे आईबाबा आणि श्रेयश यांच्यामध्ये असणारी आपुलकी आजची नव्हती ? आभाचं त्या दिवशीचं श्रेयशच्या प्रती वागणं फक्त काळजी नव्हती ? श्रेयशचं आभाला पाहून हळवं होणं याचं रहस्य त्यांच्या भूतकाळात दडलय ? काय होता त्यांचा भूतकाळ ? त्यांच एकमेकांवर प्रेम होतं ? नाही नाही ते शक्य नाही. चुकीचा विचार करतोय मी.' स्वगत होत त्याने आपला चेहऱ्यावरून हात फिरवला.

' मग रुपेशला काय म्हणायचे असेल ?' विचारांच्या गर्दीत क्षणभर त्याला घेरी आली. मनातले विचार आभा आणि श्रेयशच्या वागण्याचं कोडं उलगडू पाहत होते.
त्याला त्या दिवशीचा हॉस्पिटलमधला प्रसंग आठवला आणि काळजात धस्स झालं.त्याने लागलीच मोबाईल काढला आणि आभाला फोन लावला. आताही तिने कॉल उचलला नाही. तो तसाच गाडीत बसला आणि घराच्या दिशेने निघाला. काही मिनिटांच अंतर त्याला मैलोचं वाटलं. मनातील विचारांनी हात थरथरत होते. आभाचा हळवा चेहरा नजरेसमोरून हलत नव्हता. काही वेळातच तो घरी पोहचला.गाडी पार्क करून तो घाईतच घराकडे वळला. दरवाजा उघडाच होता. आत शिरत त्याने दिर्घश्वास घेतला.

'आभाशी बोलतांना तिच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणं गरजेच आहे.' स्वगत होत त्याने स्वतःला सावरले.
किचन, बेडरूम, बाथरूम, देवघर, बाल्कनी आणि गार्डन सगळीकडे शोधले पण आभा भेटली नाही. तिला साद घालतांना त्याच्या काळजात धस्स झाले. मोबाईल काढत त्याने तिला कॉल लावला. फोनचा आवाज घरातच येताच तो आणखी घाबरला. घराबाहेर पडत तो पुन्हा तिला साद घालू लागला. तोच नजर समोर श्रेयशच्या बंगल्याकडे गेली. गेट तसाच उघडा होता.

' नाही ती तिथे जाणार नाही. मी नसतांना तर नाहीच नाही.' मनाने अंदाज बांधला.
तिच्या काळजीपोटी त्याने तिथे जाण्याचे ठरवले. मन मानत नव्हते पण बुद्धी वेगळाच संकेत देत होती.
मन आणि बुद्धीचे द्वंद्व सोडवत त्याची पाऊले श्रेयशच्या बंगल्याच्या दिशेने निघाली. भावनांनी कल्लोळ माजवला होता. मन जरतरचे अंदाज बांधण्यात गर्क झाले होते. दबक्या पावलांनी रस्ता कापत तो दरवाज्यापाशी पोहचला. दरवाजा उघडा पाहून त्याने दिर्घ सुस्कारा सोडला.

' आभा, इथे नसेल.' परत एकदा मनाने स्पष्टपणा स्विकारला आणि मागे परतण्याचा निर्णय घेतला तोच श्रेयशच्या रडक्या आवाजाने त्याला थांबवले.

' श्रेयश..' तो स्वगत होत आता मात्र घरात प्रवेश करता झाला.

श्रेयशच्या रडण्याचा आवाज आणखी स्पष्ट ऐकू येऊ लागला.
हॉलमध्ये भिंतीला टेकून बसलेली आभा आणि तिच्या मांडीवर लहान मुलाप्रमाणे डोकं ठेवून रडणारा श्रेयश पाहून त्याच्या काळजात धस्स झालं. पाठमोरे असलेल्या आणि आपल्याच दुःखाच्या परिघात हरवलेल्या त्या दोघांना मात्र मंदार आल्याची जाणीवही झाली नाही.
त्यांना एकत्र पाहून तो मात्र जागीच थबकला. डोळ्यांतून नकळत अश्रूधारा ओघळू लागल्या. यावेळेस त्याची बुद्धी जिंकली होती. दोघांच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमाला तो प्रत्यक्ष अनुभवत होता. श्रेयशच्या रडण्याने आभाला होणाऱ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर त्याला स्पष्ट दिसल्या. त्याच्या केंसावर हात फिरवून त्याला शांत करणाऱ्या तिला पाहून तो सैरभैर झाला.
दाटून आला आवंढा गिळत लगेच त्याने नजर वळवली. त्यांना एकत्र पाहणे त्याला अशक्य होत होते. तो आल्यापावली तसाच मागे निघाला.

" किती आनंदात होते सगळे. सप्तपदी चालून कायमचे एक होणार होतो आपण.आईबाबांनी आपल्या बाबतीत पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता होणार होती. लहानपणीचं आपलं प्रेम साता जन्मासाठी वचनबद्ध होणार होतं. नियतीने मात्र क्षणार्धात सगळं बदललं. ज्या अग्निकुंडासमोर आपल्या प्रेमाची नवी नांदी होणार होती,अमितच्या अपघाताने आपलं प्रेम मात्र त्याच अग्निकुंडातील समिधा बनले." श्रेयशच्या बोलण्याने मात्र त्याचे पाय जागीच थबकले.

" या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्यावरच खुनाचा आळ घेत मी सगळं संपवलं.अमितच्या जाण्याने जशी मी तुटले होते तसाच तु ही उद्धवस्त झाला होतास. तुझ्यावर झालेली पोलिस केस,गावकरांनी घेतलेला चुकीचा आळ, मी दिलेली शिक्षा, कायमचं तोडलेलं आपलं नातं, गावातून कायमचं निघून जाण्याचा केलेला अट्टाहास, तुझं डिप्रेशन आणि सरपोतदार सर आणि मॅडमचं निधन. किती सहन केलस तु. फक्त आणि फक्त माझ्यामुळे. ज्यावेळी तुला माझ्या आधाराची गरज होती मी तुला कायमचं परकं केलं. प्रेम जगायला शिकवतं रे पण माझ्या प्रेमाने तुला आत्महत्या करण्यास.." बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले. त्याच्या डोक्यावर डोकं ठेवत ती रडू लागली.

तिच्या बोलण्याने मात्र मंदारच्या पायाखालची जमिन हादरली. तिचा जो भूतकाळ त्याने फक्त तिच्या ओघळणाऱ्या अश्रूंनी अनुभवला होता तो आज त्याला असा कळत होता. त्या भूतकाळाचे आभाळाएवढे शल्य त्याला असह्य करत होते. लग्नानंतर त्याने क्रित्येकदा मित्र, प्रियकर आणि पती बनून तिच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तिने मात्र भूतकाळाच्या या रहस्याचा त्याला थांग पत्ताही लागू दिला नव्हता. डोळ्यांतून वाहणारं पाणी हे तिच्या श्रेयशवरच्या प्रेमाचं मानक होतं की तिच्या मनात प्रयत्न करूनही त्याने न मिळवलेल्या स्थानाचं हे त्यालाच कळत नव्हतं. अजून एक क्षणही तिथे थांबायची त्याची हिंमत नव्हती. त्याच्या घरातून बाहेर पडत तो आपल्या बंगल्यात परतला मात्र तिथे थांबणेही त्याला मरणप्राय यातना देऊ लागले.तिच्या सोबतीने जपलेला आपल्या संसाराचा प्राजक्त त्याला क्षणभरात निष्पर्ण भासू लागला. तिच्यासोबत जगलेलं आयुष्य मृगजळासम वाटू लागले. तिची वेदना कळावी म्हणून अट्टाहास करणारा तो आज त्याच वेदनेने पोळत होता. तो तसाच रुममध्ये शिरला. दरवाजा बंद करून घेत त्याने आपल्या वेदनेला मोकळे केले. कोपऱ्यात बसत तोंड हाताने दाबून धरत तो रडू लागला.
वास्तविकता तर समोर स्पष्ट दिसली होती पण त्याची व्यापकता अजूनही समजली नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर आभाच्या आईवडिलांचा चेहरा आला. श्रेयशला पहिल्यांदा भेटल्यानंतर हळवी झालेल्या तिच्या आईच्या अगतिकतेचे कारण त्याला आज कळाले. त्या दिवशी श्रेयशला निरोप देतांना भावूक झालेल्या तिच्या आईवडिलांच्या भावनांचा अर्थ त्याला आज लागला. दिर्घ सुस्कारा घेत त्याने डोळे टिपले.
आपला मोबाईल काढत त्याने आभाच्या आईला फोन लावला.
थोड्या वेळातच समोरून फोन उचलला गेला.

" बाबा, तु कसा आहेस ?" छोट्या श्रेयाचे शब्द कानावर पडताच तो हळवा झाला. डोळ्यांतून पुन्हा अश्रूधारा ओघळू लागल्या.

" मी ठिक आहे बेटा. मला आजीशी बोलायचं आहे थोडं. तु आजोबांसोबत खेळशील ?" त्याने अश्रू टिपत विचारले.

" खूप महत्त्वाचं आहे का ? मी जाते आजोबांजवळ तु बोल आजीशी." म्हणत तिने आभाच्या आईकडे मोबाईल दिला आणि शहाण्या बाळासारखी बाहेर आजोबांजवळ जाऊन बसली.

आभाच्या आईने फोन घेतला.
" मंदारराव, तुमची तब्येत ठिक आहे ना ?" फोन कानाला लावत चौकशी केली.

" मला बोलायचं आहे तुमच्याशी. श्रेयाला काही कळता कामा नये." जड स्वरात तो म्हणाला.

त्याच्या बोलण्यातील आर्तता आईलाही कळून चुकली.
" सगळं ठिक आहे ना तिकडे ? तुम्ही बरे आहात ना ? आभा, ती बरी आहे ना ?" आई काळजीने म्हणाल्या.

आभाचं नाव ऐकताच तो गंभीर झाला.
" तुम्ही अमितसारखं मला तुमचा मुलगा मानता ना ?" त्याने प्रश्न केला.

" आमच्यासाठी तुम्हीच अमित आहात. तुम्ही स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे आम्हांला सांभाळता, आमची काळजी घेता. पूर्वजन्मीचं संचित म्हणून तुम्ही आमच्या आयुष्यात आलात." बोलता बोलता त्या हळव्या झाल्या.

" आई, आज त्याच हक्काने मला तुम्हांला काही विचारायचं आहे. खात्री आहे तुम्ही सगळं सांगाल." तो गहिवरला.

" बोला मंदारराव. आपल्या मुलापासून एक आई काहीच लपवणार नाही. माझं वचन आहे तुम्हांला." अनाहूतपणे त्या बोलून गेल्या.

" मला आभाच्या भूतकाळाविषयी जाणून घ्यायचं आहे. आभा आणि श्रेयशच्या प्रेमाविषयी..." त्याला पुढचं बोलणंही अशक्य झालं. मोबाईल कानापासून बाजूला घेत त्याने अश्रू टिपले.
त्याच्या या प्रश्नाने आभाची आई मात्र चांगलीच हादरली.आभाच्या भूतकाळाचं ते पान जे मंदारपासून अनभिज्ञ होतं आज त्याच पानावर तो येऊन पोहचला होता. त्याचं आभावरचं अमर्यादित प्रेम तिच्या आईवडिलांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्या पानाचा उलगडा मंदारसाठी हृदयद्रावक ठरेल म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक ते टाळले होते. आज मात्र आभाच्या आईला मंदारला टाळणं अशक्य होते.

" मंदार, तुम्हांला हे कोणी सांगितले." त्या शांतपणे म्हणाल्या.

" आई, ते महत्त्वाचं नाही गं. माझं सत्य जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तिच्यावर जीवापाड प्रेम केलं आहे मी त्यामुळे तिचा भूतकाळ जाणून घेण्याचा मला अधिकार आहे." आता मात्र त्याला अश्रू लपवणे अशक्य झाले. त्याच्या एकेरी उच्चाराने आभाच्या आईला भरून आले. त्याचा रडका आवाज तिला बैचेन करू लागला.

" तुम्ही आधी स्वतःला सावरा. रडणं थांबवा. भूतकाळ काहीही असला तरी आपल्या वर्तमानाला वेदना होतांना पाहणं आभालाही त्रासदायक होईल. तुम्हांला तिच्या प्रेमाची शपथ डोळे पुसा आधी." आपले अश्रू टिपत त्या म्हणाल्या.

आभाच्या प्रेमाखातर तर तो जगत होता. तिच्या त्याच प्रेमाच्या शपथेखातर त्याने डोळे टिपले.
" हो, आभा आणि श्रेयशचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं. लहानपणीची मैत्री हळुवारपणे प्रेमात बदलली.." म्हणत आभाच्या आईने त्यांच्या प्रेमाचं ते पान जसच्या तसं त्याच्या समोर उलगडलं.

तिच्या प्रेमाची व्याप्ती ऐकतांना तो मात्र हळवा होत होता.

" खूप आनंदात जगत होतो आम्ही. त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. संध्याकाळी तेच काम आवरून अमित आपल्या मित्रांसोबत फेरफटका मारायला गेला.." बोलता बोलता त्यांना रडू कोसळले. आपले अश्रू टिपत भरल्या हृदयाने त्यांनी तो हृदयदावक प्रसंग सांगितला ज्याने त्या सगळ्यांचं आयुष्य कायमचं बदललं होतं.

" त्या अपघातात अमित गेला. ज्या अंगणातून त्यांच्या सप्तपदीचे सुरू निनादणार होते त्याच अंगणात त्यांच्या प्रेमाची मरणशय्या सजली. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्याच्यावर दगड हल्ला केला. त्यांनी श्रेयशचा जीव घेतला असता पण आभाने मात्र तसे होऊ दिले नाही. तिने त्याला आपल्या आयुष्यातून कायमचं बेदखल करून त्याचा जीव वाचवला. त्याच्या प्रेमाला नाकारून त्याला जीवनदान दिले. त्याला गावातून कायमचं निघून जायला सांगून सरपोतदार मॅडम आणि सरांचा सततचा होणारा अपमान थांबवला. अपराधीपणाचं चिलखत लादून तिने त्याला वाचवलं. त्या दिवशी सगळं संपलं." म्हणत त्यांनी अश्रू टिपले. त्याच्या डोळ्यांतूनही अश्रूच्या धारा लागल्या मात्र त्याक्षणी त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे पाणी हे आभा आणि श्रेयशच्या दुरावलेल्या नात्यासाठी होते.

" या प्रसंगानंतर आभाही डिप्रेशमध्ये होती. आमच्यासाठी ती खंबीर बनत होती पण आतून ती ही तुटली होती. आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण श्रेयशच्या बाबतीत घेतलेल्या आपल्या निर्णयावर ती ठाम होती. अमितसारखच तिलाही गमावू नये म्हणून आम्हीच तिच्या लग्नाचा घाट घातला. थांबलेल्या तिच्या आयुष्याला प्रवाही बनविण्यासाठी आम्ही तिला आमच्या मरणाची भीती दाखवून वचनबद्ध केलं. तुमच्याशी लग्न लावून देत तिला डिप्रेशमधून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या आयुष्यात घडून आलेला बदल फक्त एक चमत्कार होता.आमच्या आभाला तुम्ही पुन्हा प्रवाही बनवले, तिची रुसलेली कळी तुमच्या तिच्या आयुष्यात येण्याने खुळली, ती डिप्रेशमधून,आपल्या भूतकाळातून बाहेर आली ती फक्त तुमच्यामुळे. " आभाच्या आईने भूतकाळाचा लेखाजोखा त्याच्यासमोर मांडला.

" आई, तिचा भूतकाळ कायम तिच्या सोबतच होता.नकळत तिच्या डोळ्यांतून ओघळणारे पाणी फक्त अमितसाठी नव्हते. तिरस्काराच्या रुपात का होईना श्रेयश तिच्या सोबतच होता." मंदार स्पष्टपणे म्हणाला.

" मला खूप काळजी लागली आहे. हे सत्य समजल्यावर तुमचं आभावरचं प्रेम.." बोलता बोलता तिची आई रडू लागली.

" आई रडू नका. प्रेम असं संपत असतं तर श्रेयशने कधीच आपलं आयुष्य नव्याने सुरू केलं असतं. तुम्ही काळजी करू नका. श्रेयाला सांभाळा." म्हणत त्याने फोन ठेवला.

आभाची आई मात्र तशीच देवघरात पोहचली.
' लेकीच्या आयुष्यात आलेलं संकट दूर कर. गणराया, तिच्या वर्तमानाला तरी उद्धवस्त नको होऊ देऊ.' हात जोडत त्यांनी विनवणी केली.
यापुढे आणखी काहीच तर त्यांच्या हातात नव्हते.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all