तु असा जवळी रहा ( भाग ५३ वा)

डोळे टिपत तिने पुन्हा मानेनेच होकार दिला आणि ती निघून गेली. ती निघून गेली त्याच्या वाट्याला आलेला अंधार सोबत घेऊन. गैरसमजाचे काळे ढग ओसरले होते. आज क्रित्येक वर्षांनी त्याच्या मनातलं वादळ शमलं होतं. आईबाबांच्या फोटोला उराशी कवटाळत त्याने दीर्घ सुस्कारा टाकला आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला.
तु असा जवळी रहा ( भाग ५३ वा)

©® आर्या पाटील

तिला ऐकतांना त्याला मात्र त्रास होत होता. मंदार सोबत तिला रमतांना पाहून तो तुटत होता.

' मी असा का विचार करतोय ? तिला आनंदात पाहणं यातच माझं सुख आहे.' स्वगत होत त्याने डोळ्यांतील अश्रू टिपले.

" तो बाबा होणार आहे हे कळल्यावर तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मला फुलाप्रमाणे जपत होता तो. मी मात्र तेव्हाही स्थिर नव्हते. कातरवेळी मन जुन्या आठवणींनी चिंब भिजायचं. एका संध्याकाळी मला उदास पाहून तो गहिवरला. आपल्या बाळासाठी आनंदी राहण्याचं वचन घेतलं माझ्याकडून.माझ्या स्ट्रेसमुळे डिलिव्हरीच्या वेळेस खूप कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या पण त्याने सगळं सावरलं. श्रेयाला पहिल्यांदा हातात घेतल्यानंतर त्याच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू मला त्याच्याप्रती हळवं करून गेले.जेव्हा बाळंतपणात त्याने आई बनून माझी काळजी घेतली तेव्हा त्याच्यात मला तु भेटलास. मी प्रेमात पडले त्याच्या. आमच्या प्रेमाचं श्रेय त्याने आमच्या लेकीला देत तिचे नाव श्रेया ठेवले आणि नकळत आयुष्यभरासाठी तुझे नाव माझ्या नावासोबत जोडले. श्रेया आमच्या आयुष्यात आली तेच मुळी आमच्या प्रेमाचं प्रतिक बनून. त्याचं निस्वार्थ प्रेम माझ्या जगण्यासाठी संजीवनी ठरले. मी रमले रे संसारात. प्रेम एकदाच होतं असं म्हणतात पण मी मात्र नव्याने त्याच्या प्रेमात पडले.
तो जवळ असला की आभाळाच्या कवेत असल्यासारखं वाटतं, त्याच्याशी बोलतांना मन हलकं होतं, त्याचा सहवास जीवन सुगंधीत करतो. माझ्या रडण्याचा, हसण्याचा किंबहुना नव्याने जगण्याचा तो साक्षीदार आहे." ती त्याच्याविषयी भरभरून बोलत असतांना श्रेयशला मात्र अश्रू अनावर झाले. आपला चेहरा ओंजळीत झाकत त्याने ते लपविण्याचा प्रयत्न केला. आभाला मात्र आता त्याला तुटू द्यायचं नव्हतं. सत्यात दडलेली वास्तविकता तिला उलगडायची होती. जागेवरून उठत ती त्याच्या पुढ्यात उभी राहिली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.

" श्रेयश, ज्या वाटेवरून आपण आपल्या प्रेमाचा प्रवास सुरु केला होता ती वाट आता खूप दूर गेली आहे." त्याला सावरत ती म्हणाली.

" मी मात्र अजूनही त्याच वाटेवर उभा आहे किंबहुना असेन. माझं प्रेम नेहमीच शाश्वत राहिल. मी आजही तुझ्यावर..." आता पुढचं बोलणं त्याला शक्य नव्हतं. तिच्यावरील आपलं प्रेम व्यक्त करतांना आता मात्र त्याला अपराधी वाटत होतं .

" श्रेयश, अजून किती वेळ तु त्याच वळणावर थांबणार आहेस. तुला प्रवाही बनावं लागेल." ती म्हणाली.

" ते माझ्याने शक्य नाही." तो ही उत्तरला.

"नियतीपुढे कुणाचे काहीच तर चालत नाही. आपली सोबत कदाचित अर्ध्यावरच होती. ती सोबत संपली म्हणून आयुष्य थांबत नाही. प्रेमाची मशाल हाती असल्यास अंधाऱ्या जीवनप्रवासात हक्काची सोबत सापडतेच .आपल्या सुख, दुःखात वाटेकरी असणारा, आपण चुकल्यावर आपल्याला सावरणारा, आपण रडल्यावर अश्रू पुसणारा, आपली आतुरतेने वाट पाहणारा, आपल्या आवडी जपणारा एक सोबती आयुष्याचा प्रवास सुखद करतो. तुझ्या आयुष्यातील अंधार संपवणारी नवी प्रभा त्याच वाटेवर कुठेतरी तुझ्यासाठी नक्कीच थांबली असणार. तुला फक्त एक पाऊल त्या दिशेने टाकायचे आहे." त्याच्या हाताची ओंजळ बाजुला करत तिने होकारार्थी मान हलवली.

" ते इतकं सहज शक्य आहे का ?" नकारार्थी मान हलवत तो हळवा होत म्हणाला.

" सहज नाही पण शक्य नक्कीच आहे. एक नवी सोबत तुझं जगणं सुखद बनवेल. तिच्या प्रेमाच्या सावलीत आजवरची सगळी वणवण संपेल. तिच्या मायेचा ओलावा तुला शांत करेल.तिच्यासोबत संसार करतांना प्रेमाचा नवा अर्थ उमगेल. तिचा सहवास तुझा मोकळा श्वास बनेल.तुझा अंश तिच्या उदरात अंकुरतांना तुझाच जणू नव्याने जन्म होईल. त्या अंशाच्या रुपात ती तुला आयुष्यातील सगळ्यात अनमोल भेट देईल. तुझं जगणं बहरेल आणि त्या समाधानाने सरपोतदार सर आणि मॅडम जिथे कुठे असतील तिथे त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल." बोलता बोलता आता तिच हळवी झाली.

आपल्या आभाकडून आपल्याला हे सर्व ऐकावं लागेल याची कल्पनाही कधी न केलेल्या श्रेयशला अश्रू अनावर झाले. त्याच्या पुढ्यात उभ्या असलेल्या तिला लहान मुलागत बिलगून तो रडू लागला.
तिलाही अश्रू अनावर झाले. त्याच्या डोक्यावर हात फिरवत तिने त्याला रडू दिले.

" आभा, माझ्यासाठी खूप कठिण आहे गं हे." तो रडत म्हणाला.

" माझ्यासाठीही कठिणच होते पण तरीही ते स्विकारावं लागेल. तु खूप सहन केलं आहेस. यापुढे तुला या अवस्थेत मला नाही पाहता येणार. मनावर खूप मोठं ओझं आहे माझ्या. मी मरेपर्यंत हे ओझं उतरणार नाही पण आयुष्यात तु जर पुढे गेल्यास तर मनावरचं हे ओझं काही अंशी तरी कमी होईल रे. नाहीतर मी रोज आतून मरत राहेन.." ती बोलतच होती की त्याने तिच्या ओठांवर हात ठेवत तिला शांत केले.

" प्लिज मी जे सहन केलय ते तुझ्या वाट्याला नको." तिचे डोळे पुसत तो म्हणाला.

" मग मला एक वचन दे." त्याचे हात हातात घेत ती म्हणाली.

" आभा, प्लिज कोणत्याच वचनात मला बांधु नकोस." तो पुन्हा रडवेला झाला.

" तुला आपल्या प्रेमाची शपथ.." तिने असे म्हणताच तो हसला.

" प्रेम संपवण्यासाठी त्याच प्रेमाची शपथ ?" तो म्हणाला.

" कोण म्हणालं आयुष्यात पुढे गेल्याने पहिलं प्रेम संपतं. पहिलं प्रेम पावसाच्या पहिल्या सरींसारखं असतं.निरागस आणि अवखळ.आकाश आणि धरेला जोडणारा सुंदर दुवा जणू.नंतर पावसात कितीही चिंब भिजलो तरी पहिलं भिजणं कधीच विसरत नाही.पहिल्या प्रेमाचा सुगंधही आयुष्यातून कधीच सरत नाही.पहिलं प्रेम कधीच संपत नसतं किंबहुना मनाच्या गाभाऱ्यात ते अखंड दरवळत राहतं." तिच्या बोलण्याने पहिल्या प्रेमाच्या त्यांच्या आठवणी प्रफुल्लित झाल्या. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

" श्रेयश, तुझ्या आयुष्यात मी प्रेमाची गोड आठवण बनून कायमची राहीन पण ती मात्र जगण्याची प्रेरणा बनून येईल. मला वचन दे तू आयुष्यात पुढे जाशील." ती त्याचे हात हातात घेत म्हणाली.

त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. त्याचा जीव असलेली ती त्याच्याकडे दुसऱ्यासाठी त्याचं जगणं मागत होती.

" प्लिज, श्रेयश. मला वचन दे नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तुझ्यावर केलेल्या अन्यायाच्या अग्नीत जळत राहेन आयुष्यभर. तु लग्न केले नाहीस तर माझं जगणं थांबेल.." हतबल होत ती खाली बसली. तिला असं हतबल पाहणे त्याच्यासाठी अशक्य होतं.

" मी वचन देतो, तुला त्रास नाही होऊ देणार. तुझ्यासाठी मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करेन..." म्हणत त्याने आधार देत तिला उठवले.

त्याच्या शब्दांनी तिने डोळे गच्च मिटले. गालांवरून ओघळणारे अश्रू मनाची संमिश्र भावना प्रकट करत होते. आताही तो तिच्याच सुखाचा विचार करत होता. हातातून काय सुटलय या जाणीवेने ती हळवी होत होती पण तो नव्याने आयुष्याकडे पाहणार ही भावना सुखावत होती.
त्याने तिला सोफ्यावर बसवले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत केले.

" आभा, आज खूप दिवसांनी मलाच मी नव्याने भेटल्यासारखे वाटले. आज खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटलं. खूप शांत वाटतय मला." बोलतांना जुना श्रेयश तिला भेटला.

त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकले मात्र अंर्तमनात अजूनही त्याची तिच्यामुळे झालेल्या बिकट अवस्थेची वेदना उठत होती.

तोच श्रेयशचा फोन वाजला आणि दोघे भानावर आले.

फोन उचलत श्रेयशने तो कानाला लावला.

" पोहचतो ऑफिसला थोड्यावेळात मग बोलू." समोरचं ऐकत तो म्हणाला आणि फोन ठेवला.

" आभा , मला ऑफिसला जावं लागेल अर्जन्ट आहे. ऑफिसचं हे काम मार्गी लावून उदया सकाळी निघायचं आहे." म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले.

तिच्या चेहऱ्यावरची व्याकुळता त्याला स्पष्ट दिसली.

" काळजी करू नकोस मी सावरेन स्वतःला." त्याने असे म्हणताच तिने होकारार्थी मान हलवली.
घड्याळ्यात दुपारचे एक वाजले होते.

" खूप उशीर झाला आहे मी निघते. मंदार वाट पाहत असेल." म्हणत ती उठली.

" आभा, मंदारशी तू भूतकाळाविषयी बोलावस. उदया त्याला बाहेरून काही कळलं तर त्याचा विश्वास तुटेल." तो म्हणाला.
त्याच्या बोलण्याने ती मात्र शांत झाली.

" काळजी करू नकोस तो खूप चांगला माणूस आहे." त्याने तिच्या मनातलं ओळखत सांगितले.

" आपल्या भूतकाळाने तो तुटू नये म्हणून त्याला सांगणं टाळलं." ती उत्तरली.

" तेव्हा त्याला सावरायला तू असशील सोबत पण जर बाहेरून कळालं तर त्याला सावरणं कठीण जाईल. जमल्यास सांग त्याला सगळं. हे ऐकून त्यांच तुझ्यावरचं प्रेम तिळमात्रही कमी होणार नाही " त्याने खात्रीने सांगितले.
तिने होकारार्थी मान हलवली आणि ती निघाली.

" उद्या जातांना एकदा शेवटचं भेटशील ?" त्याच्या बोलण्यातील आर्तता तिच्या काळजाला भिडली आणि डोळ्यांतून तरळली.

डोळे टिपत तिने पुन्हा मानेनेच होकार दिला आणि ती निघून गेली. ती निघून गेली त्याच्या वाट्याला आलेला अंधार सोबत घेऊन. गैरसमजाचे काळे ढग ओसरले होते. आज क्रित्येक वर्षांनी त्याच्या मनातलं वादळ शमलं होतं. आईबाबांच्या फोटोला उराशी कवटाळत त्याने दीर्घ सुस्कारा टाकला आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला.