Login

तू चाल पुढं... भाग 1

मुलींच्या शिक्षणाची वाट संपूर्ण गावाला दाखवणारी एक इरसाल आजी
तू चाल पुढं.... भाग 1
" सुमे आग शाळत न्हाय जायचं व्हय आज ? " झामाबाईने आपल्या नातीला विचारले .
" ते आई म्हणाली आज नको जाऊ शाळेत . " सुमन खालच्या आवाजात म्हणाली .
" अग पर कालच बाई भेटल्या नव्हं बाजारात . किती कवतिक करत व्हत्या . म्हणल्या झामाबाई तुमची नात लई हुशार हाय . " झामाबाई आपला मुद्दा रेटत होती तेवढयात सुमनला तिच्या आईने आवाज दिला .


" सूमे,जरा भाकऱ्या थापायला घे . म्या जरा बाहिर जाऊन
येती . "
असे म्हणून सून निघाली .

"तारे, पोरीचं दहावीचं वरीस हाय . तिला नग काम सांगू . म्या करते भाकऱ्या . " आजी म्हणाली .

" आत्याबाय फूड तिला सासरी भाकऱ्याच थापायच्या हाये . " ताराबाई टेचात उत्तर देऊन निघुन गेली .

आजी आत गेली . डोळे पुसत असलेली सुमन तिला दिसली .
" सुमे काय झालं रडायला ? " झामाबाई तिच्या जवळ गेली . तिला प्रेमाने जवळ घेतले .

" आजी मला शिकायचं आहे . मला नाही करायचं लग्न ." सुमन रडत होती .

" लगीन ? कोण म्हणल आसं ?" झामाबाई चिडली .

" आबा आणि आई म्हणाले बाळूच्या शालीने तोंड काळं केलं तस आपलं व्हायला नको . आजी मला शिकायचं आहे पुढे . "
सुमन आजीला बिलगून रडत होती .

" सुमे त्वा आवरून साळला जा . भाकऱ्या म्या करिते . " आजीने पदर खोचला .

" नको आजी आबा तुला ओरडतील . " सुमन घाबरून म्हणाली .

" म्या त्याला जलम दिला हाय . त्वा व्हय साळला . " सुमन आनंदाने शाळेला गेली .


झामाबाई भाकऱ्या थापत असतानाच तारा परत आली .

" आत्या, सुमी कुठं हाय ? तुमी भाकऱ्या थापताय?" ताराने विचारले .

" सुमी साळला गेली . म्याच पाठवल तिला ." झामाबाई शांतपणे म्हणाली .
" आव पर कशाला ? आता तिला काय साळत पाठवयच न्हाय ." तारा चिडली .

" म्या बघते कोण अडिवत त्ये?" आजीपण आता चिडली होती .

तारा रागाने बाहेर निघून गेली . दुपारी म्हातारीचा लेक घरी आला . ताराने लगेच त्याला सगळे सांगितले .

" आये बाहीर ये! " गुजाबा जोरात ओरडला .

" अय गुज्या म्या बहिरी न्हाय झाले . काय आग लागली का
कुठं ? "
झामाबाई जोरात ओरडली .

" त्वा सुमीला साळत का धाडलं ? " गुजाबा चिडून विचारू लागला .

" शिकायला ."
तिने शांतपणे उत्तर दिले .

" हे बघ आये शाली त्वांड काळ करून गेली . तसल काय व्हायला नग . तसबी आक्की तिला सून करून घ्यायला तयार हाय . तू आता मधी बोलू नग . "
गुजाबा ओरडला .

" आर पर रखमीचा पोरगा अडाणी हाय . त्यात त्याला दारूच येसन . "
म्हातारी आपला मुद्दा लावून धरत होती .

" आमी समद ठरवलं हाय आता तसचं व्हणार . " गुजाबा एवढे बोलून आत निघून गेला .


झामाबाई हतबद्ध होऊन पाहतच राहिली . लहान वयात लग्न झाल्यावर काय काय सोसावे लागते तिला पूर्ण कल्पना होती . आपल्या नातीला ते भोगायला लागू नये असे तिला वाटत होते . ती रागाने बाहेर निघून गेली . आता देवळात जाऊन बसावे म्हणून तिने खालच्या आळीचा रस्ता धरला .


दोन घरे ओलांडली आणि संगीता भांडी घासताना दिसली .

" संगे साळला न्हाय गेली व्हय ग ? " आजीने तिला विचारले .

तितक्यात संगीताच्या आईने हाक मारली आणि ती आत निघून गेली . देवळात जाईपर्यंत तिला सुमनच्या वर्गातील राधा,कुसुम,सविता,सुरेखा अशा आणखी चार पोरी घरीच बसलेल्या दिसल्या .


देवळात पोहोचल्यावर देवीचे दर्शन घेऊन झामाबाई एका कोपऱ्यात जाऊन बसली . तितक्यात तिची मैत्रीण दुरपा आलीच .

" झामे काय झालं त्वांड पाडायला . पुन्यांदा तारी भांडली
व्हय ? "
दुरपा काळजीने म्हणाली .

" तारीच म्या काय मनावर घेत नसते . "
झामाबाई म्हणाली.

" मग आशी कशाला त्वांड पाडून बसली ? बरं न्हाय का तुला ?" दुरपा म्हणाली .

" सुमीच लगीन ठरवलं हाय गुजान ."
झामाबाई उदास आवाजात म्हणाली .


" अग कधीतरी व्हणारच की लगीन . आपल तर धा वर्षाच्या व्हतो तवा झालं ." दुरपा म्हणाली .

" दुरपे तवाची बात निराळी . आन खर सांग किती सोसायला लागलं . सुमी लई हुशार हाय . तिला शिकायचं हाय ."
झामाबाई म्हणाली .

" संगी सकाळीच भांडत व्हती साळत जायचं म्हणून . पर बाळूची शाली पळून गेली . आता ह्या पोरींनी आस काय केलं तर?" दुरपा म्हणाली .

" दुरपे बॉट दुखत म्हणून हात कापत्यात व्हय ? " झामाबाई चिडली .
" झामे समद खरं . पर आपून म्हाताऱ्या काय करणार ? "

दोघी बराच वेळ बोलत बसल्या होत्या . उन्हे कलली तशा त्या घराकडे निघाल्या .


विचाराच्या तंद्रीत झामाबाई घरी चालली होती .

तिला आठवत होत्या गोदी, यमी ज्या लहान वयात बाळंत होताना वारल्या .

शेजारची सखू जळून मेली का मारली ?
ह्यांच्या चुलत भावाने बायकोला भर पावसात घरातून बाहेर काढली आणि तिने वाहती नदी जवळ केली .

तरुणपणात अशा अनेक घटना झामाबाईने पाहिल्या होत्या . ह्या आपल्या मैत्रिणी , जावा,शेजारणी स्वतः च्या पायावर उभ्या असत्या तर वाचल्या असत्या असे तिला नेहमीच वाटत असे .

झामाबाई आजही बाजारात चहाची गाडी लावायची कारण स्वतः चे पैसे हवे . सासू , नवरा यांना विश्वासात घेऊन तिने हे सगळे केले होते .

आपली सून तारी मात्र आळशी . आपल्या आयुष्याचे आता फार दिवस उरले नाहीत पण सुमनला चांगले आयुष्य ह्या लग्नाने मिळणार नाहीच हे तिला पक्के ठाऊक होते . हे सगळे थांबवायचे कसे ? हा एकच विचार आजीच्या मनात घोळत होता .


तितक्यात तिला रडायचा आवाज येऊ लागला . बघते तर गुजाबा सुमनचा हात धरून तिला ओढत नेत होता .

" उद्यापासून साळकड फिरकली तर याद राख ."
तो मोठ्याने ओरडला .

" परवा आक्का येणार हाय . बैठक बसवून सुपारीच फोडू . "
तो आत जाताना बडबडत होता .

झामाबाई उदास मनाने आत गेली . काहीही झाले तरी ह्या सगळ्या पोरी पुन्हा शाळेत गेल्याच पाहिजे हा तिचा निर्धार आता अधिक पक्का झाला होता .


काय करेल आजी ?
सुमन पुन्हा शाळेत जाई का ?
वाचा पुढील भागात .
©® प्रशांत कुंजीर.