Login

तुझा भास

रिद्धी तू माझ्यात आहे.
तुझा भास


रात्रीचा अंधार दाटून आला होता. पावसाच्या सरी हलक्या स्वरात खिडकीवर आपटत होत्या. मंदार आपल्या खोलीत एकटाच बसला होता. टेबलावर अजूनही तिचं आवडतं मग होतं  ज्यात ती रोज कॉफी घेत असे. त्या कपाच्या किनाऱ्यावर अजूनही तिच्या लिपस्टिकचा हलका ठसा होता. त्याने कप हातात घेतला… आणि डोळ्यांपुढे सगळं पुन्हा जिवंत झालं.

"मंदार, तू इतका शांत का असतोस?" ती विचारायची.
"तुझ्यामुळेच ग, माझ्या आयुष्यात शांतता आलीय," तो हसत म्हणायचा.

पण आता ती नव्हती. काही वर्षांपूर्वीच्या त्या अपघाताने त्याचं जगच उलटलं होतं. रिद्धी त्याच्यापासून कायमची दूर गेली होती. पण तरीही ती त्याच्या मनातून कधी गेली नाही.

दररोज रात्री तो तिच्या आठवणींशी बोलत असे. तिचं हसणं, तिचं गोड रागावणं, तिचं “मी येते हं” म्हणून निघून जाणं सगळं त्याला जसं चित्रीत वाटायचं. कधी कधी तो स्वतःलाच विचारायचा, “मी वेडा झालोय का?” स्वतःच हसायचा.

त्या रात्री मात्र काहीतरी वेगळं होतं. खिडकी उघडली, थंड वाऱ्याची झुळूक आली, आणि मंदारला तिचा सुवास आला, ती नेहमी ज्या जास्वंदीच्या अत्तराचा वापर करायची, तोच होता. असे वाटायला लागले.

त्याने पटकन वळून पाहिलं. आणि तो थांबला.

पांढऱ्या ड्रेसमध्ये ती उभी होती. हसत, शांत, जशी ती नेहमी दिसायची.

"रिद्धी…!"
त्याने कुजबुजत म्हटलं.
ती काही बोलली नाही, फक्त हसली. त्या हसण्यात कितीतरी उत्तरं होती.

"तू आलीस?"
"हो… पण जास्त वेळ नाही. फक्त तुला सांगायला आलेय  मी तुझ्याजवळच आहे."

त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. "मी अजूनही तुझ्या शिवाय जगू शकत नाही," तो म्हणाला.
ती जवळ आली. तिचा हात त्याच्या गालावर ठेवला जणू खरा स्पर्श होता. पण पुढच्या क्षणी ती ओघळलेल्या पावसाच्या थेंबात विरून गेली.

मंदार पुन्हा एकटाच झाला. खोलीत शांतता. घड्याळाचे काटे फक्त टिक टिक करत होते.

त्याने डोळे मिटले आणि तिचा आवाज पुन्हा ऐकू आला  "मंदार, मी तुझ्यातच आहे… तुझ्या श्वासांत, तुझ्या आठवणीत, तुझ्या हसण्यात."

तो हलकेच हसला. पहाट झाली होती. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला.
त्याला जाणवलं ती गेली नाही, ती त्याच्यात आहे.

त्या दिवसानंतर मंदारने पुन्हा पेंटिंग सुरू केलं. रिद्धीला रंग आवडायचे, म्हणून तो रंगांमध्ये तिचं अस्तित्व शोधू लागला.
दर पेंटिंगमध्ये ती असायची  कधी गुलाबी आकाशात, कधी पावसाच्या सरींमध्ये, कधी चहाच्या कपातून उडणाऱ्या वाफेत.

त्याला आता एक शांती मिळाली होती.
कधी कधी त्याच्या कानावर अजूनही तिचं हसणं येतं, कधी तिच्या पावलांचा आवाज, पण त्याला भीती वाटत नाही. कारण त्याला माहीत आहे  ती भास नाही, ती त्याची भावना आहे.

रात्री जेव्हा पावसाच्या सरी पुन्हा पडतात, तेव्हा तो खिडकीत बसतो, एक कप कॉफी घेतो आणि म्हणतो,
"आज पुन्हा भेट झाली रे… रिद्धी."

त्या क्षणी वाऱ्याची झुळूक हलकेच स्पर्शून जाते,
आणि त्याला वाटतं
काहीजण जात नाहीत कधीच… ते आपल्या मनात राहतात, तुझ्या भासासारखे.