Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -1

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल


तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं
भाग -1


अनिकेत… आपण लग्न केले आहे, मला खूप भीती वाटतं आहे. मी तर माझ्या घरी पण जाऊ शकत नाही. आई
,  बाबा घरात पण घेणार नाहीत… अनघा म्हणाली.

अनिकेत आणि अनघाने पळून जाऊन लग्न केले होते. आता ते अनिकेतच्या घरी जात होते.

"अनघा, तुला भीती का वाटतं आहे? मी तुझ्यासोबत आहे. तू काही काळजी करू नको. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. नेहमी मी तुझ्यासोबत राहील," अनिकेत म्हणाला.

ते दोघे अनिकेतच्या घरी पोहोचले.

अनिकेतने त्यांच्या आईला हाक मारली.

अनिकेतची आई बाहेर आल्या. अनिकेतच्या गळ्यातला हार, आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली अनघा तिने बघितली.

"तू लग्न करून आला? आम्हाला एका शब्दानं तरी विचारलं नाहीस," ललिता म्हणाल्या.


ललिताने रागाने चेहरा वळवला.
अनिकेत काही बोलणार, तोच ललिता पुन्हा म्हणाल्या,
"तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. तुझ्या बापाला माहिती झाली तर,  ते  खूप  रागावतील,"

अनघा भीतीने अनिकेतचा हात अजून घट्ट धरते.
तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.

अनिकेत शांत पण ठाम स्वरात म्हणाला,
"आई, आम्ही चूक केली असेल… पण लग्न केलं आहे.
आता अनघा माझी जबाबदारी आहे.
तुम्ही नाही मानलं तरी… मी तिला  एकटी सोडणार नाही."

ललिता दोघांकडे रोखून बघत होत्या.
त्या क्षणी घरात एकदम शांतता पसरली.

इतक्यात आतून अनिकेतचे बाबा बाहेर आले.
त्यांनी दोघांकडे पाहिलं…
अनघाच्या डोळ्यातलं पाणी, तिचा थरथरलेला हात, आणि तिच्या चेहऱ्यावरचा भितीचा भाव
सगळं त्यांना दिसलं.

"काय झालं? कोणी काही बोललं का?" बाबा कडक आवाजात म्हणाले.

अनिकेत काही बोलायच्या आधीच अनघा एक पाऊल मागे सरकली.
अनिकेत तिच्यासमोर उभा राहिला.

"बाबा… आम्ही लग्न केलं."  अनिकेत म्हणाला.

बाबांनी कपाळावर हात मारला.
"अगदी न विचारता? आमचं मत, आमची परवानगी… काहीच नाही?"

अनघा थरथरल्या स्वरात म्हणाली,
"काका प्लीज… रागावू नका.
आम्ही काही चुकीचं करायचा हेतू नव्हता…"

ललिता उपरोधाने म्हणाल्या,
"अगं, आम्हाला आमच्या मुलाचं भलं हवं होतं.
पण तुम्ही दोन जणांनी ठरवून टाकलं. आता सांभाळा तुमचा संसार!"

अनिकेत तिच्या समोर उभा राहून म्हणाला,
"आई, बाबा… एवढंच सांगायला आलो होतो
अनघा माझी पत्नी आहे.
तुम्ही नाही मानलं तरी… तिला मी कधीच सोडणार नाही."

ललिता तडक आत वळून गेल्या.
बाबांनी खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाले,

"दोघं थोडा वेळ थांबा.
घरात येऊ नका… मला ललिताशी बोलू दे." बाबा म्हणाले.

अनघाने अनिकेतकडे पाहिलं.
डोळ्यातून पाणी ओघळलं.
"आपल्या इथे नको…   घरात घेणार नाही. "  अनघा म्हणाली.

अनिकेतने तिचा हात पकडला,
"मी आहे ना. काहीही झालं तरी… तुला एकटीला कधीच सोडणार नाही."

दोघे दारात उभे राहिलेले…
घरात शांतता…
आणि त्यांच्या संसाराची खरी सुरुवात तिथून होत होती. पण  त्यांच्या सोबत  कोणीच नव्हते.

खूप वेळ झाला ,  आई बाबा आले नव्हते.

मी माझा सामान आणि कागदपत्र घेऊन येतो, अनिकेत म्हणाला.

अनघा फक्त मान हलवली.

अनिकेत आतमध्ये गेला…
"तू का आला? तुला सांगितलं होतं ना, आत घेऊ नको म्हणून!" अशोक रागात म्हणाले.

"बाबा, मी माझे कागदपत्र घेण्यासाठी आलो होतो. ते घेतल्यावर मी इथून निघून जाईन," अनिकेत म्हणाला.

तो त्यांच्या रूममध्ये गेला. लागणारं सामान घेऊन तो बाहेर आला.
गाडी त्याने घेतली होती. त्यांची चाबी पण घेतली.
तो घराच्या बाहेर निघाला. त्यांच्या आई, बाबांनी त्याला थांबवलं नाही.

त्याने अनघाचा हात धरला. तिला गाडीवर बसवले,
बॅग अनघा जवळ दिली.
ते दोघे तिथून निघाले.

....

विक्रम, अनिकेतला घरातून काढून टाकले आहे, राजूने सांगितले.

अनिकेत मला काहीच बोलला नाही, विक्रम म्हणाला.

त्याने आज लग्न केले आहे. म्हणून त्यांच्या आई, बाबांनी त्याला घरातून काढले, असे समजले आहे. बायका बोलत होत्या. मी ऐकले, तुला सांगायला आलो, राजू म्हणाला.

मी त्याला कॉल करतो, विक्रम म्हणाला.

त्याने मोबाईल घेतला. अनिकेतला कॉल लावला.

अनिकेत गाडीवर होता. त्याने गाडी बाजूला लावली. मोबाईल बघितला. विक्रम नाव बघितले. त्याने कॉल उचलला.

"हॅलो विक्रम," अनिकेत म्हणाला.

"हॅलो! तुझ्याकडे ठेव! आपण जिवलग मित्र आहोत ना? एवढे झाले तरी, तू एक शब्दानं काहीच बोलला नाहीस," विक्रम म्हणाला.

"विक्रम असे काय बोलत आहेस? तुला काय सांगणार होतो? आता अनघाला घेऊन शेजारच्या गावात जात आहे," अनिकेत म्हणाला.

"तू आहेस तिथेच थांब, मी येत आहे," विक्रम म्हणाला.

अनिकेतला विक्रमचे बोलणे ऐकावे लागले. तो तिथेच थांबला. कॉल कट केला.

"अनिकेत, काय झाले? कोणाचा कॉल आला होता?" अनघा म्हणाली.

"विक्रमचा कॉल होता. त्याने इथेच थांबायला सांगितले आहे." अनिकेत म्हणाल्या.

"आता विक्रम तुला खूप बोलणार," अनघा हसत म्हणाली.

"तू हसत काय आहेस? चांगलाच रागावला आहे. आता खूप बोललेलं," अनिकेत म्हणाला.

दोघे पण तिथेच बोलत उभे राहिले.

"राजू, आईला सांग, मी येतोच," विक्रम म्हणाला. बाईक घेऊन अनिकेतकडे जायला निघाला.

पंधरा मिनिटात तो अनिकेत आणि अनघा जवळ पोहोचला

विक्रम बाईकवरून खाली उतरला आणि थेट अनिकेतजवळ गेला.
“तुझ्यासाठी मी कोणीच नाही का? तुला काही बोलता येत नाही का? मला आधी सांगितलं असतं, तर मी काहीतरी केलं असतं ना!” विक्रम रागात पण काळजीने म्हणाला.

“मला वाटलं… आई, बाबा तयार होतील. पण ते तयार नव्हते, आणि मला लग्न करावंच लागलं. तुला तर माहिती होतं, माझं प्रमोशन होणार होतं. त्यानंतरच मी लग्न करणार होतो…” अनिकेत शांतपणे म्हणाला.

“तुझं ते कारण नंतर मला सांग. आधी हे बघ, मी एक घर बुक केलं आहे. छोटंस आहे, पण छान आहे. तिथे तुम्ही दोघं राहा,” विक्रम म्हणाला.

“असं कसं? आम्ही तुझ्या घरात राहू?” अनिकेत संकोचत म्हणाला.

“भाडं दे. मग कसला प्रश्न?” विक्रम म्हणाला.

तेव्हा अनिकेत तयार झाला.

विक्रम त्यांना त्या घरात घेऊन गेला.

अनिकेत आणि अनघा ते घर बघत होते. त्यांना घर खूप आवडलं.

“आता इथे आरामात राहा. काही लागलं तर न लाजता सांग,” विक्रम म्हणाला.

अनिकेतने विक्रमला घट्ट मिठी मारली.
“मला टेन्शन आलं होतं… घर कसं मिळेल? अनघाला कुठे घेऊन फिरवू? काय करू?” अनिकेत म्हणाला.

“माझी आठवण काढली असती तर झालं असतं ना. आता तरी ठीक आहे. मी निघतो, आई वाट बघत असेल,” विक्रम म्हणाला.

विक्रम निघून गेला.

अनघाने बॅग ठेवली. अनिकेत घरभर बघत होता. घर छान होतं. सामानही व्यवस्थित होतं.
“आता जेवण काय बनवायचं? आणि आता सामान कसं आणू?” अनिकेत चिंतेने म्हणाला.

तेवढ्यात दरवाजा वाजला. अनिकेतने दरवाजा उघडला
, जेवण आलेलं होतं. त्याने घेतलं आणि विचार करू लागला, हे कोणी पाठवलं असेल?
नंतर त्याच्या लक्षात आलं की हे काम नक्की विक्रमचं असणार. त्याने दार बंद केलं आणि अनघाला हाक मारली.

अनघाही आली.
“कोणी जेवण आणलं?” तीही आश्चर्याने विचारते.

“हे काम विक्रमचं असेल,” अनिकेत म्हणाला.

तेवढ्यात विक्रमचा मेसेज आला
“नीट जेवण करून घे. काही टेन्शन घेऊ नको.”

अनिकेतने मेसेज वाचला आणि मनातच विक्रमचे आभार मानले.

अनिकेत आणि अनघाने ते जेवण करून घेतले.

अनघाने सगळं आवरून घेतलं.
बेडरूम होती, बेड होता, गादीही होती. त्यांची झोपायची सोय छान झाली होती.

अनघा बेडरूममध्ये आली तेव्हा अनिकेत बेडवर बसून विचारात गुंग झाला होता.

“अनिकेत, काय झालं?” अनघा त्याच्या जवळ येऊन बसली.

“आपलं कसं होईल… हाच विचार करत होतो,” अनिकेत मंद आवाजात म्हणाला.

“नकोss विचार करू. सगळं छान होईल. उद्या तुझा डब्बा नाही बनवता येणार, काहीच सामान नाही,” अनघा म्हणाली.

“उद्या मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन. तुला पैसे देतो. तू सामान घेऊन ये. तुला कपडेही आणावे लागतील ना,” अनिकेत म्हणाला.

“हो,” अनघा मान हलवत म्हणाली.

“आता आपण झोपून घेऊ,” अनिकेत म्हणाला.

दोघेही झोपून गेले.


क्रमश.


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा. 


0

🎭 Series Post

View all