Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 43

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 43



अनिकेत घरी पोहोचला.

घरात शांतता होती. टीव्ही चालू होता, पण कोणी पाहत नव्हतं.

ललिता सोफ्यावर बसल्या होत्या.  पायाला उशी लावून, हातात औषधांची पिशवी होती.

अनिकेतला पाहताच त्या म्हणाल्या,  “इतका उशीर का झाला?”

अनिकेत हळूच म्हणाला,  “विक्रम भेटला होता.”

ललिताने त्याच्याकडे नीट पाहिलं.
त्याचे डोळे थकलेले होते…
चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

“खाल्लंस का काही?”
आईचा आवाज आपोआप मऊ झाला.

“नाही,”
अनिकेत थोडक्यात म्हणाला.

“नेहमीचंच आहे तुझं,”  ललिता कुरकुरल्या.
“स्वतःची काहीच काळजी नाही.”

त्या उठायला लागल्या.

“आई, बस…
मी घेऊन येतो,”  अनिकेत पटकन म्हणाला.

तो पाणी घेऊन आला.  आईच्या हातात दिलं.

“पाय अजून दुखतोय का?”
तो विचारत म्हणाला.

“दुखतोयच,”
ललिता म्हणाल्या,
“पण तू घरी आहेस ना…
तेवढं बरं वाटतं.”

क्षणभर शांतता.

ललिता पुन्हा म्हणाल्या,
“ती… अनघा…
आता कशी आहे?”

अनिकेत थोडा थांबला.  मग म्हणाला,
“बरं वाटतंय तिला.  माहेरी आहे.”

“बरं केलंस,”
ललिता म्हणाल्या.
“तुझ्या आयुष्यात आधीच खूप गोंधळ आहे.   आता शांतता हवी.”

अनिकेत काहीच बोलला नाही.

“अनिकेत…”
ललिताचा आवाज थोडा कडक झाला,
“आई आहे तुझी मी. तुझं भलं मला बघायचं आहे.”

अनिकेत आईकडे पाहत म्हणाला,
“मला पण माझ्या आयुष्याची शांतता हवी आहे, आई.”

ललिता क्षणभर गप्प झाल्या.

“उद्या वेळेत उठ. ऑफिसला जा.
बाकी सगळं आपण बघू,”
त्या म्हणाल्या.

अनिकेत फक्त मान हलवली.

तो आपल्या रूममध्ये गेला.

दार बंद करताना त्याच्या मनात एकच विचार होता

सगळ्यांना सांभाळता सांभाळता…  मी कुठे हरवतोय?


---


अनिकेत हळूच आपल्या रूममध्ये निघून गेला.
दार बंद झालं…  आणि घरात पुन्हा शांतता पसरली.


---


अनघा बेडवर बसली होती.
उशीवर डोके टेकवून, खिडकीतून बाहेर पाहत होती.

आरती चहाचा कप घेऊन आली.
हळूच अनघाजवळ बसल्या.

“चहा थंड होईल,”  आई प्रेमाने म्हणाल्या.

अनघाने कप हातात घेतला.
एक घोट घेतला… आणि अचानक तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

“आई…”
तिचा आवाज थरथरला.

आरतीने लगेच तिचा हात धरला.
“बोल बाळा…
आज नाही बोललीस तर कधी बोलणार?”

अनघा खोल श्वास घेत म्हणाली,
“मी खूप थकले आहे, आई…”

“कामामुळे?”  आरतीने विचारलं.

“कामामुळे नाही…  सगळं एकटीने झेलल्यामुळे,”
अनघा म्हणाली.

तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“मी काहीच म्हणाले नाही. सगळं करत गेले…
कारण मला वाटलं, सून आहे तर करायलाच हवं.”

“पण शरीराचीही एक मर्यादा असते, बाळा,”
आरती म्हणाल्या.

“मला वेळच मिळाला नाही, आई…
दिवसा बसायला नाही,
रात्री झोपायला नाही.
अनिकेत ऑफिसला जायचा…
मी मात्र थांबायचे नाही.”

“अनिकेतला सांगितलंस?”
आईने हळूच विचारलं.

“नाही,”
अनघा मान खाली घालून म्हणाली,
“तो आधीच ताणात होता.
आई आजारी, घरात सगळं…
मी त्याला अजून त्रास नको म्हणून गप्प राहिले.”

आरतीने अनघाला जवळ घेतलं.
तिचं डोकं कुशीत ठेवलं.

“म्हणूनच आज तू इथे आहेस.
इथे तू फक्त माझी मुलगी आहेस.
सून नाही… जबाबदारी नाही,”
आई मायेने म्हणाल्या.

अनघा हुंदका देत म्हणाली,
“आई, मला आई व्हायचं होतं…
पण देवाने माझ्याकडून ते पण हिरावून घेतलं.”

आरतीचे डोळे भरून आले.

“देवाने काही हिरावून घेतलं नाही बाळा.
तो तुला अजून मजबूत बनवतोय,”
त्या ठामपणे म्हणाल्या.

“मी बरी झाल्यावर जॉब जॉईन करणार आहे.
घरी बसून मला अजून कमकुवत व्हायचं नाही,”
अनघा म्हणाली.

“अगदी बरोबर,”
आई हसत म्हणाल्या,
“स्वतःच्या पायावर उभी राहिलीस तरच
तू सगळ्यांसाठी स्ट्रॉंग असशील.”

अनघाने आईकडे पाहिलं.
पहिल्यांदाच मन हलकं झाल्यासारखं वाटलं.

“आई…
इथे राहून मला थोडं जगायला शिकायचं आहे,”
ती म्हणाली.

आरतीने तिच्या कपाळावरून हात फिरवला.

“जगायला नाही बाळा…
पुन्हा स्वतः व्हायला.”

खोलीत शांतता होती…
पण ती शांतता आता वेदनेची नव्हती.

ती आशेची होती.


---


सकाळची कोवळी ऊन गार्डनमध्ये पसरली होती.
फुलांवर दवबिंदू चमकत होते.

आजोबा खुर्चीत बसले होते.
हातात जपमाळ होती…
पण ओठ हलत नव्हते.

नजर समोरच्या झाडांकडे होती,
पण मन मात्र दूर कुठेतरी गेलेलं…

अनघा कशी असेल?
काल रात्री नीट झोप लागली असेल का तिला?

आजोबांनी खोल श्वास घेतला.

अनिकेत तिच्याजवळ असेल का?
तिला आधार देत असेल का?

हातातली माळ थांबली.
आजोबांनी डोळे मिटले.

“देवा…”
मनातच पुटपुटले,
“मुलगी आहे ती.
तिला जास्त दुःख देऊ नकोस.”

गार्डनमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट होता,
सगळं नेहमीसारखं…

पण आजोबांच्या मनात मात्र
घरातल्या नात्यांची काळजी होती.

ते हळूच उठले.
झाडाकडे पाणी घालायला गेले.

जसं या झाडाला पाणी लागते…
तसंच अनघाला आत्ता प्रेम आणि समजून घेणं लागणार आहे,
आजोबा मनात म्हणाले.

त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती,
पण त्याहून जास्त…
आशीर्वाद.


---

आजोबांनी मोबाईल हातात घेतला.
थोडा वेळ स्क्रीनकडे बघत राहिले…
जणू मन धीर धरत होतं.

हळूच त्यांनी अनघाचा नंबर लावला.


अनघाने कॉल घेतला.

“हॅलो आजोबा…”
आवाज ऐकूनच आजोबांचं मन भरून आलं.

“कशी आहेस गं अनघा?”
आजोबा प्रेमाने म्हणाले.

“ठीक आहे आजोबा…”
अनघा म्हणाली,
पण त्या “ठीक आहे” मागे लपलेली थकवा आजोबांना जाणवली.

“खरंच ठीक आहेस ना?”
आजोबा हळूच विचारतात.
“तू खोटं बोललीस तर मला कळतं…”

अनघा थोडा वेळ गप्प राहिली.
नंतर हलक्या आवाजात म्हणाली,
“प्रयत्न करतेय आजोबा…”

आजोबांनी डोळे मिटले.

“बाळा, जे झालं ते कुणाच्याच हातात नव्हतं,”
ते शांतपणे बोलले.
“तू स्वतःला दोष देऊ नकोस.
तू कमकुवत नाहीस.”

“आजोबा…”
अनघाचा आवाज थरथरला.

“मी आहे ना,”
आजोबा म्हणाले.
“आणि अनिकेतही आहे.
तुम्ही दोघं एकमेकांचा हात सोडू नका.
सगळं पुन्हा नीट होईल.”

अनघाच्या डोळ्यांत अश्रू आले…
पण आजोबांच्या शब्दांनी
मनाला थोडं बळ मिळालं.

“तू नीट खा, आराम कर,”
आजोबा म्हणाले.
“आमच्यासाठी नाही…
स्वतःसाठी.”

“हो आजोबा…”
अनघा म्हणाली. “तुमचा फोन आला ना,
मला खूप बरं वाटलं.”

आजोबांनी हलकंसं हसलं.

“मी आहे गं,” ते म्हणाले.
“नेहमी.”

कॉल संपला.

आजोबांनी मोबाईल खाली ठेवला.
मन अजूनही काळजीने भरलेलं होतं…

पण आता त्यात
आशेचा किरणही होता.


---


फोन ठेवल्यावर अनघा काही क्षण तशीच बसून राहिली.
हातातला मोबाईल अजूनही उबदार वाटत होता…
जणू आजोबांच्या शब्दांची ऊब त्यात साठून राहिली होती.

“मी आहे गं…”
तो आवाज अजूनही कानात घुमत होता.

अनघाने डोळे मिटले.

आजोबांना किती कळतं सगळं…
एक शब्द न विचारता, एक आरोप न करता
फक्त समजून घेणं.

मी कमकुवत नाही…
आजोबांचे शब्द मनात परत परत घुमले.

पण लगेचच मनाच्या कोपऱ्यात वेदना उसळल्या.

माझं बाळ…
छाती दडपून आली.

डोळ्यांच्या कडा ओलावल्या,
पण तिने स्वतःला सावरलं.

रडून काय होणार आहे?
आता मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे.

अनिकेत आठवला.

तो कसा असेल?
त्याने जे सहन केलंय…
त्याचं दुखणं कोणी पाहिलं का?

मी त्याच्यापासून दूर राहून  त्याला जास्त दुखावतेय का?
हा विचार मनात टोचून गेला.

पण लगेच दुसरा विचार आला.

नाही… मी आधी बरी व्हायला हवी.
माझं मन, माझं शरीर…  दोन्ही.  अनघा म्हणाली.

आजोबांचा विश्वास तिच्यावर होता.
अनिकेतचं प्रेमही.

अनघाने खोल श्वास घेतला.

मी हार मानणार नाही.  माझ्यासाठी नाही…
तर त्या सगळ्यांसाठी,  जे माझ्यावर प्रेम करतात.

ती हळूच उठली. खिडकीतून बाहेर पाहिलं.

आकाश निरभ्र होतं…   आणि मनात,
पहिल्यांदाच  थोडीशी शांती उतरली होती.


---


क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all