Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 54

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 54


अनिकेत सगळ्यांकडे पाहत म्हणाला,
“आधी नाश्ता करून घ्या. मग आपण विक्रमकडे जाऊ.
लग्न कुठे आणि कसं करायचं, ते सगळं शांतपणे विचारून घेऊ.”

अशोकांनी मान डोलावली.
“बरोबर आहे. उपाशीपोटी निर्णय घेतले,
तर चूक होते.”

मामा थोडे हसले.
“हो… आज तरी मन शांत आहे.”

तृप्ती खाली मान घालून बसली होती.
पण तिच्या ओठांवर हलकीशी हसू उमटलं.
कालच्या भीतीनंतर, आज पहिल्यांदाच
तिला आश्वस्त वाटत होतं.

मोनिका लगेच उठली. “मी चहा घेऊन येते,”
ती म्हणाली.

अनघा स्वयंपाकघरात गेली.
तिने कोणालाही काही सांगितलं नाही,
पण हात चालत होते
आणि मन मात्र आनंदाने भरलेलं होतं.

आजोबा खुर्चीत बसून म्हणाले,
“नाश्ता एकत्र झाला की घरातली हवा बदलते.”

घरात पुन्हा एकदा
सामान्यपणाची चाहूल लागली.
कालचा ताण हळूहळू विरघळत होता.

आज निर्णय होतील… पण ते रागातून नाही, समजुतीतून.

आणि अनिकेत
हे सगळं शांतपणे बघत होता. घर टिकवायचं असतं,
तेव्हा आवाज नाही त संयम लागतो… हे त्याला चांगलं माहीत होतं.


---


डायनिंग टेबलवर सगळे बसले होते.
चहाचा वास, गरम पोह्यांची वाफ आणि टोस्टची कुरकुरीत आवाज घरात पुन्हा एकदा आपलेपणाची जाणीव देत होते.

मोनिकाने ताट वाढताना हसून विचारलं,
“कालच्या गोंधळानंतर, आज हे पोहे जरा जास्तच चविष्ट लागणार वाटतायत.”

तृप्ती हसत म्हणाली,
“काल मला घास पण उतरला नव्हता, आज मात्र भूक लागली आहे.”

मामा चहाचा घोट घेत म्हणाले,
“मन हलकं झालं की पोट आपोआप साथ देतं.”

अनिकेत तृप्तीकडे बघत म्हणाला,
“आज तरी नीट खा. आज पुढे बरंच बोलायचं आहे.”

तृप्ती थोडी लाजली.
“तूच तर कालपासून सगळं सांभाळतोयस.”

अनघा शांतपणे पोहे वाढत होती.
तेवढ्यात मोनिकाने तिच्याकडे पाहून मिश्कीलपणे म्हटलं,
“ अनघा ,
आज पोह्यांत जास्त प्रेम टाकलंय वाटतं!”

सगळे हसले.

अनघा हलकंसं हसत म्हणाली,
“आज वातावरणच तसं आहे.”

आजोबा काठी टेकवत म्हणाले,
“घरात हसू असेल, तर देवही जवळ बसतो.”

क्षणभर सगळे शांत झाले.
त्या शांततेत ताण नव्हता, होती फक्त समजूत आणि आशा.

अनिकेत मनात म्हणाला हेच क्षण जपायचे असतात.


---

अनिकेत अनघाकडे वळून म्हणाला,
“अनघा, आवर… आपल्याला निघायचं आहे.”

अनघा क्षणभर थांबली. तिच्या डोळ्यांत प्रश्न होते, पण आवाज शांत होता. “माझी गरज आहे का तिथे?
आम्ही तिघी घरीच राहतो. तुम्ही सगळं बोलून घ्या.
घरी आल्यावर मला सांग… काय ठरलं ते.” अनघा म्हणाली.

तिच्या बोलण्यात ना राग होता,
ना तक्रार… फक्त समजूत होती.

अनिकेत तिला बघत राहिला.
क्षणभर त्याला काहीतरी बोलावंसं वाटलं, पण तो फक्त एवढंच म्हणाला, “बरं… ठीक आहे.”

तो आजोबांकडे वळला.
“आजोबा, तुम्ही आमच्यासोबत चला.”

आजोबांनी हळूच मान हलवली.
“हो रे, येतो. अशा वेळी मोठ्यांचं असणं गरजेचं असतं.”

मोनिका अनघाच्या जवळ आली.
“काळजी करू नकोस अनघा. सगळं नीटच होईल.”

तृप्तीने अनघाचा हात धरला.
“मी आहे… काही झालं तर आधी तुलाच सांगेन.”

अनघा हलकंसं हसली.
“मला तुमच्यावर विश्वास आहे.”

अनिकेत, अशोक, आजोबा आणि मामा बाहेर पडले.
दार बंद होताच घरात शांतता पसरली.

अनघा खिडकीजवळ उभी राहिली.
गाडी निघून जाताना पाहत ती मनात म्हणाली कधी कधी मागे राहणंही खूप धैर्याचं असतं…


---


गाडी हळूच पुढे सरकत होती. बाहेर सकाळचं ऊन,
आणि आत गाडीत वेगळंच गंभीर वातावरण होते.

क्षणभर सगळे शांत होते.

मामा खिडकीबाहेर पाहत म्हणाले, “काल जे झालं… ते काही योग्य नव्हतं.
ताई इतकी टोकाला जाईल असं वाटलंच नव्हतं.”

अशोक आजोबांनी खोल श्वास घेतला.
“मला पण धक्का बसला.
आपल्या घरात असं होईल असं कधी वाटलं नव्हतं.”

अनिकेत गाडी चालवत शांतपणे म्हणाला,
“बाबा, मामा…
मला एकच कळत नाहीये.
अनघाने नेहमी सगळ्यांना सांभाळलं.
तरी आईला तिच्याशी इतका राग का?”

मामा डोळे मिटून म्हणाले,
“राग नाही रे…
भीती आहे.
आपल्या मुलाला गमावण्याची भीती.”

अशोक आजोबा थोडे गंभीर झाले.
“पण त्या भीतीत तिने घर मोडायचा प्रयत्न केला.
अनघा काही परकी नाही. ती आपल्या घराची सून आहे.”

अनिकेताचा आवाज थोडा भर्रावला.
“मी स्पष्ट सांगतोय बाबा,
माझ्या आयुष्यातून अनघाला काढायचं
कोणालाच जमणार नाही…
कोणीही असो.”

गाडीत पुन्हा शांतता.

मामा हळूच अनिकेतकडे पाहून म्हणाले,
“आजपर्यंत तू कधीच एवढं ठाम बोलला नव्हतास.
आता समजतंय… तू खरंच पती झालास.”

अशोक आजोबांनी अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवला.
“आम्ही तुझ्यासोबत आहोत. आज जे बोलायचं आहे,
ते नीट, शांतपणे बोलू.
कोणावर आरोप नाही… पण सत्य लपवायचं नाही.”

अनिकेत मान हलवतो.
“हो बाबा.
लग्नाची बोलणी असो वा घरातले प्रश्न…
सगळं सन्मानानेच होईल.”

मामा हलकंसं हसले.
“आणि अनघाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेव.
ती शांत आहे म्हणून कमकुवत नाही.
तिचा संयमच तिची ताकद आहे.”

गाडी पुढे निघून गेली.. तीन पिढ्यांचे विचार एकाच दिशेने चालले होते.


---

गाडीचा आवाज दूर झाला…
दार बंद झालं… घरात अचानक शांतता पसरली.

अनघा हळूच सोफ्यावर बसली. क्षणभर ती काहीच बोलली नाही.

मोनिका किचनमधून दोन कप चहा घेऊन आली. एक अनघाच्या हातात दिला.

“घे… गरम आहे,” ती नकळत म्हणाली.

तृप्ती अनघाच्या शेजारी येऊन बसली.
“वहिनी… काल मला खूप भीती वाटत होती. माझ्यामुळे सगळं बिघडलं असं वाटत होतं.”

अनघा लगेच तिच्या हातावर हात ठेवते.
“नाही तृप्ती. तुझं आयुष्य पुढे जातंय…
त्यात कुणी अडथळा होऊ नये.
काल जे झालं, त्यात तुझी काहीच चूक नाही.”

तृप्तीचे डोळे भरून येतात.
“ वहिनी …
तू इतकं सहन कसं करतेस? कोणी एवढं बोललं असतं तर
मी रडले असते.”

अनघा हलकंसं हसते.
“कधी कधी गप्प राहणं हेच उत्तर असतं.”

मोनिका खुर्ची ओढून बसते.
“पण अनघा…
गप्प राहिल्यामुळे लोकांना वाटतं आपण काहीच वाटत नाही.”

अनघा चहाचा घोट घेते.
“वाटतं मोनिका. खूप वाटतं.
पण प्रत्येक वेळी आपलं मन उघडं टाकायचं नसतं.”

तृप्ती हळूच अनघाच्या खांद्यावर डोकं ठेवते.
“माझं लग्न ठरलं…
पण मन अजूनही घाबरतंय.”

अनघा तिच्या केसांवरून हात फिरवते.
“घाबरायचं नाही. तू एकटी नाहीस.
आज मी आहे…
उद्या तुझा संसार असेल.”

मोनिका थोडी हसत म्हणते,
“आणि आम्ही दोघी कायम असणारच.”

क्षणभर तिघीही गप्प…
चहाचा वाफाळता वास,
घरातला ओळखीचा उबदारपणा…

आणि त्या शांततेत
तीन स्त्रियांनी एकमेकींना दिलेल मूक आधार आहे.


---


ललिता घरात एकट्याच होत्या.

घर शांत होतं…
पण त्यांच्या मनात मात्र वादळ सुरू होतं.

तिकडे आता काय चालू असेल? सगळे बसून हसत असतील…
माझ्याशिवाय सगळं किती सहज होतंय…

त्या खिडकीजवळ येऊन उभ्या राहिल्या.

आजही कुणी मला काही विचारलं नाही.
“ताई, तू चल” असं एक शब्दही नाही…

मनात टोचणी लागली.

हेही मला न सांगता अनिकेतकडे निघून गेले.
मी काहीच नाही का या घरात?

त्यांच्या डोळ्यांसमोर कालचे दृश्य तरळलं
अनघा शांत…
सगळे तिच्या बाजूने आणि आपण मात्र एकटी, चुकल्यासारखी वाटत होती.

ललिता खुर्चीत बसल्या. दोन्ही हात डोक्यावर ठेवले.

मी चुकीचं बोलले का? की मला समजून घ्यायचं कुणालाच नाही?

क्षणभर त्यांचं मन थांबलं.

पण लगेच दुसरा विचार आला

अनघा…
तीच सगळ्यांना आपली वाटते.
आणि मी… हळूहळू बाहेर फेकली जातेय.

डोळ्यांत पाणी आलं…
पण ते पुसून त्यांनी चेहरा कठोर केला.

नाही…
मी इतक्या सहज हार मानणारी नाही.

घर शांत होतं…
पण ललिताच्या मनात अस्वस्थतेची आग हळूहळू धगधगत होती.


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all