Login

तुझ्यात जीव गुंतला भाग १३

कथा प्रेम करणाऱ्या जीवाची
तुझ्यात जीव गुंतला भाग १३

"हॅलो मधुरा." तो स्मितहास्य करत म्हणाला.

"हाय,स्वराज." एक नजर टाकत म्हणाली. त्याच्या डोळ्यात बघण्याची हिम्मत होत नव्हती.

"मधुरा, खरं तर मी मूर्खपणा केला असेच वाटतंय."

"कसला मूर्खपणा?" ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती.


"ते मी माझ्या मनातलं तुला सांगितले. फार घाई केली असं वाटतंय."

तिच्या पोटात फुलपाखरू उडत होते. चेहऱ्यावर स्माईल होती.


ती स्माईल पाहून स्वराजने संधीचा फायदा घेतला.


"मला तुझं उत्तर कळलंय. तुला मी आवडत नाही. इट्स ओके, आपण फ्रेंडस म्हणून राहू शकतो."

हे ऐकून मधुरा लगेच म्हणाली,

"तू आवडतो मला स्वराज. खूप आवडतो."

तिचा आवाज वाढला होता.

ती भानावर आली.

काय बोलून गेले.

त्याचे एकटक बघणं तिला अस्वस्थ करत होतं.

तिला आज काय झाले होते माहीत नाही.

शब्द फुटता फुटेना.


उगाच केसावर अलदग हात फिरवत इथे तिथे बघू लागली.

स्वराज मुद्दाम तिच्याकडे नजर रोखून पाहत होता.

तिची अस्वस्थता डोळ्यात टिपत होता.

"मधुरा, थँक यु सो मच." त्याच्या आवाजात कंपन होतं.

________________________________

प्रेमात पडल्यावर जगणं जास्तच सुंदर होतं. तसंच झालं होतं स्वराज आणि मधुराचे.

ग्रुपमध्ये जरी असले तरी स्वराज आणि मधुरा एकत्रच असायचे.

अर्चनाला तिने सांगितले होते, त्यामुळे ती देखील समजून गेली होती. तिने विलासला सांगितले.


केशव, स्वराजच्या डोळ्यात मधूरासाठी प्रेम खटकत होतं; पण आता मधुराच्या डोळ्यात स्वराजसाठी प्रेम पाहून तो दुखावला होता.


केशवला खूप त्रास होऊ लागला.


आता तर कॉलेजला येणं देखील कमी केलं.

विलासच्या लक्षात आले.


त्या दिवशी कॉलेजला आला नाही.

विलास घरी न जाता केशवच्या घरी गेला.

घरी एकटाच होता.
मधुराच्या विचारात हरवला होता.


"केशव." त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

"विलास, तू आता इथे?" त्याने विचारले.

"हो मी इथे. कॉलेजला का आला नाहीस.?"

"बरं वाटत नव्हतं." तो चेहरा पाडत म्हणाला.

"प्लिज केशव मला तरी हे कारण देऊ नको. मी तुला ओळखत नाही का?"

"खरंच बरं वाटत नाहीये."


"आता नेहमीसाठी असंच राहणार आहेस का?" विलास.

"म्हणजे?"

"मी काय बोलतो आहे हे तुला चांगलं माहीत आहे केशव."


तो शांतच बसला.


"केशव, अर्चनाने मला सांगितले की स्वराजने मधुराला प्रपोज केलं. तिनेही होकार दिला."


हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी साचले.


तो पुढे बोलू लागला.

"आता रडून काही फायदा आहे का? जेव्हा बोलायचे तेव्हा बोलला नाहीस."

केशवचं मन भरून आलं होतं.

विलासला त्याचा चेहरा बघवत नव्हता.

त्याला दया आली.

"प्लिज केशव आता शांत हो."

"कसं शांत होऊ विलास? तुला माहितीये ना ती मला किती आवडायची. खूप प्रेम केलं मी. तू बोलतोय जेव्हा बोलायचे तेव्हा बोलला नाहीस, आयुष्यात काही तरी बनायचे होते. स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. मला वाटलं नव्हतं असं काही होईल. माझं डोकं चालत नाहीये."

तो डोक्याला हात लावून बसला.


केशवसाठी त्याला फार वाईट वाटत होतं.


"केशव, आता जे झालं त्यात बदल करू शकत नाही. जे आहे त्याचा स्वीकार कर. तेच तुझ्यासाठी योग्य आहे."


"तेच स्वीकारता येत नाही. मला अस्वस्थ व्हायला होतंय. कशातच मन लागत नाही."


"समजू शकतो; पण तू मला सांग सतत कॉलेज आणि क्लासला दांडी मारली तर नुकसान तुझंच आहे. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. फायनल आहे. प्लिज तू असं करू नको.
मधुराच्या विचारात स्वतःला हरवून बसू नको. कधी कधी इमोशन बाजूला ठेवून प्रॅक्टिकल विचार करावा लागतो. मला माहितीये तू कसा आहेस, तुझ्यासाठी हे सगळं कठीण आहे; पण तरीही तुला हे करावं लागणार. सांभाळ स्वतःला."


असं बोलून तो निघून गेला.


विलासच्या बोलण्यात तथ्य होतं.
इमोशन बाजूला ठेवून प्रॅक्टिकली जगावं लागतं. नाही का?

केशवने प्रेम व्यक्त केलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं.
क्रमशः
अश्विनी ओगले.