Login

तुझ्याविना जगणार? भाग २

तुज्याविना जगणार ? हा प्रश्न तिला खूप सारी उत्तर देऊन गेला
"नेहा, माझा रुमाल कुठे आहे?" तो शूज घालत म्हणाला.

बेडरूममधून लगबगीने बाहेर आली आणि त्याच्या हातात रुमाल दिला.

"डबा पॅक केलास का?" कारची चावी घेत म्हणाला.

"हो करते."

"अगं काय हे त्याला सगळं वेळेवर लागतं माहीत आहे ना?" सासूबाई देवाची पूजा करत म्हणाल्या.

ती कपाळावर आलेला घाम पुसत पुन्हा किचनमध्ये गेली.

पटकन टिफिन पॅक केला आणि त्याच्या हातात दिला.

"नेहा, तुला माहित आहे ना ऑफिसमध्ये  मला वेळेत पोहोचावं लागतं. किती उशीर?" जरा त्रासिक चेहऱ्याने म्हणाला.

ती शांतपणे ऐकून घेत होती.

तो गेला, ती तशीच दारात उभी होती कमीत कमी येतो हे तरी बोलू शकत होता.

नव्याचे नऊ दिवस संपले होते.

आता फक्त  खांद्यावर जबाबदारी आली होती. श्वास घ्यायला देखील फुरसत नव्हती.

घोटभर चहा घ्यावा असा विचार करत असताना नणंद आली
"वहिनी, माझा नाष्टा तयार आहे ना?"


स्वराजचाच टिफिन,नाष्टा बनवायला वेळ गेला होता. सर्वांचा नाष्टा वेगळा.


"दोन मिनिटांत बनवते."


"असू दे, मी ऑफिसमध्येच खाईन." ती निघून गेली.


"नेहा, किती हा हलगर्जीपणा? माझी लेक उपाशी गेली. थोडं लवकर उठायला काय होतंय? स्वराजलाही उशीर झाला. सहा महिने झाले आहेत लग्नाला, आतापर्यंत तुला सगळं जमायला हवं." सासुबाई बोलल्या.


"मी प्रयत्न करतेय आई."


तिचं काही ऐकुन न घेताच त्या म्हणाल्या,

"माझा बिनसाखरेच चहा तयार आहे का? का तो देखील मलाच बनवावा लागणार?" खोचकपणे बोलल्या.

"आणते."

तिने सासूबाईंना चहा दिला आणि रुममध्ये गेली.

फार अस्वस्थ वाटत होतं. यंत्रवत काम करण्याचा तिलाही कंटाळा आला होता.

किती जरी केलं तरी कमीच पडत होतं.

घरच्या कामाला बाई लावावी तर सासूबाईना पटत नव्हते आणि नोकरी करावी म्हंटलं तर स्वराज बोलायचा तुला काय कमी पडतय.

नेहमी हसरी राहणारी नेहा उदास राहू लागली.

चार भिंतीत तिचा आत्मविश्वास कमजोर होऊ लागला.
सतत कसलं तरी दडपण येत होतं.

स्वराजला कळलं होतं काहीही बोललं तरी ती शांतपणे ऐकून घेते होती.
दिवसेंदिवस त्याच्या वागण्यात कमालीचा बदल होत गेला.


सहा महिन्याने सासूबाई आजारपणात गेल्या. नंणदेचं लग्न झालं.

नेहाला असं वाटायचं की आता तरी तो तिला वेळ देईल,प्रेमाने बोलेल; पण तसं व्हायचं नाही. रात्रीची गरज भागवण्यापुरतं तिला जवळ करायचा आणि पुन्हा स्वतःच्या विश्वात गुंग.


ह्या सर्व गोष्टींचा त्रास होऊ लागला होता, त्यात तिचं शांत बसणं परिस्थिती अजून चिघळत चालली होती.

आपल्या बाबतीत काहीतरी चुकतंय. तिला सतत हेच वाटायचे.

ती खुश नव्हती.

तिने आईला संगीतले तर आई म्हणाली,
"नवीन नाविन नातं आहे मुरायला वेळ लागणार. तू समजून घे."


एक दिवस तिला आई होण्याची चाहूल लागली.

तिला वाटलं आता बाळ झालं की नातं नव्याने खुलेल; पण तसं झालं नाही उलट स्वराज अजून दूर होत गेला.

तिच्या गरोदरपणात त्याच्याकडून अपेक्षा होत्या.
तो साफ दुर्लक्ष करायचा.

'आई, हे नातं कधीच मुरणार नाही. दुरावा वाढत चालला आहे गं.'


प्रत्येक मुलीसाठी आई होणं सुवर्णकाळ  असतो; पण नेहासाठी तसं काहीच नव्हतं. 

मानसिकरित्या ती खचत चालली होती.


आता स्वराजसाठी असलेली ओढही कमी होत चालली.

तिने विचार केला होणाऱ्या बाळासाठी जगायचं.

नऊ महिने सरले आणि तिने बाळाला जन्म दिला.
मुलगा झाला होता.

अथर्व नाव ठेवलं होतं.

नेहाला अजूनही अपेक्षा होती की, अथर्व त्याचा मुलगा आहे तर लळा लावेल; पण तसं काहीच होत नव्हतं.

सर्वच अपेक्षावर पाणी फेरले.

अथर्व मोठा होऊ लागला. त्यालाही कळत होतं की फक्त आई जीव लावतेय, त्याची ओढ आईकडे होती.


ती एकटी बसली की, तिला रडु यायचं.

'माझ्या बाबतीत असं का? मी काय केलं? मी तर सगळं स्वराजच्या मनाप्रमाणे करते मग का असं वागतोय? सर्व आयुष्य असंच घालवायचे का? स्वराज कधी समजून घेणार?

हे काही कमी होतं की अजून एक धक्का तिच्या वाट्याला आला.

त्याने  तर ती कोसळून गेली.

त्याचं अफेयर कळलं. त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मीनाक्षीसोबत.

अजून काय वाईट घडायचे होते?

ती पार  तुटून गेली. तिच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली होती.

आई बाबांना कळलं तर ? त्यांनाही त्रास होईल.


संसार वाचवण्याचा जीवापाड प्रयत्न करत होती.
चांगल्या लोकांच्या वाट्यालाच का अशी विकृत लोकं येतात बरं?
पुढचा आणि शेवटचा भाग चुकवू नका.


क्रमशः
अश्विनी ओगले.

साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे. You tube किंवा इतर ठिकाणी कथेचा वापर केला तर कारवाई करण्यात येईल..