मीरा पुण्याला काहीही न सांगता गेल्याचे समजताच मयूरला खूप वाईट वाटले. ही अशी कशी? एकदा तरी मला सांगायचं ना! काही महत्त्वाचे काम असेल तर तसे सांगायचे! काहीही न सांगता कायमची पुण्याला गेली याचा अर्थ काय? म्हणजे तिचे माझ्यावर नक्की प्रेम होते की नव्हते? आता ती परत माझ्या आयुष्यात येईल की नाही? तिचा फोनही लागत नाही, शिवाय इतर कोणालाही तिचा दुसरा नंबर देखील माहित नाही. आता अशा परिस्थितीत मी काय करू? अशा विचारांच्या गर्तेत तो त्याच्या घरी पोहोचला.
घरी आल्यानंतर मयूरने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले आणि तो मनसोक्त रडू लागला. कारण मीराला इतका जीव लावला, तिच्यावर मनसोक्त प्रेम गेले आणि ती एका क्षणात काहीही न सांगता सोडून गेली, याचा अर्थ काय? तिचे माझ्यावर प्रेमच नव्हते, असा विचार करून त्याला खूप वाईट वाटत होते. त्याचा असा प्रेमभंग झाला होता, पण त्याला हे कोणालाच दाखवायचे नव्हते म्हणून तो खोलीत जाऊन मनसोक्त रडला आणि नंतर बाहेर आला.
काही दिवस तो खूप उदास होता, आता तर त्याचे कशातच मन रमत नव्हते, त्याच्या आईने विचारले तर तो काही नाही म्हणून तिथून निघून जायचा. आता सुट्ट्या संपत आल्या होत्या, कॉलेज सुरू होणार होते पण मयूरला कॉलेजला जावेसे वाटत नव्हते. तो तसाच घरात बसून राहायचा. बी. काॅमला त्याने अॅडमिशन देखील घेतले नव्हते. तो बारावी मध्ये चांगल्या गुणांनी पास झाला होता पण मीराच्या आठवणीमुळे त्याने पुढे ॲडमिशन घेतले नाही.
आई आणि बहिणीने खूप काही समजावून सांगितले तरीही तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. आता सर्वांना त्याची काळजी वाटू लागली. तो फक्त शेतामध्ये राहू लागला. सगळी कामे स्वतः एकटा करू लागला. त्याने स्वतःला कामांमध्ये झोकून घेतले होते. तो जरी दाखवत नसला तरी त्याचे दुःख चेहऱ्यावर दिसत होते.
शेवटी मित्रांच्या सांगण्यावरून त्यांने शेवटच्या दिवशी अॅडमिशन घेतले, पण तो एकही दिवस कॉलेजला गेला नाही, कारण कॉलेजला गेला तर त्याला मीराची आठवण येत होती. मीराच्या विरहात एकेक दिवस जात होते. सहा महिने झाले तरी त्याच्या मनातून मीरा काही गेली नव्हती. रोज तिच्या आठवणी याला सतावत होत्या. "असे काय झाले की ती माझ्या आयुष्यातून निघून गेली, मी असे काही बोललो का ज्याच्यामुळे तिचे मन दुखावले गेले असेल? निदान जाताना तरीही एका गोष्टीने सांगून गेली असती तर मला इतका त्रास झाला नसता, जर जायचे होते तर ती माझ्या आयुष्यात का आली? तिला माझ्या मनाची तडफड समजत नसेल का? तिला माझी ओढ लागत नसेल का? माझी उणीव भासत नसेल का? अर्ध्यावर सोडून जायचे असेल तर आयुष्यात यायचेच नाही ना! दोन वर्षांचा आमचा सहवास पण माझं आयुष्य मीरामय होऊन गेले आहे. मी आयुष्यात तिला कधीच विसरणार नाही. एक जीवनसाथीच्या रूपाने मी तिच्याकडे पाहत होतो, मनातील भाव बोलून दाखवणार होतो पण ते बोलून दाखवण्याआधीच ती माझ्या आयुष्यातून का गेली असावी?" असा भावनावश होऊन मयूर रात्रंदिवस विचार करत होता.
त्याचे अभ्यासात मन रमत नव्हते. काही केल्या अभ्यास त्याच्या डोक्यात शिरत नव्हता. मन उदास करून तो बसत होता. बघता बघता सहामाही परिक्षा संपली. मयूरचे अभ्यासात लक्ष नसल्यामुळे त्याला या परिक्षेत केटी मिळाली. त्यानंतरही स्नेहसंमेलन किंवा सहल यामध्ये देखील त्याने सहभाग घेतला नाही. मुळात तो काॅलेजलाच गेला नाही, तर भाग घ्यायचे लांबच राहिले. तो एकटा एकटा राहू लागला. त्याच्या आयुष्यातील आनंद, हसू गायबच झाले होते.
एक दिवस नेहमीप्रमाणे मयूर सकाळचे आवरून शेतात जाण्यासाठी निघाला. तेव्हा एका अननोन नंबरवरून त्याला फोन आला. गाडीवर असल्यामुळे तसेच अननोन नंबर असल्यामुळे त्याने फोन कट केला. दोन तीन वेळा फोन आल्यावर शेवटी शेतात पोहोचल्यावर त्याने फोन उचलला.
"हॅलो." मयूर
"हॅलो." पलिकडून आवाज आला तसा मयूर जागेवर स्तब्ध झाला. आवाज ओळखीचा होता, अगदी त्याच्या जवळचा, त्याच्या हृदयातला. हो हो तो फोन मीराचाच होता. इतक्या दिवसांनी तिच्याशी बोलताना मयूर कावराबावरा झाला होता. किती आणि काय बोलू असे त्याला झाले होते. मीरा मात्र शांत डोळ्यातून अश्रू गाळत होती.
"मयु, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. ऐक ना! माझ्याकडे तितका वेळ नाही. मला तू चुकीचे समजू नकोस. मला असे करावे लागते." मीरा बोलत होती पण मयूर आज काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हताच. खूप दिवसांनी त्याच्या मीराचा फोन आला होता म्हणून तो त्याच धुंदीत होता.
"मीरा, मलासुद्धा तुला खूप काही सांगायचे आहे. ऐक ना! तुझ्याशी खूप बोलायचे आहे. तुला माहित आहे का? तू गेल्यापासून तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. खरंतर तुझ्या आठवणीत मी फक्त देवदासच होण्याचा बाकी होतो." असे म्हणून मयूर जोरात हसू लागला. आज त्याला खूप आनंद झाला होता. त्याला वाटत होते की त्याची मीरा आता परत त्याच्या आयुष्यात आली आहे. तो वेड्यासारखा तिच्यासोबत बोलत होता. ती मात्र अगदी शांतपणे आसवे गाळत त्याचे ते बोलणे ऐकत होती. बराच वेळ बोलून झाल्यावर मयूर शांत झाला.
"तू काहीतरी बोल ना! मघासपासून मी एकटाच बोलतोय. तू काहीच बोलत नाहीस. आणि हो इतक्या दिवसांनी माझी आठवण झाली का?" मयूर
"तुझी आठवण तर रोजच येते रे, पण मी काही करू शकत नाही. त्या दिवशी अचानक पुण्याला आलो." मीराला काय बोलावे समजेना. तिच्या तोंडावाटे एक अक्षरही येईना. फक्त डोळ्यातून अश्रू येत होते.
"बोल ना! काय झालं? तू अशी शांत का आहेस? काही प्राॅब्लेम आहे का? जे काही असेल ते स्पष्ट बोल." मयूर आता थोडा सिरियस झाला.
"मयु, तू मला चुकीचं समजू नकोस. हे बघ, तुझे आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जग." मीरा
"त्याची काळजी तू करू नकोस. जे काही बोलायचं आहे ते सांग." मयूर थोडा नाराज होऊन म्हणाला.
"मयु, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, आहे आणि कदाचित आयुष्यभर राहिल." मीराचे हे वाक्य ऐकून मयूरचा आनंद गगनात मावेना. तो आनंदाने उड्या मारू लागला. खरंच आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज आला होता. आता मीरा माझी होणार या धुंदीत तो शेतभर फिरत होता. त्या आनंदाच्या भरात त्याच्या पायाला काटा टोचला होता त्याचीही त्याला जाणीव झाली नाही. त्याच्या चेहऱ्यावरून हर्षवायू ओसंडून वाहत होता.
"मयु, माझे बोलणे पूर्ण ऐकून घे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी तुझी होऊ शकणार नाही. प्लीज मला विसरून जा." मीराच्या तोंडून हे वाक्य ऐकून मयूरच्या पायात जोरात कळ आली. काटा बोचलेला पाय आता दुखत होता आणि त्यातून तीव्र वेदना जाणवत होत्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा