Login

वादळवाट 14

Meera Mayur chi premkahani Marathi katha

मयु, मला विसरून जा. हे एकच वाक्य त्याच्या कानात घुमत होते. खरंच मनापासून प्रेम केलेल्या व्यक्तीला इतक्या सहजपणे विसरता येईल का? मला विसरून जा, हे म्हणणे सोपे पण ते आत्मसात करणे इतके सोपे असते का? तिला इतकं म्हणायला जमलं पण ती तर मला विसरेल का? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या गर्तेत तो होता.

"हॅलो मयु, आहेस ना?" पलिकडून मीराचा आवाज ऐकून मयूर भानावर आला.

"हं" इतकाच त्याच्या तोंडून आवाज आला.

"ऐक ना, त्या दिवशी शेवटचा पेपर झाला. आपण सर्वांनी मिळून पार्टी केली. आपण खूप गप्पा मारल्या आणि मी घरी गेले. थोडे दिवस ठिक होते. मी तुला मेसेज पण करत होते. पण एक दिवस मी नेहमीप्रमाणे आवरायला आत गेले आणि माझा फोन बाहेरच होता, तेव्हा माझ्या भावाने माझा फोन चेक केला. त्यामध्ये तुझे मेसेजेस आणि तुझे कॉल्स त्याने चेक केले. त्याने या सगळ्या गोष्टी आईबाबांना सांगितल्या तसेच माझ्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांना आपलं हे नातं कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे त्याच दिवशी त्यांनी माझ्याकडून फोन काढून घेतला आणि आम्ही सगळे पुण्याला शिफ्ट झालो. तिथे माझा भाऊ आधीपासूनच जॉब करत होता. आता आम्ही सगळे तिकडेच राहणार कायमचे. आपल्या नात्याला माझ्या घरच्यांकडून कधीच परवानगी मिळणार नव्हती आणि असे पळून जाऊन लग्न करणे माझ्या मनाला न पटणारे होते, म्हणून मी देखील शांत राहिले. आता फक्त हे सगळे तुला सांगावे म्हणून मी फोन केला आहे. आता तुझ्याशी बोलणे झाल्यावर हा नंबर देखील माझा बंद होईल, तेव्हा तू मला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत, आपला प्रवास इथंपर्यंतच होता, आपली साथ फक्त इथपर्यंतच होती, तू तुझ्या आयुष्यात सुखी रहा, मी माझ्या आयुष्यात सुखी राहीन. जे काही घडले ते एक स्वप्न होते असे समज आणि मला विसरून जा." इतके बोलून जड अंतःकरणाने तिने लगेच फोन ठेवला.

"हॅलो हॅलो." करून मयूर बोलू लागला पण फोन तिचा आवाज आला नाही तसा मयूरने तिला त्याच नंबरवर लगेच फोन केला, पण आता तिचा फोन बंद होता. मयूरला खूप अस्वस्थ वाटू लागले. आता तो खूप जोरात हुंदके देऊन रडू लागला. तसेही तो शेतात असल्यामुळे आजूबाजूला कुणीच नव्हते. त्यामुळे मयूर मनसोक्त रडला. रडून रडून त्याचे डोळे लालबुंद झाले होते. तो बराच वेळ एका झाडाखाली बसून राहिला.

आता संध्याकाळ होऊ लागली. पक्षी घरच्या ओढीने घरट्याकडे जाऊ लागले. चोचीत दाणे टिपून पिल्लांच्या ओढीने जाऊ लागले. मयूरला आता घरची आठवण झाली. तो झोपेतून जागा झाल्याप्रमाणे जागेवरून उठला आणि घरी जाऊ लागला. तडफडत, पडतकुडत तो गाडीवरून घरी गेला ते थेट रूममध्ये जाऊन बसला. मयूर हल्ली व्यवस्थित राहत नाही, कामातही त्याच लक्ष नसतं, ना खाण्यापिण्याकडे लक्ष असतं. तो स्वतःच्या तंद्रीत राहतो. त्याच काही बिनसले असेल का? कोणाशी वाद झाला असेल का? काही झाले असेल का? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या आईच्या मनात बरेच दिवस घोळत होते. पण आज मयूर काहीसा वेगळा दिसत होता. आज तो खूप दुःखी दिसत होता. त्याची अशी झालेली स्थिती पाहून त्याच्या आईला खूप वाईट वाटले. ती जाणून घेण्यासाठी त्याच्या खोलीत गेली.

"मयूर, बाळा काय झालं? इतका त्रास का करून घेतोस?" त्याची आई त्याच्याजवळ जाऊन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणाली.

"काही नाही आई." इतके बोलून मयूरने डोळे पुसून उसने हसू आणत तो म्हणाला.

"मी तुझी आई आहे. माझं बाळ खूप दुःखी आहे इतकं तरी मला कळतच. पण काय झालंय हे तू सांगितल्याशिवाय कसे कळणार?" आई त्याला बोलत करण्यासाठी गोड शब्दात बोलू लागली.

"आई, अगं कसं सांगू तुला?" मयूर

"तुझी आई म्हणून नको तर एक मैत्रीण म्हणून सांग. मी माझ्यापरीने तुला नक्की मदत करेन." मयूरची आई

"तू काय कोणीच मदत करू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे." इतके बोलून मयूर शांत बसला.

"अरे, पण झालंय काय?" मयूरची आई

"आई, अगं मीरा मला खूप आवडते आणि मी सुद्धा तिला खूप आवडतो." मयूर

"हो. मलासुध्दा ती खूप आवडली होती. इतकंच काय? मी तुला सांगणारही होते की आपण तिच्या घरी जाऊयात काय? पण अजून तुमचं शिक्षण पूर्ण झाले नाही, शिवाय वय सुध्दा लहान आहे म्हणून मी शांत होते." मयूरची आई

"अगं आई, ऐक ना, तू समजतेस तसे काहीच होणार नाही. आता मीरा माझ्यापासून दूर गेली आहे, कधीच परत न येण्यासाठी." मयूर

"अरे, पण का? काय झालं? तू काही तिला बोललास का?" मयूरची आई

"नाही ग आई, मी काहीच नाही बोललो. तिचेही माझ्यावर प्रेम आहे, पण तिच्या घरच्यांना ते कधीच मान्य नाही आणि पळून जाऊन लग्न करणे तिला पटत नाही." मयूरने आईला सविस्तर सगळे सांगितले. ते ऐकून मयूरची आई शांत झाली.

"हं. जाऊ दे सोड. तू अभ्यासात आणि कामात लक्ष दे. बाकी सगळं परमेश्वरावर सोडून दे." आईचे बोलणे ऐकून मयूर थोडा शांत झाला.

"आई, पण तिने असे का केले ग? मला तिचा खूप राग येतोय." मयूर

"अरे बाळा, अशावेळी परिस्थिती कारणीभूत असते. तिची सुध्दा कमजोरी आहे. तू लक्ष देऊ नकोस. तुझ्या नशिबात ती नाही. तू तो विचार सोडून दे आणि तुझ्या कामात लक्ष दे." आईचे हे बोलणे मयूरला पटले. कदाचित आमचा प्रवास इतकाच असेल, आम्ही आयुष्यभराचे जीवनसाथी होणे या जन्मी तरी अशक्य आहे. तेव्हा तिला विसरणेच बरे होईल. पण मनातल्या व्यक्तीला विसरणे शक्य होईल का? आपले हृदयच जर नसेल तर श्वास घ्यायचा कसा? मला तर सगळे कठीण वाटत आहे. आता कसे होणार? अशा विचारात मयूर होता. त्याला पुढे काय करावे? हे सुचेना. मीराच्या आठवणींतून बाहेर कसे पडावे? हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. पण काही केल्या तो त्यातून बाहेर येत नव्हता.

आता पुढे मयूर काय करेल? यातून बाहेर पडून नव्या उमेदीने पुढे जाईल का? त्याच्या आयुष्यात मीरा भेटेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः 

🎭 Series Post

View all