आता सप्तपदीला सुरूवात होणार होती. मयूरच्या उपरण्याला प्रणालीच्या साडीची गाठ बांधली आणि होम करून त्याभोवती सात फेरे घेण्यासाठी दोघेही सज्ज झाले. फेरे घेत असताना एका फेरीत मयूर थोडा वेळ थांबला, कारण ती फेरी एक पत्नीत्व अशी होती. अर्थातच पत्नी सोडून इतर स्त्रीचा विचारसुद्धा मनात घेणार नाही. या वचनावर मयूर विचार करू लागला. \"खरंच मी मीराला विसरून प्रणालीमध्ये एकरूप होईन का? मीरा कायमची आयुष्यातून, मनातून निघून जाईल का? जर जाणार नसेल तर हे वचन घेऊन काय फायदा?\" असा विचार मयूरच्या मनात चालू होता. तशातच त्याने ती फेरी कधी पूर्ण केली हे त्याचे त्याला कळलेच नाही. सप्तपदी पूर्ण झाल्यावर पुढची विधी आटोपून लग्न निर्विघ्नपणे पार पडले. प्रणालीने मयूरची पत्नी म्हणून घरात प्रवेश केला. घरभर नातेवाईकांची गर्दी होती. सगळे काही आनंदाने चालू होते.
लग्न झाल्यावर चार पाच दिवस पाहुणे होतेच. पाहुणे गेल्यावर घरी मयूरची आई आणि प्रणाली दोघीच होत्या. मयूर दिवसभर शेतातील कामात व्यस्त होता, तर त्याची बहिण मनिषा काॅलेजला जात होती. घरामध्ये प्रणाली आणि मयूरची आई दोघीच असल्यामुळे दोघींचे छान सूत जुळले होते. त्या दोघी एकमेकींच्या छान मैत्रीणी झाल्या होत्या. मयूरच्या आईच्या डोक्यावरील भार हलका झाला होता. आता लेकीचे लग्न झाले की मोकळी होणार असे तिला वाटू लागले होते.
थोडे दिवस गेल्यावर मयूर आणि प्रणाली यांच्या संसारवेलीवर छान कळी खुलू लागली. प्रणालीला दिवस गेले होते. खरंच ही बातमी मयूरच्या आयुष्यातील खूप सुखद होती. या बातमीने त्याचा सगळा शीण निघून गेला. त्याच्या मनाची मरगळ दूर झाली होती. बाप होणार म्हणून त्याला काय करू नि काय नको असे झाले होते. शेतीच्या कामातून आलेला शीणवटा तर कधीच निघून गेला होता. आता तो प्रणालीची खूप काळजी घेत होता. तिचे बाळंतपण इथेच व्हावे असे त्याला वाटत होते. तिच्या खाण्यापिण्याकडे तो आणि त्याची आई दोघेही लक्ष देत होते. त्यांना जणू आकाश ठेंगणे झाले होते. सगळेच जण प्रणालीचे गोडकौतुक करत तिचे डोहाळे पुरवत होते, त्यामुळे प्रणाली सुध्दा खूप आनंदात होती.
या नऊ महिन्याच्या काळात मयूरला एकही दिवस मीराची आठवण आली नाही. मयूर आता हळूहळू मीराला विसरत होता. तो आता संसारात रमत होता. एक दिवस अचानक रात्री प्रणालीला कळा सुरू झाल्या. मयूर खूप घाबरला. त्याने घाबरून लगेच त्याच्या आईला उठवले. त्याच्या आईने सारे काही जाणून घेऊन प्रणालीला दवाखान्यात घेऊन जायला सांगितले आणि लगेच प्रणालीच्या आईला फोन करून कळवले. सगळेजण दवाखान्यात जमले. प्रणालीला आयसीयुमध्ये दाखल केले. मयूर बाहेर खूप काळजीत होता. टेन्शनमध्ये तो येरझाऱ्या मारू लागला. त्याला काहीच सुचत नव्हते. थोड्या वेळाने डाॅक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितले की, "अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे." हे वाक्य डाॅक्टरांच्या तोंडून ऐकताच मयूरला प्रचंड आनंद झाला. आनंदाच्या भरात त्याला काय करू नि काय नको असे झाले होते. त्या दोघांच्याही घरचे खूप आनंदी झाले होते. पुत्ररत्न झाले म्हणून ते देवाचे आभार मानू लागले. प्रणाली जेव्हा शुध्दीवर आली तेव्हा तिच्या डोळ्यासमोर मयूर होता आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. ते पाहून प्रणाली सुखावली.
आता मयूरच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली होती. तो पूर्णपणे मीराला विसरला होता. तो आता अधिक जोमाने शेती करू लागला. आधुनिक पद्धतीने शेती करत होता. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेत होता. तो आता जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मुलासाठी सगळे काही करत होता. त्याचे हट्ट तो पुरवत होता.
मयूरची खूप प्रगती होऊ लागली. आता तो बहिणीचे लग्न करण्यासाठी प्रयत्न करत होता. तिला योग्य स्थळ येण्याची वाट पाहत होता. एक दिवस मनिषाला चांगले स्थळ आले. तसे ओळखीतीलच होते, पण मुलगा मुंबईत नोकरीला होता. स्थळ सर्व बाजूने चांगले असल्याने पुढे बोलणी चालू झाली. अगदी घाईगडबडीत मनिषाचे लग्न पार पडले. मयूरच्या खांद्यावरील आणखी एक जबाबदारी हलकी झाली.
मयूरच्या मुलाचे नाव शौर्य ठेवले. शौर्य हळूहळू मोठा होऊ लागला. काही वर्षांनी त्यांच्या संसारवेलीला स्वरा नावाची एक गोड मुलगी जन्माला आली. तिच्या जन्मानंतर मयूरच्या शेतात खूप जास्त उत्पन्न आले, तेव्हापासून मयूर तिला घरची लक्ष्मी मानत होता. ते दोघे पती पत्नी, दोन मुले, आई असा सुखी परिवार होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होते.
मयूरच्या आयुष्यातील सुख हे फार काळ टिकणारे नव्हते. त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक अशी अनेक वादळं येत होती. प्रत्येकवेळी तो वादळं पेलायचा आणि त्यातून मार्ग काढून पुढे जायचा. यावेळी त्याच्या आयुष्यात एका वेगळ्याच वादळाने प्रवेश केला होता. आधीचं वेगवेगळ्या वादळांना तोंड देताना मयूर खूप खचला होता. आता कुठे त्याच्या आयुष्यात सुख डोकावत होते, तो आता आनंदात राहत होता, आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, परिवाराला महत्व देत होता, त्यांच्या सुखासाठी झटत होता, त्यांना कशाचीही कमी पडू नये यासाठी प्रयत्न करत होता. पण अचानक उद्भवलेल्या या वादळाने तो हतबल झाला होता. त्याच्या आयुष्यात इतकी वादळं आली तरी तो डगमगला नव्हता, पण आता मात्र त्याला काहीच सुचत नव्हते. तो आता बिथरला होता.
मयूरच्या आयुष्यात कोणती वादळं आली असतील? त्यातून काहीतरी मार्ग निघेल का? त्याच्यावर आलेल्या संकटाने तो कोलमडून पडेल की नवी उभारी घेईल?
मयूर या संकटाने खचून जाईल का? त्याला कोण साथ देईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा