Login

वादळवाट 19

marathi katha


मयूर त्याच्या कुटुंबासह गुण्यागोविंदाने राहत होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य होती. मुलीचा जन्म झाल्यावर तो आणखीनच आनंदी झाला. त्याला आकाश ठेंगणे झाले होते. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. पुढे एक मोठे संकट त्याच्या आयुष्यात डोकावू पाहत होते. स्वराच्या जन्मानंतर प्रणालीला अचानक एका आजाराने पछाडले. तिला जास्त सर्दी होऊन फुफ्फुस कमजोर बनले होते. दोन्ही फुफ्फुसांमध्ये एक सारखा कफ साचत होता.

कितीही डॉक्टरी उपाय केले तरी तात्पुरता कफ कमी व्हायचा आणि परत साचत होता. अगदी शहरातील डॉक्टर झाले, तरीही काही कमी होईना. कफ जास्त झाल्यामुळे प्रणालीला अशक्तपणा येत होता. तिला अंथरुणातून लवकर उठता येत नव्हते. मग बराच वेळ ती झोपून राहायची. सकाळी लवकर उठणे होत नसल्याने ती उशिरा उठायची. या आजारामध्ये तिचे स्वतःचेच आवरणे होत नसल्याने ती मुलांचे कसे करू शकेल? अशक्तपणामुळे तिला साधे उभा राहणे देखील शक्य नव्हते, तर स्वयंपाक करायचे कसे होईल? तिचे स्वतःच्या तब्येतीमुळे मयूरकडेही दुर्लक्ष झाले होते. तिला मुलांना वेळ देता येत नव्हता. ती जास्तीत जास्त वेळ झोपत होती. खरं तर हे सर्व अशक्तपणामुळे होत होते. हे सर्व पाहून मयूरच्या आईने आणि मयूरने तिला जास्तीत जास्त विश्रांती घेण्यास सांगितले.

सारखी विश्रांती घेताना तिचे तिलाच वाईट वाटत होते. मी अशी बसून राहणार आणि सासुबाई काम करत राहणार याचे तिला वाईट वाटत होते. मुलांना वेळ देता येत नाही, शिवाय मयूरलाही वेळ देता येत नाही याचेही तिला वाईट वाटत होते. पण ती काय करणार? तिचे शरीर तिला साथ देत नव्हते. ती थोडी जरी उभा राहिली तरी अशक्तपणामुळे तिचे पाय भरून येत होते. तिला एक पाऊलही पुढे टाकता येत नव्हते. अशा अवस्थेमध्ये ती घरातील काय कामे करणार? तिच्या अशा अवस्थेत मयूर आणि त्याच्या आईने तिला भरपूर साथ दिली. तिला काहीही न करता पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले. मयूर तिला काय हवे काय नको ते पाहत होता. तिची वेळोवेळी विचारपूस करत होता. दवाखान्यामध्ये घेऊन जाणे, ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत तिच्याकडे तो पूर्णपणे लक्ष देत होता. काही गरज लागली तर पाहत होता. तिचे सारे काही तो करत होता. आपली पत्नी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तो झटत होता, सारे काही प्रयत्न करत होता. एक नाही, दोन नाही, तब्बल दहा डॉक्टरांना दाखवूनही प्रणालीच्या तब्येतीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती. साताऱ्यातील बरेचसे डॉक्टर झाले होते. मयूरने त्याच्यापरीने सगळे प्रयत्न केले होते. पण दिवसेंदिवस प्रणालीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यापेक्षा ती आणखीनच कमजोर होत गेली.

प्रणालीची अशी झालेली अवस्था पाहून तिचे आई-वडील तिला घेऊन जाण्यासाठी आले. परंतु मयूर आणि त्याची आई तिला पाठवण्यास तयार नव्हते, कारण सून आजारी पडली की, माहेरी पाठवायचे आणि चांगली असली की, कामासाठी सासरी ठेवून घ्यायचे हे त्यांच्या मनाला न पटणारे होते. ती चांगली असताना सुद्धा सासरी आणि आजारी असेल तरीसुद्धा सासरचेच सगळे करावेत या मताचे ते दोघे असल्याने प्रणालीला माहेरी पाठवण्यास नकार देत होते.

"अहो, पण आम्ही प्रणालीची सगळी काळजी घेतच आहोत. मग इथे राहिली काय आणि तिथे राहिली काय? सारखंच आहे ना?" मयूर

"हो. पण माहेरी आली की वातावरणात थोडा बदल होईल. तिकडच्या जेवणामध्ये सुद्धा थोडा बदल होईल, त्यामुळे कदाचित तिची तब्येत सुधारेल, या दृष्टीने आम्ही तिला माहेरी घेऊन जाण्याचा हट्ट करत आहोत. बाकी आमचे काहीच म्हणणे नाही. फक्त कोणत्यातरी दृष्टीने तिची तब्येत सुधारावी इतकेच आमचे म्हणणे आहे. आतापर्यंत तुम्ही तिचे सारे काही केलेत. आता थोडी संधी आम्हालाही मिळावी असे आम्हाला वाटत आहे. तेव्हा कृपया तुम्ही प्रणालीला घेऊन जाण्यासाठी अडवू नका." प्रणालीचे बाबा.

"असे असेल तर ठीक आहे. तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. पण तिच्या दवाखान्याचा सगळा खर्च मी स्वतः देणार आहे. तुम्ही काहीही खर्च करू नका, कारण आता प्रणाली माझी जबाबदारी आहे. तिच्यावर जसा माझा हक्क आहे तसेच तिच्यावर होणाऱ्या खर्चाचा भागीदारही मीच आहे. तेव्हा ज्यावेळी तिला दवाखान्यात घेऊन जायचे असेल त्यावेळी मी तिकडे येईल आणि तिला दवाखान्याला घेऊन जाईन. तुम्ही फक्त तिची योग्य ती देखभाल करा." मयूरचे हे बोलणे ऐकून प्रणालीचे आई-बाबा सुखावले, कारण प्रत्येक वेळी सासरचे लोक हे जबाबदारी झटकत असतात, पण मयूर तसा नाही हे त्यांना समजले. मयूर एक खूप चांगला जावई आहे, तो आपल्या लेकीची योग्य ती काळजी घेतो हे त्यांना जाणवले. ते दोघेही आपल्या लेकीला घेऊन घरी गेले.

प्रणाली माहेरला गेल्यापासून मयूरला काही करमेना. त्याचे कशातच लक्ष लागेना. \"ती काय करत असेल? औषध वेळेवर खाल्ली असेल का? व्यवस्थित जेवत असेल का?\" अशा अनेक प्रश्नांनी तो तिची काळजी करत होता. प्रणालीला भेटण्यासाठी तो तिच्या माहेरी सुध्दा दोन तीन वेळा जाऊन आला. तेथून तो तिला दवाखान्यात घेऊन जाई आणि परत तिला सोडून येत असे. इतके सगळे करूनही प्रणालीची तब्बेत काही केल्या बरी होत नव्हती. कितीही दवाखाने केले तरी किंचितसा देखील फरक नव्हता. मयूर या सगळ्या गोष्टींमुळे हताश झाला होता. त्याचे कशातच मन रमत नव्हते. प्रणाली कधी बरी होईल? याची तो वाट पाहत होता. पण तिच्या तब्बेतीत तसूभरही फरक पडत नव्हता, त्यामुळे मयूरच्या काळजीत आणखीनच भर पडत होता. चक्क दोन वर्षे प्रणाली अंथरुणावर होती, पण तिच्यात काहीच फरक नव्हता.

एक दिवस अचानक प्रणालीला सकाळी रक्ताची उलटी झाली आणि घरातील सगळे घाबरून गेले. त्यांनी तातडीने मयूरला फोन लावला. मयूर हे ऐकताच त्याच्या हातातून फोन गळून पडला. तो एकदम घाबरून गेला. त्याला धीर देण्यासाठी कोणीच नव्हते. तो धपकन खालीच बसला. त्याच्या आईने जेव्हा त्याला या अवस्थेत पाहिले तेव्हा ती सुध्दा खूप घाबरली. तिने मयूरला येऊन काय झालं? म्हणून विचारले, तेव्हा मयूरने सत्य परिस्थिती सांगितली. आईने मयूरला धीर देत म्हणाली, "मयूर, काही होत नाही. तू असा खचून जाऊ नकोस. तिला पुण्यातील एका नामवंत डाॅक्टरांना दाखव. नक्कीच फरक पडेल. ऊठ बाळ. देवी अंबाबाई तुमचे रक्षण करेल." आईच्या या बोलण्याने मयूरला थोडा धीर मिळाला. तो लगेच उठला आणि प्रणालीला दवाखान्यात घेऊन जाण्यास तयार झाला.

प्रणालीला योग्य तो इलाज होईल का? प्रणाली ठिक होईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all