घरी आल्यावर मयूरने पाहिले, तर त्याची आई त्याची वाट पाहत बसली होती. त्याची मुले जेवणासाठी वाट पाहत होती. मुलांनी मयूरला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ते आनंदाने उड्या मारत त्याच्याजवळ आले. मयूरने दोन्ही हात पसरून मुलांना मिठीत घेतले. हे दृश्य म्हणजे जणू पक्ष्याच्या ऊबदार पंखात त्याची पिल्ले सामावली आहेत. मुलांना जवळ घेताच मयूरचा कंठ दाटून आला. त्याच्या डोळ्यात महापूर लोटला होता, पण त्याने ते आई व मुलांपासून लपवले. तो आवरण्यासाठी आत गेला. तेथे प्रणाली तिच्याच तंद्रीत बसली होती. मयूरने अलवार तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा प्रणाली भानावर आली.
आज कित्येक दिवसांनी सगळे एकत्र बसून जेवले होते. खूप दिवसांनी त्या सर्वांमध्ये संवाद झाला होता. मयूर आता थोडा जास्तच घराकडे लक्ष देत होता. प्रणालीसोबत गप्पागोष्टी करत होता. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत होता. प्रणालीला हे सगळे पाहून खूप आश्चर्य वाटले, पण तिला आनंदही झाला. मयूरच्या प्रेमाने तिची तब्बेत हळूहळू सुधारत होती.
याच दरम्यान मयूरची ओळख सोशल मिडीयातून नेहा नावाच्या मुलीशी झाली. नेहा खूप चांगली मुलगी होती. सुरूवातीला हाय हॅलो करता करता त्यांची कधी घट्ट मैत्री झाली हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. आता ते एकमेकांचे सुख दुःख मनमोकळेपणाने सांगत होते. मयूरने प्रणालीबाबत सारे काही नेहाला सांगितले. शिवाय तो किती मूर्खपणा करत होता हे सुद्धा सांगितले. ते ऐकताच नेहा थोडा वेळ शांत झाली. ती काहीच बोलली नाही. नंतर ती बोलू लागली.
"मयूर, आयुष्यात जोडीदार असणे आवश्यक असते. आपल्या सुख दुःखात सोबती हवा असतो. तुम्ही सप्तपदीच्या वेळी एकमेकांना सुख दुःखात साथ देईन असा फेरा घेतला होता. आता प्रणाली संकटात म्हणजे आजारात आहे तर तू तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस. खरंच तू एक चांगला जीवनसाथी आहेस. यातून प्रणाली नक्की बरी होईल. पण हे सगळे तुला कसे शक्य झाले? खरंच हॅट्स ऑफ यू." हे ऐकून मयूरला बरे वाटले.
"नेहा, आहे ती परिस्थिती मान्य केली तर काहीच अवघड नाही. मी सगळं काही मान्य केलंय. माझी कसलीच तक्रार नाही. जे आहे ते आहे. आता हेच माझे आयुष्य. जे होईल ते होईल, पण मी माझे कुटुंब सोडणार नाही. भले मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मला माझे कुटुंब सर्वात जास्त प्रिय आहे." मयूरचे हे बोलणे ऐकून नेहाला बरे वाटले. नाहीतर आत्ताच्या काळात बायकोशी पटत नाही म्हणून लगेच घटस्फोट घेतात, पण मयूरने परिस्थिती समजून घेऊन तिला साथ देत आहे. खरंच आत्ताच्या काळात असा जीवनसाथी मिळणे दुर्लभ. मयूरने खूप काही सहन केले. तसे त्याच्या वाट्याला सुख नव्हतेच. तरीही तो खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने सर्वांना साथ दिली.
आता मयूरच्या प्रेमामुळे आणि साथीने प्रणालीची तब्बेत सुधारत होती. तिच्या तब्बेतीत भराभर झालेली सुधारणा पाहून डाॅक्टरसुध्दा आश्चर्यचकित झाले. तिची औषधे देखील बरीच कमी झाली होती. प्रणाली आता आनंदात राहू लागली. ती मुलांकडे, मयूरकडे लक्ष देत होती. मयूरच्या आईला घरकामात मदत करत होती. आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करत होती. ती सुध्दा मयूरवर भरपूर प्रेम करू लागली. ती मुलांचे योग्य संगोपन करत असल्याने मुलेही आपसूकच तिच्याकडे ओढली गेली. मुलांना आईचे प्रेम मिळत आहे ते पाहून मयूरला खूप बरे वाटले. आता मयूरचा संसार सुखाचा होऊ लागला. ते पाहून त्याची आई सुखावली. अखेर मुलांच्या सुखातच आईचे सुख असते.
अशाप्रकारे मयूरच्या आयुष्यातील वादळं आता शांत झाली होती. ही वादळं वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या आयुष्यात येऊन जणू थैमान घातले होते, पण त्याने प्रत्येकवेळी त्यावर मात केली. अगदी धैर्याने परिस्थितीशी दोन हात करून त्याने लढा दिला आणि अखेर त्याने ही लढाई जिंकली.
त्याने लहानपणापासून खूप कष्ट सहन केले होते. बाबा गेल्यानंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यातून तो खचून न जाता शेती हा पर्याय निवडला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्याला जीवाभावाची मैत्रीण मीरा भेटली. तिच्या गोड स्वभावाने तिने त्याच्या मनात हक्काची जागा निर्माण केली. तिच्यासोबत घालवलेले क्षण त्याच्या आयुष्यातील सोनेरी काळ होता. पण तिच्या विरहाने तो परत खचला. आयुष्यात काहीच करू नये, असे त्याला वाटत होते. तेव्हाच त्याच्या आयुष्यात प्रणाली आली आणि तिने त्याचे आयुष्य खूप सुंदर केले. तो आत्ता कुठे सुखी संसाराची स्वप्ने पाहत होता तोच प्रणालीच्या आजाराने डोकावले. ही सर्व वादळं झेलत तो आयुष्य जगत होता.
आता मात्र ती सगळी वादळं निघून त्याचे आयुष्य सुखकर झाले होते. तो खूप आनंदात होता. त्याची संसाराची घडी आता सुरळीत चालू होती. अशी ही अनेक वादळांवर मात करून पुढे वाटचाल करणारा मयूर, म्हणून या कथेचे नाव वादळवाट.
या कथेला अगदी सुरूवातीपासून वाचणारे आणि कथेच्या प्रत्येक भागावर कमेंटरूपी योग्य ती दाद देणारे वाचकवर्ग कविता सरोदे, देवयानी चित्रा, सुगंधा अय्यर, सागर गावंडे, मनिषा म्हात्रे, प्रज्ञा फिरके, मंजूषा येडे, शिल्पा बाडवाईक, पोर्णिमा शिंदे, जयश्री खेडकर, समिका पानसरे, मंगेश देशपांडे, सारिका भैरू आणखी कोणाचे नाव राहिले तर यांचे मनापासून आभार.. तसेच लाईक्स देणारे वाचकवर्ग यांचे मनापासून आभार..
धन्यवाद..
प्रियांका अभिनंदन पाटील.
प्रियांका अभिनंदन पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा