वैशाखची खिचडी.
त्या दिवशी संध्याकाळी वैशाख साधारण साडे सात वाजता घरी आला. घरात एकदम शांतता होती, वैशाख बूट काढतच होता, की त्याची ७ वर्षांची मुलगी धावत बाहेर आली. “बाबा, आई झोपली आहे, तिला ताप आलाय.” वैशाखला जरा आश्चर्यच वाटलं कारण सकाळी निघतांना तर चांगली ठणठणीत होती, मग अचानक काय झालं असेल, असा विचार करत तो बेडरूम मधे गेला. वैशाखनी कपाळाला हात लावून पाहीला, ललना खरंच तापानी फणफणली होती. “ताप मोजला का?” वैशाखनी विचारलं. “हो, १०२ आहे.” मुलीनीच उत्तर दिलं.
“तुम्ही खिचडी लावता का?” ललनानी क्षीण आवाजात म्हंटलं.
“हो, लावतो, त्यात काय? तू सांग कशी लावायची ते.” वैशाख म्हणाला.
“काही नाही, एका पातेल्यात तुरीची डाळ एक वाटी आणि तांदूळ एक वाटी घ्या आणि कुकर लाऊन टाका. तीन शिट्टी झाली की गॅस स्लो करायचा आणि पांच मिनिटांनी बंद करायचा. खिचडी झाली की, फोडणी कशी करायची ते सांगते.” ललनानी सांगितलं.
वैशाखनी कुकर लावला आणि तो ललना जवळ येऊन बसला. शिट्टी झाली की स्लो करतो म्हणाला. शिट्टी कसली, १० मिनिटांनी भूस्स असा आवाज आला. वैशाख किचन मधे धावला. त्याला कळेच ना की तो काय पाहतो आहे ते. तो ओरडला “लले, कुकरला भोक पडलंय आणि डाळ तांदूळाच कारंज उडतंय.”
“गॅस बंद करा आधी. वाल्व गेलेला दिसतोय.” – ललना.
“अग, नाही, गॅस बंद झालाय, वाल्व ठीक आहे.” – वैशाख.
“अहो, गॅसचा नाही, कुकरचा गेलाय.” – ललना.
“लले, वाल्व नळाला असतो, गॅसला असतो, कुकरला कसा असेल?” – वैशाख.
ललनाला राहवेना, ती कशी बशी उठून किचन मधे आली. किचनभर पसरलेले डाळ तांदूळ बघून तिला चक्करच यायची बाकी होती. कुकर चांगलाच तापला होता. खालची बाजू काळी जांभळी झाली होती. “अहो, तुम्ही कुकर मधे पाणी घातलं नव्हतं का?”
“नाही. तू सांगीतलंच नव्हतं” – वैशाख.
“आणि डाळ तांदूळात?” – ललना
“नाही बुवा, अग तू म्हणाली की डाळ तांदूळ एका पातेल्यात घ्या आणि कुकर लाऊन टाका. मी तसंच केलं.” वैशाखनी सफाई दिली.
“कर्म माझं, अहो, पाण्याशिवाय अन्न कसं शिजेल? एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही हो तुम्हाला? फॅक्टरी कशी सांभाळता, हे देवालाच ठाऊक.” ललना आता चिडली होती. वैशाख निमूट पणे ऐकत उभा होता. “आता एक करा, तो फळीवरचा दूसरा कुकर काढा आणि घासून द्या.”
वैशाखने कुकर घासून दिल्यावर, “आता तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी बघते काय करायचं ते” – ललना.
“अग, तुझ्या अंगात ताप आहे, तू मला नीट सांग, मी सगळं व्यवस्थित करतो.” वैशाखनी सारवा सारव करायचं प्रयत्न केला.
“केलं तेवढं पुरे आहे, मी करते आता. नवऱ्याला उपाशी ठेवायची पद्धत नाहीये आमच्यात.” आणि ललनानी वैशाखला जवळ जवळ बाहेर ढकललंच. आता वैशाखला हे बरेच दिवस ऐकावच लागणार होतं, इलाजच नव्हता.