वर्गमित्र भाग 10

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगदपणे उलगडणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र.

# वर्गमित्र-10

असाच एक आठवडा अजून गेला.
बऱ्याच दिवसांनी आज मेल्स चेक करत होते.
त्यात एक मेल होता प्रसादचा अगदी त्रोटक असा.
"In a big office problem,wl cntact asap.gd day."

मागच्या आठवड्यात आला होता.म्हणजे त्याने मेसेज केला होता तर!!!
स्वत:लाच किती तरी वेळपर्यंत अपराधीच्या पिंजऱ्यात उभे केले.
कारण नसताना त्याच्या वागण्यावर शंका घेतली होती.
पण इतकी सगळी माध्यमे सोडून मेल का केला असेल?  हे कोडे काही केल्या उलगडेना.
ठिक आहे.निदान हे तर कळले की तो भेटवस्तू परत केल्यामुळे नाराज नाहीये.
मनावरचा ताण अचानक हलका झाल्यासारखे वाटले.
फक्त त्याने संपर्क करेपर्यंत वाट पाहायची ह्या निर्णयावर मात्र मी ठाम होते.
      ## ## ## ## ## 
आज मुलांच्या परिक्षा संपणार होत्या.सुट्ट्यांचे प्लॅनिंग सुरू झाले होते घरात.
कुठे जायचे,की आईकडे जावे? 
पण मुलांचा हट्ट कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावे.
श्रीधर आल्या आल्या मुलांनी एकच गलका केला त्याच्या भोवती. "बाबा,बाबा.हुर्रे!!! शाळा सुटली पाटी फुटली,...हेहे..हेहे"
"अरे,अरे!!! काय चाललेय तुमचे?
बाबाला फ्रेश तर होवू दे.."
मी जराशी पोरांवर ओरडले.
श्री मात्र नेहेमी प्रमाणे पोरांना दोन खांद्याला लटकवुन तसाच फिरत होता.
हसणे खिदळणे अन् त्यांची मस्ती बघुन स्वत:च्या भाग्याला माझीच नजर लागेल की काय असे वाटत होते.
इतका गोड संसार दिला होता देवाने.
आज अचानक वातावरणात एक अनामिक आनंद मोकळेपणा मी अनुभवत होते.
जेव्हा मनावर कुठला ताण असतो तेव्हा समोरच्या सर्व घटना आपल्यासाठी जाणीवपुर्वक उदासिनता निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्याएत असे वाटायला लागते.नकळतपणे तो ताण कुणावर तरी काढला जातो.
मी खूप प्रयत्न करून स्वत:ला गेल्या दोन आठवड्या पासून जितकी सावरत होते तितकी आतून तूटत चालले होते.
अनामिक भीतीने मन ग्रासले होते.
मुलांवर चिडचीड केलेली श्रीला अजिबात आवडत नसे.
त्यामुळे मनावरचा ताण शक्यतोवर कुणावर जाहीर न होवो ही काळजी घेत मी हे दिवस कसे काढले होते फक्त माझे मलाच माहित होते.
मनाला राहून राहून एकच प्रश्न पडायचा.
असे काय आहे प्रसादच्या माझ्या मैत्रीत की मी इतकी अस्वस्थ व्हावे?
ह्या आधी ही बऱ्याच मैत्रिणींशी वेगवेगळया कारणांनी असा अबोला घडायचा.आणि मी खूप तटस्थ राहायचे.शेवटी त्याच पून्हा यायच्या माझ्याशी बोलायला.
पण प्रसादच्या वेळी मी अनुभवत असलेली घालमेल ह्या आधी का कधी अनुभवली नाही?
प्रश्नांचे इतके तरंग मन:पटलावर कधीच हेलकावले नव्हते.
तशी पहिल्यापासुन फारशी भावनिक गुंतागंतीत न अडकणारी मी प्रॅक्टिकल म्हणुनच प्रसिद्ध होते.
माझी एक मैत्रिण अगदी जवळची एक दिवस अचानक घरी आली आणि रडायलाच लागली.म्हणजे कॉलेजात असतानाची घटना हं ही.
मला काहीच समजेना का रडतीय.विचारले तर सांगायलाही तयार नाही.
बराच वेळाने शांत झाल्यावर मी पाणी देवून तिला विचारले अग्,काय झाले गिरीजा, रडतेस का अशी?
कोणी काही बोलले का?
तिचे उत्तर एेकून मी अचंबितच झाले.
म्हणाली,अग्,काही नाही ग् खूप भरून आले मन.वाटले की रडावे म्हणून तुझ्याकडे आले.
तिच्या त्या बोलण्याचा अन् रडण्याचा अर्थ मला तेव्हा लागलाच नाही.उलट तिलाच मनातल्या मनात मूर्ख ठरवुन मोकळी झाले होते मी.
गेल्या दोन आठवड्यात कितीदा तरी असे कढ भरून आले आणि गिरीजाची त्यावेळची अवस्था आज मला कळली.

पण स्वत:ला खूप खंबीर समजणारी मी स्वत:ला रडवेले बघुच शकत नव्हते म्हणुन सावरायचा आटोकाट प्रयत्न करत होते.
सतत समजावत होते मनाला माणसे काय येतात अन् जातात.त्यांच्या असण्या नसण्याने आपल्याला का फरक पडावा.?
मुळीच नाही रडायचे..
असे स्वत:ला बजावत होते जेव्हा कधी मन रडायला लागायचे.
त्या एका मेसेजनी अशी काय जादू केली होती माहित नाही पण मन मोर आज मुलांबरोबर स्वत:भोवतीही रूंजी घालत होते.
"बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला"
लताच्या ह्या गाण्याचा खरा अर्थ आज पून्हा गवसला होता...
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश: 10)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all