वाट पाहते पुनवेची.. भाग -१

आईला इतके बेचैन झालेले पाहिल्यावर रियांशला अपराधी असल्यासारखे वाटू लागले.
वाट पाहते पुनवेची..

भाग -१


“ये आई , हे बघ तुला सांगितल्याप्रमाणे मी वटपौर्णिमेच्या आधी तुझ्यासमोर हजर झालो की नाही ते. किती काळजी करत होतीस तू ! आता काय मी लहान आहे का ? कॉलेजला जातोय. पण तरीही तुला मला बाहेर सोडताना कसली भीती वाटते देव जाणे !” रियांश एका दमात बोलत होता.


औक्षणाचे ताट घेऊन उभ्या असणाऱ्या लक्ष्मी मायलेकाचा जिव्हाळा अनुभवत होत्या. रेवती ताई आपल्या लाडक्या रियांशच्या चेहऱ्याकडे पाहून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या.

“आई तू परत सुरु झालीस ? किती रडशील ? आलोय ना मी आता. दोन दिवस मलाही तुझ्याशिवाय करमले नाही आणि नेमकी तिथे रेंजही नव्हती म्हणून मी चार दिवसांचा समर कॅम्प दोन दिवसांमध्ये आटोपून परत आलोय. आपलं नातं वेगळच आहे बघ. मी कितीही मोठा झालो तरी मला ते गाणं आजही गुणगुणावं वाटतं ,एकटी एकटी घाबरलीस ना , वाटलंच होतं आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही.”
आपल्या मधुर आवाजात रियांश गाणे गुणगुणत होता.

आईने हसून लेकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले. लक्ष्मीताईंच्या हातातील औक्षणाचे ताट घेऊन रियांशचे औक्षण केले. रियांशने आशिर्वाद घेण्यासाठी आईच्या पायांवर आपला हात टेकवला.

आई नेहमीप्रमाणे पाठीवरती हात ठेवून मला मोठा आशीर्वाद देईल असे त्याला वाटले पण आई आशीर्वाद न देता स्वतः खाली बसून रियांशच्या हातातील तो ऐवज कुठे हरवला म्हणून घाबरून चक्क अश्रू ढाळू लागली.


“लक्ष्मी बघ ना ,रियांच्या हातातलं ते कडं स्वामी महाराजांनी दिलेलं दिसत नाहीये त्याच्या हातात. काय करू मी आता ? कुठं असेल ते कडं ? कुठे हरवलंस रियांश ते कडं ? बोल ना रियांश ?” आता मात्र रेवतीताईंनी हंबरडा फोडला.


“ आई कुल डाऊन अगं ! किती टेन्शन घेतेस ! आपण दुसरे कडे आणूया. मला मान्य आहे माझी चूक झाली. हरवले ते कडे माझ्याकडून पण कुठे हरवले ? ते माझ्या लक्षात येत नाहीये. तू काही काळजी करू नकोस .आपण ज्वेलर्सकडे जाऊन दुसरे कडे आणूया.” रियांश.


“रियांश तुला कसं सांगू ? ते कडं किती महत्त्वाचं आहे ते. नाही मिळत बाळा ते कोणत्या ज्वेलर्सकडे. जा आणि फ्रेश हो पटकन. मी आत्ता लगेच स्वामी महाराजांना फोन करते.” आई.


रेवती ताईंनी स्वामी महाराजांना फोन केला पण काहीच उपयोग झाला नाही. फोन महाराजांच्या आश्रमात लागला. तेंव्हा रेवती ताईंना समजले , स्वामी महाराज सध्या शहरात नाहीयेत. ते एका महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत.


इकडे आईला स्वामी महाराज शहरात नाहीयेत हे समजल्यावर अचानक चक्कर आली. पलीकडचा व्यक्ती बोलत होता , “रेवतीताईंचा वटपौर्णिमेआधी कधीही कॉल आला तर आश्रमातून एखादे स्वामी रेवतीताईंच्या मदतीला पाठवा हे स्वामी महाराज सांगून गेलेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मदतीला पाठवू कोणीतरी.” पण हे ऐकण्याआधीच रेवतीताई चक्कर येऊन पडल्या.

लक्ष्मीने रेवतीताईंना आधार दिला.

“रियांश बाबू , रियांश बाबू , लवकर या. रेवतीताईला चक्कर आली आहे.” म्हणून लक्ष्मी ओरडत होती.

आता तर रियांशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला वाटले , त्याच्या हातातील कडे हे त्याच्या घराचे सुरक्षा कवच आहे आणि आता खरंच त्याच्या घरावर कुठलेतरी संकट येणार आहे. त्याच्या चुकीमुळे त्याच्या आई-बाबांना काही झाले तर तो स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही.


आईला इतके बेचैन झालेले पाहिल्यावर रियांशला अपराधी असल्यासारखे वाटू लागले.

‘आई नेहमी ते कडे माझे संरक्षण कवच आहे असे सांगत असते पण मला कधीच तसे वाटले नाही. केवळ आईच्या इच्छेखातर मी ते कडे घालतो. आज नेमके माझ्याकडून ते कसे हरवले देव जाणे ! मला माझे कडे हरवले आहे ही गोष्ट सरांना कॉल करून सांगावी लागेल.’ हा मनात विचार करत रियांशने सरांना कॉल केला पण त्याचा कॉल रिसिव्ह झाला नाही.
त्याने त्याच्या फ्रेंडलाही कॉल केला आणि कॉल रिसीव झाल्याबरोबर त्याने आपल्या मित्राला त्याचे कडे हरवले आहे हे सांगितले. त्याच्यासाठी त्याचे कडे खूप महत्त्वाचे आहे. तो त्याच्या आईला नाराज झालेले , आजारी असलेले नाही पाहू शकत. त्यामुळे ते कडे लवकरात लवकर मिळायला हवे असे सांगितले. हे सांगताना रियांशचा कंठ दाटून आला होता.

त्याने बाबांना फोन करून फॅक्टरीतून बोलावून घेतले. बाबांनाही रियांशच्या हातात कडे दिसले नाही तेंव्हा भयंकर टेन्शन आले.


“रियांश काही करून ते कडे मिळवायला हवे. त्यातच आपल्या सगळ्यांचे भले आहे. तुला काही झाले तर तुझी आई आणि मी नाही जगू शकणार.” बाबा गंभीर होऊन म्हणाले.


रियांशचे कडे त्याला परत मिळेल का ?

क्रमशः

©® सौ. प्राजक्ता पाटील


🎭 Series Post

View all