"हे लग्न मला मुळीच मान्य नाही.."
बोहल्यावर उभ्या असलेल्या चेतनाने तावतावात हातातली शाल भिरकावत सर्वांसमोर आरडाओरडा केला.
हे बघताच तिची आई पुढे आली आणि तिच्या कानाखाली वाजवली...
"का नाही करायचं लग्न? स्वतःला जास्त शहाणी समजतेस का? मोठ्या मुश्किलीने तुझा संसार परत मांडायला आम्ही जीवाचं रान केलं आणि तू??"
चेतनाच्या डोळ्यात अंगार होता, ती आईवर चिडली..
"खबरदार यापुढे मला कुणी काहीही बोललं तर.."
असं म्हणत ती मुलाला घेऊन तिथून निघून गेली..मंडपातले मोजकेच सदस्य एकमेकांकडे पाहू लागले. आई वडिलांच्या डोक्याला हात लावला आणि रडारड सुरू झाली. मुलाकडचे मंडळी चेतनाच्या आई वडिलांना बोलू लागले..
"फार कौतुक करत होतात तुम्ही मुलीचं... बरं झालं वेळेवर तिचे गुण दिसले नाहीतर आमच्या मुलाचं भविष्य धोक्यात आलं असतं.."
****
चेतना, तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा रोहन..अगदी नजर लागावी असा संसार होता. पण काळाने घाला घातला तसं चेतनाच्या नवऱ्याला अटॅक आला आणि तो लगेच गेला. हा धक्का चेतनाला सहन झाला नाही, ती मानसिक रुग्ण बनली..पण हळूहळू उपचार घेऊन ती यातून सावरली..आता जे सत्य आहे ते स्वीकारायचं आणि यापुढे फक्त रोहनकडे बघून जगायचं हेच तिने मनाशी पक्क केलं होतं.
नातेवाईक यायचे, सांत्वन करायचे..पण दुसऱ्याच क्षणी आता तिने दुसरं लग्न करायला हवं असा सल्ला द्यायचे. सोबत स्थळही आणायचे..वयाने 20 वर्ष मोठा असलेला, 3-3 मुलं असलेला माणूस तिला दाखवायचे..आई वडिलांना मुलीच्या सुखापेक्षा तिला परत सासरी पाठवून आपलं ओझं कमी करावं याकडे कल होता. तेही विचार करायचे, अक्षरशः अश्या माणसांना होकार देऊन मोकळं व्हावं असा विचार करायचे पण चेतनाने आई वडिलांचं एक ऐकलं नाही..
****