Login

आम्ही जिगरी दोस्त - भाग ३

गावाकडील शाळेच्या जिगरी दोस्तांची गोष्ट
शीर्षक: आम्ही जिगरी दोस्त - भाग ३
डिसेंबर जानेवारी २०२५ - २०२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा

पात्र परिचय:
गोट्या:पाच जिगरी दोस्तांतील एक
अजय सर: शाळेचे संस्थापक
काही मुले व त्यांचे पालक :चार-पाच मोठे व्यक्ती व चार मुले
स्थळ:अजय सरांचे घर

मागील भागात आपण पाहिले की महाद्या शाळेतील ते दृश्य पाहून अस्वस्थ झाल्यामुळे त्याचे वडील राम त्याला घरी आणतात. गोट्या नावाचा महाद्याचा मित्र तिथे येतो. राम मात्र इथून पुढे महाद्याची शाळा कायमची बंद असे सांगून गोट्याला त्यांच्या घरातून जायला सांगतो.आता पाहुया पुढे..

गोट्या अजय सरांच्या घरी पोहोचला. तिथे आधीच शाळेतील काही मुले, त्यांचे पालक हजर होते. काहीतरी गहन विषयावर चर्चा चालू आहे,असे गोट्याला कळाले.तेथील वातावरणात एक नकारात्मक शांतता भासत होती.

अजय सर म्हणाले, "मी काही दिवस शाळा बंद ठेवण्याचे ठरवले आहे."

अजय सरांचे बोलणे ऐकून सर्व पालक एकमेकांकडे आश्चर्याने पाहत,घाबरून, अचंबित होऊन व्यथित झाले; कारण शाळा बंद ठेवण्याचे कारण एव्हाना पूर्ण गावात माहीत झालेले होते.

गोट्या मात्र काहीही माहित नसल्याने आश्चर्याने म्हणाला,"काय?"

अजय सर गोट्याकडे बघत म्हणाले,
"होय. आपण सर्वांनी सहकार्य करून मला आजवर खूप आधार दिला आहे, शाळेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे. आपल्या मुलांना शाळेचे महत्त्व पटवून दिले आहे; त्यामुळे इथून पुढेही शिक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन मला सहकार्य कराल अशी आशा मी बाळगतो. तूर्तास माझ्या निर्णयाला आपण सर्वजण स्वीकाराल अशी अपेक्षा करतो."

सर्व पालकांनी हताश होऊन पुन्हा एकमेकांकडे पाहिले व ते तिथून निघून गेले. गोट्या मात्र तिथेच थांबला.

"अजय सर काय झालं आहे नेमकं ? शाळा बंद का ठेवताय तुम्ही? एवढे काय मोठे संकट आले आहे? तुम्हाला माहित आहे, आम्हा पाच जिगरी मित्रांना शाळेशिवाय ,इथल्या वातावरणाशिवाय एक दिवस करमत नाही; तुमच्या वाणीतील ज्ञानगंगा ऐकल्याशिवाय आमच्या स्वप्नांचे बळ वाढत नाही; मग हे टोकाचे पाऊल का?"
गोट्याने कळकळीने विचारले.

अजय सर गोट्याच्या पाठीवर हळुवारपणे हात ठेवत म्हणाले,
" शाळेत खून झाला आहे; म्हणजे मलाही कळत नाहीए ,शाळेत तो मृतदेह आणून टाकला आहे की शाळेतच खून केला गेला आहे?"

गोट्या आश्चर्यचकित होत म्हणाला,"काय?"

"हो.एक मृतदेह शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पडून होता."
अजय सर सुस्कारा सोडत म्हणाले.

गोट्या अचंबित होऊन म्हणाला," काय? मृतदेह? " फ्लॅशबॅकमध्ये येत गोट्याला कळले की म्हणून महाद्याची अवस्था अशी झाली होती.

अजय सरांनी शांतपणे खालीवर होकारार्थी मान डोलावली.

गोट्याने प्रश्नार्थक नजरेने विचारले,"कोणाचा होता तो मृतदेह?"

अजय सर म्हणाले," किशाच्या वडिलांचा..केशवरावांचा.."

"काय?" गोट्या आश्चर्य तसेच भीतीने ओरडला.

अजय सर समजुतीच्या सुरात म्हणाले,
"हो..गोट्या, तुम्ही पाच जिगरी दोस्त. सोबतच माझे आवडीचे विद्यार्थी. तुम्ही या दुःखाच्या प्रसंगी एकमेकांना साथ देऊन शाळेला परत प्रगतीपथावर आणण्याचे कार्य करा;कारण झालेल्या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे."

गोट्या देखील सरांचा त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवत म्हणाला,
"नक्कीच सर.तुम्ही सांगाल ते आम्ही करू.शिवाय या खुनाचा सुगावा देखील नक्कीच लावू.विश्वास ठेवा सर आमच्यावर.आमच्या दोस्तीची नाळ खूप घट्ट आहे; त्यामुळे आमची दोस्ती व आमची शाळा आमच्या प्राणापेक्षाही आम्ही जास्त जपणार म्हणजे जपणार."

अजय सर आनंदाने म्हणाले,
"शाब्बास गोट्या. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती."

गोट्या अजय सरांच्या पाया पडला व मनात काहीतरी ठाम निर्धार करत तिथून निघाला.

क्रमश:

भाग ३ समाप्त..

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन, ' favorite’ ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.