काहीही चूक नसतांना सतत ऐकत असते मी. बरं लग्नाआधी त्यांनी कबूल केलेलं की माझं शिक्षण आणि करियरला मदत करतील..पण लग्न झालं तसं सासू किचनमधून सुटका होऊ देत नाही, कॉलेजला जायचं म्हटलं की जास्तीची कामं काढणार..दरवेळी पेचात पडणार, आणि कामं झाली नाही की आहेच नवऱ्याचे कान भरायला..मला नकोसं झालंय तिथे राहणं.. नवरा आला की तक्रारी शिवाय दुसरं बोलणं नाही..दिवसभरातल्या माझ्या तक्रारी सासूने संध्याकाळी माझ्या नवऱ्याला ऐकवायच्या आणि नवऱ्याने रात्री माझ्यावर आवाज चढवायचा..यापलीकडे काहीही होत नाही तिथे.."
आईने बाबांना खुण केली तसे दोघे बाहेर आले. आई बाबांना म्हणाली,
"ती सध्या खूप तणावात आहे...जरा नॉर्मल झाली की मग समजावू.."
आई बाबा तिला काहीही बोलले नाही. राधाचं मन आता कुठे शांत होत होतं. तिच्या खोलीत तिच्या आवडीची कामं ती करायची..तिचा उरलेला अभ्यास, प्रोजेक्ट करू लागली.. त्या नरकातून बाहेर आली याचं समाधान तिला होतं.
आई बाबांनीही ती शांत व्हावी म्हणून विषय काढला नाही. मध्ये काही दिवस फिरायला जाऊन आले, जत्रेला जाऊन आले. राधा आधीसारखी खुश दिसत होती..पण आता शेजारचे आणि नातेवाईक विचारू लागले. ही इतके दिवस माहेरी का? आता त्यांना बाहेर पडणं नको नको वाटू लागलं..त्यांना असं झालं की कधी हिला समजावून सासरी पाठवतो आणि पुन्हा एकदा लोकांमध्ये ताठ मानेने वावरतो...
आई बाबा पुन्हा तिच्या खोलीत गेले आणि त्यांनी विषय काढला..
"बाळा, सासरी गेल्यावर प्रत्येक मुलीला थोडाफार त्रास होतोच.. थोडं सहन केलं तरच आयुष्य पुढे चालू राहील..नाहीतर तुम्हा प्रत्येकाची वाताहत होईल.."
"मी सासरी परत जाणार नाही.." राधा ठामपणे म्हणाली,
हे ऐकून बाबा मात्र चिडले,
"जाणार नाही म्हणजे? यासाठी एवढा खर्च करून तुला सासरी पाठवलं? बाकीच्या मुलींकडे बघ...आपल्या वॉचमन ची बायको बघ, तो रोज तिला मारहाण करतो..पण ती कधी माहेरी जाताना पाहिलीये का?"
"बाबा? तुम्ही माझी तुलना त्या बाईशी करताय?"
बाबा गप्पच झाले, त्यांना काय बोलावं सुचेना..
"आणि हो, माझ्या या परिस्थितीला फक्त आणि फक्त तुम्हीच कारणीभूत आहात.."
"काहीही काय? आम्ही काय केलंय?"
*****
*****