Login

तिचं वर्चस्व! भाग २

कर्तुत्ववान स्त्री ही फक्त स्वतःच भविष्य घडवत नाही तर समाजालाही नवी दिशा दाखवते.
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद कथालेखन

तिचं वर्चस्व!  भाग २

©® एकता माने

सभेत वातावरण तापलं. सरपंचाने हात वर करून सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

“सुमित्रा, तुझं म्हणणं खरंय; पण तू एकटी काय करू शकशील? वाद मोठा आहे.”

सुमित्राने एक नजर तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्या बायकांवर फिरवली.

“एकटी नाही सरपंच साहेब. या गावातल्या सगळ्या बायका माझ्यासोबत आहेत.”

आणि खरंच, मागून बायका एकएक करून उभ्या राहिल्या. कोणाच्या हातात हंडा, कोणाच्या हातात लोटा.

त्या सगळ्या एकाच स्वरात म्हणाल्या,
“आम्हाला पाणी हवंय, आमचा हक्क हवाय!”

रामभाऊचे तोंड वाकडं झालं.

“अहो, या बायका जर असं वागणार असतील, तर उद्या शेतं पण घेतली तर?”

सुमित्रा शांतपणे म्हणाली,
“आम्ही कुणाचं घेत नाही. फक्त हक्क मागतोय आणि लक्षात ठेव, जेव्हा बायका एकत्र येतात, तेव्हा डोंगरही हलतो. इथं आमचं वर्चस्व नसेल तर काय असेल?”

सुमित्राच्या बोलण्यावर सगळ्या बायकांनी जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. रामभाऊ आणि सरपंच सगळ्यांनाच अशा परिस्थितीत शांत रहावे लागले.

सुमित्राचे असे गावासाठी वागणे तिच्या घरच्यांनाही आवडत नव्हते. तिला तिच्या घरच्यांकडून खूप वेळा यासाठी विरोध असायचा; परंतु तरीही जिकडे तिला दिसत असेल तिकडे ती बोलायला मागे पुढे विचार करायची नाही.

सुमित्राची लढाई फक्त गावापुरती मर्यादित नव्हती. घरीसुद्धा तिला सतत संघर्ष करावा लागायचा. सासरे जुन्या विचारांचे, नवरा श्रमिक; पण बायकांच्या पुढे शब्द न काढणारा. गावात घडलेल्या गोष्टीबद्दल तिच्या घरातही समजले. सासऱ्यांना तिचे असे वागणे पटले नाही. गावातल्या मोठ्या श्रीमंत माणसांसोबत, सरपंचांसोबत का वाद घालून संकट ओढवून घ्यावे असेच त्यांना वाटत होते.

एका रात्री सासरे म्हणाले,
“सुमित्रा, ही पंचायत वगैरे तुझं काम नाही. घर बघ. लोक काय बोलतील? बायकांनी असं उधळं वागायचं नाही.”

सुमित्रा शांतपणे म्हणाली,
“बाबा, लोक काय बोलतात ते महत्त्वाचं नाही. लोक चुकीचं सहन करतायत, हे महत्त्वाचं आहे. मी बोलले नाही तर माझ्या मुलीला पण असंच पाण्यासाठी भटकावं लागेल उद्या.”

नवरा शंकर तिच्या बाजूने म्हणाला,
“बाबा, तुम्ही काळजी करू नका. माझी बायको जे करत आहे ते गावासाठी योग्यच आहे. तिचा मी अभिमान बाळगतो.”

जेव्हा आपला नवरा आपल्या बाजूने उभा राहतो तेव्हा कोणतीही स्त्री कुठलीही लढाई लढण्यासाठी समर्थ होते आणि त्यावेळी तिला कोणत्याही परिणामाची भीती नसते. आपल्या नवऱ्याचे असे आपल्या बाजूने असणे तिला एक वेगळ्याच प्रकारचे बळ देऊन गेले.

त्या नवरा बायकोचं बोलणं ऐकून यावेळी सासरे मात्र गप्प बसले. खरंतर तिचं बोलणं आणि तिची लढाई ही योग्य दिशेने होती त्यामुळे सासऱ्यांनाही काही बोलता आले नाही.


गावातली ही पाण्याची चळवळ आता मोठी झाली होती. सुमित्राने बायकांना एकत्र करून ‘स्त्री संघटना’ उभी केली.

त्यांनी ठरवलेलं...
'गावातल्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही आपलं मत मांडणार. शिक्षण, आरोग्य, रोजगार, सगळीकडे आमचा आवाज असला पाहिजे.'

एका दिवशी पंचायतमध्ये मोठा वाद झाला. गावातल्या शाळेसाठी नवीन इमारत बांधायची होती. काही पुरुष ठरवून बसले होते  ठेकेदार त्यांचाच असावा; पण त्यात भ्रष्टाचाराचा वास येत होता.

सुमित्रा उठली.

“हा ठेका गावाच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. यात राजकारण नको. आम्हाला खुल्या निविदा हव्यात आणि त्यावर ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात येईल.”

सरपंच तर गोंधळलाच.

“सुमित्रा तुला नक्की काय म्हणायचं आहे ते मला मान्य आहे; पण हे इतकं सोपं नाही.”

ती ठामपणे म्हणाली,
“गाव सोपं नाही; पण न्याय सोपा आहे. जो योग्य असेल तोच निवडला जाईल. हा प्रश्न गावातील मुलांचा आहे आणि त्यांना योग्य ते शिक्षण मिळावे ही जबाबदारी आपली आहे.”

सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी प्रश्न गावातल्या मुलांच्या भविष्याचा असल्यामुळे गावातली बहुतेक माणसं तिच्या बाजूने होती. सगळ्या स्त्रियांसोबत काही पुरुषही तिच्या बाजूने उभे होते. तिच्या बोलण्याचा मुद्दा सगळ्यांना पटला आणि सगळ्यांनी मिळून तिची साथ दिली.

क्रमशः
©एकता माने
0

🎭 Series Post

View all