करावं तरी काय
वागावं तरी कसे कळत नाही
वागावं तरी कसे कळत नाही
"सासूबाई आल्या आहेत गावाकडून आता इथे राहायला.." स्वाती आईला सांगत होती
"मग तर उत्तम आहे की.." आई
"कसले उत्तम असतं ग तुझ्यासाठी..?"
"म्हणजे काय कधी तरी वर्षातून पंधरा दिवस तर येतात ,आमच्या सासूबाईसारखे तरी तुमचे नाही..आम्ही तर सतत वर्षानुवर्षे सासुसोबतच असायचो...थोडी कडक होती ती पण मला जमत असायचे..पण काकुला मात्र त्रासच झाला नंतर सासूबाईंचा.."
"म्हणजे काय ग ,तुम्ही शहरात आल्यावर आजीने तिकडे त्रास दिला का काकुला खूप..?"
"हो मग काय तर,त्यात काकू शिकलेली होती. पुढारलेल्या विचारांची होती तिला माझ्या सारखे सासू समोर नवऱ्याशी बोलायचे नाही हे कधीच मान्य नव्हते...म्हणून ती नंतर नंतर सासू समोर काका बोलत ,गप्पा मारत ,हसत..सोबत जेवण करत..आणि नेमके हेच सासूबाईला पटत नसत..तिने काकुला कितीदा सगळ्यांच्या समोर ऐकवले ही होते.."
"काकूने तसे तेव्हाच्या काळात असे वागणे म्हणजे सगळ्यांचा राग ओढवून घेणे म्हणजे टोकाचे होते..पण आजीला कसला त्रास होत होता...मी बघायचे की आजी बाबा ही छान गप्पा मारत असायचे..सोबत शेतात जायचे..घरी येतांना मस्त एकमेकांसोबत हसत यायचे..मग सून करते तर त्रास झाला..?"
आईने लगेच विषय लेकीच्या नौकरीवर आणला .
"तुझी शाळा चांगली चालू आहे ना!! घर आणि सासूला तू सांभाळून शाळेत वेळेवर जात आहेस ना ??"
"हो ग सगळं छान चालू होते काल पर्यंत.."
"म्हणजे काय.?"
"मला सवय आहे हे ऑफिसमध्ये जातांना मी त्यांना एक वाटी ड्राय फ्रूट देते...फळ देते..दूध देते..मग बाय करते .."
"हो मग काय..?"
"मग काय सासूबाई म्हणतात तू मुद्दाम मला दाखवायला हे करतेस ,प्रेम आणि काळजी असल्याचे दाखवतेस..हे माझ्या समोर का करतेस.?? मला सगळं कळतंय की तुला हे दाखवायचे आहे की तुमच्या मुलाला मी माझी सवय लावली आहे...आमचे किती ही भांडण लावून देण्याचा तुमचा प्रयत्न असला तरी आम्ही भांडण होऊ देणार नाही.."
"हे काय आता ,तू तर हे रोज करत असतेस..त्या नसल्यावर ही..जावई बापू यांना ही सवय झाली आहे..त्यांनीच तसे सांगितले आहे..मग त्यांनी सांगायचे ना आईला तसे.."
स्वाती लगेच म्हणाली ,"परत मी भांडण लावून देत असा समज होतो सासूबाई चा..म्हणून मी काढता पाय घेते..मार्ग बदलते ,आणि आज मी त्यांना बेड रूम मध्येच चहा ,नाशता,ड्राय फ्रुटस नेऊन दिले..नकोच म्हंटले कटकट उगाच तर."
"तर काय आता त्यात ही कटकट..?"
"हो त्यात ही कटकट सुरू केली ,की मला दाखवायचे नसेल तुम्ही काय खात आहात दोघे ,काय बोलत आहेस तू माझ्या बद्दल म्हणून तू त्याला आत घेऊन जातेस.."
आता तर स्वातीची आई पुरत्या आवक झाल्या ,त्यांनी स्वातीला सांगितले ,"तू त्यांना कसलेच उत्तर देत बसू नकोस..त्यांना बोलायचे ते बोलू दे..जेव्हा त्या स्वतःशी बडबड करून थकतील तेव्हा कळेल की आपल्या बदबडीचा उपयोग होत नाही..स्वाती काही मनावर घेत नाही...स्वातीला आता डिवचण्यात काही अर्थ नाही.."
"मग काय होईल.?"
"मग त्या गप्प राहतील ,गप्प राहून त्यांना बोर होऊ दे..बोर झाल्यावर त्यांना वाटू दे की आता बोलल्या शिवाय रहावत नाही तेव्हा त्या हा विचार करतील आपण बोलतांना कोणाला दुखवेल असे न बोलता स्वातीच्या हिताचे बोलून बघावे..आणि त्याने तरी तिचे मन जिंकावे.."
स्वाती ने आई समोर हात जोडले आणि म्हणाली ,"हे तुला कोणी सांगितले असे अघोरी उपाय..? कारण ह्या त्यातल्या नाहीत...ह्या स्मार्ट सासूबाई आहेत ,आजी नाहीत..त्या लगेच फोन काढतात आणि त्यांच्या नातेवाईकांना फोन लावतात..मी बोलले नाही किंवा लक्ष दिले नाही तर त्यात मनातले नातेवाईकांना सांगत बसतात... गेम ही जमतो बरं त्यांना...पण त्यांना मन कळत नाही...हेतू कळत नाही...सून खरंच खुनशी नाही हे कळत नाही...अग मी तर म्हणते तू सासू म्हणून बरी आहेस पण ह्या नाही...मी तरी तुला सांगते मी ज्यातून जात आहे..त्यातून वहिनीला जाऊ देऊ नकोस...तू सारासार विचार कर...कधी तिचे कधी तुझे कर..पण तुमच्या दोघीतल्या गोष्टी तुमच्यात राहू दे..."
आईला हे पटलं होत...सासू सून आणि नातेवाईक हे त्रिकुट न होऊ देता फक्त सासू सून मिळून मिसळून भांडण करून पुन्हा एकत्र आल्या की कोणाला कोणाचा वीट येत नाही..
तशी स्वातीने आशा सोडून दिली होती की सासूबाई कधीच तिला गोड बोलणार नाहीत ,त्या त्यांचेच खरे करत राहतील आणि त्यांना माझी कुठे कधी ही गरज पडू देणार नाही..
तितक्यात सासूबाई स्वातीकडे धावत आल्या होत्या आणि त्यांनी तिला एकदम गयावया करायला सुरुवात केली ,आणि म्हणाल्या ,"अग स्वाती ह्या माझ्या फोनला काय झाले आहे सकाळपासून बघ तरी स्वाती ,तो चालतच नाही..बघ मी सकाळपासून एकटी त्याला हाताळत आहे पण कळत नाही काय झाले ,काय बिघडले आहे..तुला सगळे कळलते तर जरा दुरुस्त कर ,चालू करून दे...मी सकाळपासून एकटी खूप बोर झाले ,कोणाशी बोलू असे झाले आहे..त्यात तू ही बोलत नाहीस..तुझ्याशी बोलावे म्हटले तर तू फोन घेऊन बसली होतीस..मग कोणाला हाक देऊ कोणाशी बोलू नुसते वेड लागायची वेळ आली होती.."
आता स्वातीला कळले की मोबाईल दुष्मन ही होऊ शकतो तर हाच मोबाईल माझा मित्र होऊन माझी इच्छा ही पूर्ण करू शकतो..त्याने ऐनवेळी काय अंग टाकून द्यावे आणि त्याने सासूला काय अद्दल घडवावी..आता त्यांना कळले होते मोबाईल ही बंद पडू शकतो ,तो बंद पडल्यावर सुनेची गरज पडू शकते..तिच्या समोर मोबाईल साठी ही हात जोडायची वेळ येते...जेव्हा मोबाईल नातेवाईकांना जोडू शकत नाही तेव्हा मग सुनेशीच जुळते घ्याची इच्छा होते...म्हणजे आई म्हणत होते ते अगदी खरे होते..
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा