शेतकरी परिस्थितीशी लढला पण हरला नाही
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. निसर्ग आणि मानवनिर्मित संकटाशी तो नेहमी सामना करत आहे. वेगवेगळ्या हंगामात त्याला नव्या संकटाना तोंड द्यावे लागते.पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीत नवे प्रयोग व बदलासह त्याचे कष्ट चालूच आहेत. या सगळ्यातून आपल्या कष्टदायी जीवनातून जगण्याचा नवा संदेश जगाला तो देत असतो.
सरोळी व परिसरात मे महिन्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु होतात. भूईमूग व मक्का ही उन्हाळी पिके काढणीनंतर मशागतीला वेग येतो.यावर्षी मेच्या सुरवातीपासून पावसाला सुरवात झाली त्यामुळे मशागतीची कामे ठप्प झाली. उन्हाळी पिके काढण्यास येऊनसुद्धा शेतामध्ये काम करण्याची संधीच पावसाने दिली नाही त्यामुळे पिके शेतात आणि शेतकरी घरात अशी परिस्थिती झाली. पावसाचे दररोज कोसळणे चालूच होते.असे करत मे महिना संपत आला. पेरणीचा हंगाम जवळ आला होता. शेतातील पिकं तशीच उभी होती ;पण हार मानणारा शेतकरी कसला…! शेतकऱ्यांला समजून चुकले होते पाऊस आत्ता थांबत नाही. मोठ्या हिम्मतिने शेतक-यांनी पिकं काढायला सुरवात केली. भूईमूग शेतातील बांधावर उपसुन ठेवले, मक्का कापून ढीग लावले. मक्याचे मोठे सड चिखलातून काढले.आत्ता पर्याय नव्हता शेतक-यांनी हातात कुदळीने जमीन खांदायला सुरवात केली. यामध्ये महिलाही सहभागी झाल्या. आपले शेत असेल तसे तयार करण्यास सुरु केले. ओल्या मातीत प्रत्येकाचा जीव घाईला आला; पण कुणी कष्ट करणं सोडलं नाही. अशातच भाताची पेरणी कांहीनी हात नांगरीने तर कांहीनी कुरीने ( पाभरीने) केली. पेरणी झाल्यानंतर पावसाची रिपरिप सुरुच होती.जोरदार पावसाने जमिनीत पाणि साचले त्यामुळे अनेक ठिकाणी भाताची उगवण झाली नाही.शेतक-यांची अवस्था फार बिकट झाली. भाताची उगवण नसलेमुळे शेतक-यांनी भाताचे तरवे टाकण्यास सुरवात केली. त्या तरव्यातील भाते पाखरांनी फस्त केली.अशा खडतर परिस्थितीचा सामना यावर्षी शेतकऱ्यांना करावा लागत आहे.अशा हालअपेष्ठा , वेदना केवळ शेतक-यांला सोसाव्या लागतात हे निश्चितच वेदनादायी वाटते.
ज्या गावचा तांदूळ दमदार ,कसदार व चवदार यासाठी नावाजला जातो त्या गावातील भातशेती यावर्षी अतिपावसामुळे संकटात आहे; पण या सगळ्या संकटावर मात करुन इथला शेतकरी परिस्थितीशी झुंजतो आहे.अनेक ठिकाणाचे तो भाताचे तरवे आणून तो शेत सजवणार आहे. राडी चिखलातून राबून तो भाताचे भरघोस पीक काढणार आहे. मोकळे दिसणारे शेत हिरवेगार दिसणार आहे. कष्ट करून मोत्यावानी सारा शिवार फुलणार आहे. सा-या शिवारात गोफण फिरणार आणि पिवळधमक भाताच्या राशी घराघरात येणार आहेत. याच राशी सगळ्या जगाला तृप्त करणार त्यावेळी शेतकऱ्यांला झालेला आनंद अवर्णनीय असतो.
असा हा शेतकरी परिस्थितीशी लढतो पण हारत नाही. आपले पीक आभाळाखाली ठेऊन तो खुशाल राहतो. पुढे काय होणार याची तो कधीच काळजी करत नाही. त्याला कुणाचाचं आधार नसतो.केवळ राबणचं त्याच्या हातात असते. अशा लढवय्या , जिद्दी , कणखर शेतक-यांना शतशः वंदन ..!
लढाऊ शेतकरी
शेतात राबतो
सा-या जगाला
धनधान्यांनी पोसतो
शेतात राबतो
सा-या जगाला
धनधान्यांनी पोसतो
© नामदेव पाटील